रविवार, २८ नोव्हेंबर, २०१०

एक सूर आशेचा!

मिलिंद कोकजे - मंगळवार, १६ नोव्हेंबर २०१०
(अथश्री दिवाळी अंकावरून साभार)
milindkokje@gmail.com
चौदा वर्षांचा वनवास फक्त भारतवर्षांत आणि रामायणाच्या काळातच रामाला घडतो असे नाही. अगदी आपल्या शेजारी, आजच्या आधुनिक युगातही १४ वर्षे स्थानबध्दतेत, एकांतवासात काढावी लागतात. हा वनवास घडविणारे असतात लष्करी अधिकारी आणि वनवास भोगणारा राम नसतो तर तो भोगणारी असते कमालीची लोकप्रिय, देश पेटविण्याची क्षमता असलेली, लोकशाहीचा आग्रह धरणारी, राजकीय नेतृत्व करणारी एक स्त्री-ब्रह्मदेशमधील (म्यानमार/बर्मा) आँग सॅन सू की. फरक फक्त इतकाच की तिचा हा वनवास अजूनतरी संपलेला नाही आणि किती काळ चालू राहील ते कोणालाच माहीत नाही.

१९८९ साली सर्वप्रथम म्यानमारमधील लष्करी राजवटीने दॉ सूची (दॉ म्हणजे आँटी, काकू - याच नावाने ती म्यानमारमध्ये परिचित आहे) रवानगी स्थानबध्दतेत केली. तिच्याच घरात तिला कैद करण्यात आले. तेव्हापासून सातत्याने ती मध्येच आत तर मध्येच स्वतंत्र अशा अवस्थेत आहे, पण त्यातही आतच जास्त. १४ वर्षे ती तिच्या घरात अटकेत आहे. तिचा गुन्हा एकच आहे, आपल्या देशाची लष्करशाहीच्या विळख्यातून सुटका व्हावी, देशात लोकशाही नांदावी असे तिला मनापासून वाटते आणि तसे मानणाऱ्या प्रचंड लोकांचा तिला पाठिंबा आहे. लष्करशाहीतील तिच्या विरोधकांचा नेमका त्यालाच विरोध आहे आणि म्हणूनच असा लोकशाहीचा विचार मांडणारी व त्याकरता लोकप्रिय असलेली दॉ सू त्यांना खूप धोकादायक वाटते.
पण इतकी वर्षे स्थानबध्दतेत घालवूनही आणि किती घालवावी लागतील याची अनिश्चितता असतानाही तिच्या विचारात काहीच बदल झाला नाही. तिचा लोकशाहीचा आग्रह कायम आहे. त्याला तिचाही नाइलाज आहे. कारण स्वातंत्र्याचे बाळकडूच घेत ती मोठी झाली आहे. तिचे वडील हे स्वत: लष्करी अधिकारी. ब्रह्मदेशचे आधुनिक लष्कर त्यांनी उभे केले. त्यांची स्वातंत्र्याची ऊर्मीही तितकीच प्रखर होती. त्यामुळे ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळवण्यात त्यांचा पुढाकार होता. ते अतिशय लोकप्रिय आणि नव्या स्वतंत्र ब्रह्मदेशचे एक प्रमुख नेते होते. पहिल्या निवडणुकांआधीच, नव्याने स्वातंत्र्य मिळवलेल्या देशाची लोकशाही पध्दतीने नीट घडी बसण्याच्या आतच १९४८ साली हंगामी सरकारची बैठक सुरू असतानाच, त्या बैठकीतच त्यांची इतर आठ जणांसह हत्त्या करण्यात आली. त्या नऊ जणांपैकी सात जण हे ब्रम्हदेशचे महत्वाचे नेते होते. दॉ सू तेव्हा फक्त दोन वर्षांची होती. त्यानंतर सत्तेत आलेल्या सरकारने आँगच्या आईची नेमणूक भारतात राजदूत म्हणून केली. त्यामुळे दॉ सूचे महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीच्या लेडी श्रीराम महाविद्यालयात झाले. तिचे पुढचे शिक्षण ऑक्सफर्डला झाले. (याच विद्यपीठात पुढे १९९०मध्ये तिची ऑनररी फेलो म्हणून निवड झाली.) तेथेच तिची भेट मायकेल एरीस या ब्रिटनस्थित तिबेटी स्कॉलरबरोबर झाली. त्यांचे प्रेम जमले आणि १९७२मध्ये तिने त्याच्याशी लग्नही केले. त्यांना दोन मुलेही झाली.
पुढे मायकेलला कॅन्सर झाला. त्याने स्थानबध्द असलेल्या आपल्या पत्नीला भेटण्याकरता बर्मी सरकारकडे केलेली विनंती मानली गेली नाही. त्याऐवजी दॉ सूने त्याच्याकडे लंडनला जावे, असा सरकारचा आग्रह होता. परंतु आपण एकदा देशाबाहेर गेलो की आपल्याला परत येऊ दिले जाणार नाही, ही खात्री असल्याने दॉ सू अशा परिस्थितीतही देश सोडून गेली नाही. त्या दोघांची भेट १९९५च्या ख्रिसमसमध्ये झाली होती. त्यानंतर साडेतीन वर्षांनी मार्च १९९९मध्ये त्याचे दॉ सूशी भेट न होता निधन झाले.
१९८८ मध्ये म्यानम्यारला परतण्याआधी दॉ सूने संयुक्त राष्ट्रसंघ, क्योटो विद्यापीठाचे ‘सेंटर फॉर साऊथइस्ट एशिया स्टडीज’, भूतान सरकारचे विदेश मंत्रालय या ठिकाणी काम केले. भारतातही सिमला येथील ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड स्टडिज्’ येथेही ती फेलो होती. आजारी आईकडे बघण्यासाठी ती १९८८साली बऱ्याच वर्षांनंतर आपल्या देशात परतली. त्याचवेळी म्यानमारमध्ये सुरू झालेल्या विद्यार्थ्यांच्या लोकशाहीवादी चळवळीने ती या संघर्षांत खेचली गेली. चळवळ करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लष्करी राजवटीने अनन्वित अत्त्याचार केले. जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात आणले गेले त्याचवेळी दॉ सू तेथेच आईची सेवा करत होती. रुग्णालयातील भयानक दृश्य पाहून ती विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून गेली ती kI could not, as my fatherls daughter, remain indifferent to all that was going onl या भावनेने. तेव्हापासून ती या चळवळीचा महत्वाचा भाग बनली. विद्यार्थ्यांच्या चळवळीचा परिणाम होऊन जनरल ने विनने ‘बर्मा सोश्ॉलिस्ट प्रोग्रॅम पार्टी’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे एकूणच लोकशाहीवादी चळवळीला जोर चढून ती आणखीनच फोफावली. ‘८-८-८-८ अपरायजिंग’ या नावाने प्रसिध्द असलेली बीएसपीपी सरकारच्या निषेधातील ही चळवळ ८ ऑगस्ट १९८८ साली सुरू झाली. त्यात हजारो लोक मारले गेले.
दॉ सू हळूहळू या चळवळीची प्रमुख कार्यकर्ती झाली. चळवळीचे नेतृत्वच तिच्याकडे आले. रंगूनमधील शेडाँग पॅगोडासमोर तिने २६ ऑगस्ट १९८८ला जाहीर सभा घेतली आणि लोकशाहीवादी सरकार सत्तेत यावे, म्हणून लढा पुकारला. जवळजवळ पाच लाख लोक त्या सभेला हजर होते. तेव्हापासून ते आजपर्यंत सरकारने तिच्याच घरात तिला कैद केले. तरीही जनतेने तिलाच आपले नेतृत्व दिले आहे. परिणामी लष्करी हुकुमशाही राजवटीने प्रयत्न करूनही म्यानमारमधील राजकारण तिच्याभोवतीच फिरत राहिले आहे.
या जाहीर सभेनंतर एक महिन्यातच ‘नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसी’ची स्थापना करण्यात येऊन दॉ सूची त्याच्या जनरल सेक्रेटरीपदी निवड करण्यात आली. त्यानंतर तिच्या आईचे निधन झाले आणि त्यांची अंत्ययात्रा म्हणजे म्यानमारमधील जुलमी, अत्याचारी लष्करी राजवटीचा निषेध करणारी यात्राच ठरली. याचा अपेक्षितच परिणाम झाला आणि २० जुलै १९८९ला दॉ सूला प्रथमच तिच्याच घरात स्थानबध्दतेत ठेवण्यात आले. ती कैदेत असूनही १९९०च्या निवडणुकीत नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसीने ८२ टक्के जागा जिंकल्या. लष्करशाहीने या निवडणुकांचे निकाल मानण्यासच नकार दिला. तेव्हापासून म्यानमारमध्ये लष्करी राजवट आणि लोकशाहीवादी नागरिक यांच्यात संघर्ष सुरू आहे. पहिल्या सभेनंतर लष्करी राजवटीने दॉ सूचे सामथ्र्य जाणले आणि तिला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु अगदी शेवटच्या क्षणी एका मेजरने हस्तक्षेप केल्याने तिला मारायला आलेल्या सैनिकांनी तिच्यावर गोळीबार केला नाही व ती वाचली. जीव वाचला तरी आपले स्वातंत्र्य मात्र तिला गमवावे लागले. दॉ सूच्या ६४व्या वाढिदवशी ‘६४ फॉर आँग सॅन सू की’ असे एक संकेतस्थळ सुरू करण्यात आले. तिच्या स्वातंत्र्याकरता लोकांनी संदेश द्यावेत अशी कल्पना यामागे होती व ती कमालीची यशस्वी झाली. हजारो लोकांनी आपले संदेश पाठवले. तिच्या एका चाहत्याने लिहिले होते, ‘यू विल नेव्हर वॉक अलोन’.
दॉ सूकडे जगाचे लक्ष वळायला मुख्यत: कारणीभूत ठरला तो तिला १९९१मध्ये मिळालेला शांततेचा नोबेल पुरस्कार. कैदेत असताना पुरस्कार मिळालेली ती एकमेव नोबेल पुरस्कार विजेती आहे. नोबेलप्रमाणेच जागतिक पातळीवरील अनेक पुरस्कार तिला लाभले. १९९०मध्ये ‘साखारोव्ह प्राईज फॉर फ्रीडम ऑफ थॉट,’ ‘न्यूहार्थ फ्री स्पिरीट ऑफ द इयर अवॉर्ड २००३’, भारत सरकारचे ‘जवाहरलाल नेहरू अवॉर्ड फॉर इंटरनॅशनल अंडरस्टँडींग’, ‘रॅफ्टो अवॉर्ड ’हे पुरस्कारही तिला मिळाले. तिने नोबेल पुरस्कारासोबत मिळालेल्या १.३ दशलक्ष पौंडांचा बर्मीज लोकांकरता निधी उभारताच सरकारने परदेशात तिने पैसे खर्च केले म्हणून तिची करविषयक चौकशी करायला सुरूवात केली. जागतिक संघटना, महनीय व्यक्ती, संयुक्त राष्ट्रसंघ या सगळ्यांनी आवाहन व प्रयत्न करूनही लष्करी राजवटीने तिला आत्तापर्यंत मुक्त केले नव्हते व करतील याची खात्री नव्हती. क्वचित तिच्यावरची काही बंधने काही काळ थोडीशी हलकी केली गेली आणि परत काहीतरी कारणाने लादली गेली. म्यानमारमधील निवडणुकांकरता कदाचित यावर्षी तिला मुक्त करतील, अशी आशा होती. त्याप्रमाणे निवडणुकांआधी नाही तरी निवडणुका झाल्यावर तिची मुक्तता करण्यात आली आहे.
मागच्या वर्षी तिच्या स्थानबध्दतेची मुदत संपत आलेली असतानाच अचानक जॉन यट्टॉ हा अमेरिकन युवक तिच्या घराजवळील तलाव पोहून पार करून तिला भेटायला घरी आला. तो पकडला गेला. अनेकांना असा संशय होता की तिच्या स्थानबध्दतेत वाढ करण्याकरता लष्करी राजवटीनेच त्या तरूणाला पाठवले असावे. काहीही असले तरी त्याचा परिणाम मात्र दॉ सूची स्थानबध्दता वाढण्यात झाली हे खरे.
दॉ सू पक्की बुध्दिस्ट आहे. पण पाश्चिमात्य परंपरा म्यानमारच्या जीवनात आणून तिने स्वातंत्र्यलढ्याचे स्वरूपच बदलले. आपल्या एका कवितेत ती म्हणते
YXA free bird..
which is just freed
used to be caged
now flying with an olive branch
for the place it loves.
A free bird towards a Free Burma.
Why do I have to fight???
तिच्या कवितेतील पक्षी पिंजऱ्यातून मुक्त झाला आहे, पण तिच्या वाटय़ाला हे भाग्य अजून आलेले नाही, केव्हा येईल, माहीत नाही. पण तिचा लढा मात्र अजूनही त्याच जिद्दीने अगदी ६५व्या वर्षीही सुरू आहे. तिच्यात हे बळ कोठून येते याची कल्पना नाही, पण नोबेल पुरस्काराचे एक मानकरी बिशप डेस्मंड टुटु यांनी मात्र तिला नेमके ओळखून, तिचे अचूक वर्णन केले आहे :kIn physical stature she is petite and elegant, but in moral stature she is a giant. Big men are scared of her. Armed to the teeth and they still run scared.l
( सौजन्य- लोकसत्ता  )

सोमवार, ११ ऑक्टोबर, २०१०

सरकार 'बीओटी' तत्वावर द्यायचे का ?

"किती रुपये ? " आपण
"४५ सुट्टे द्या " तो
"सुट्टे नाहीत हे पन्नास आहेत  " आपण
आणि तो वैतागून एक पावती आणि ५ रुपयांची इक्लेर्स चोकलेट देतो आणि आपण ती गपगुमान घेऊन पुढे चालते होतो.हा रोजचा अनुभव आहे हायवे वरील टोलनाक्यांवरील.
'टोल' या गोष्टीशी कधीही संबंध आला नाही असा माणूस भेटणे आतातरी शक्य नाही असे मला वाटते. टोल प्रकाराने सर्वांनाच त्रस्त केले आहे, माणूस गरीब ,श्रीमंत असो वा वाहतूकदार चालक/मालक सर्वच  या टोल पद्धतीला वैतागले आहेत.'टोल' म्हणजे सरकारच्या परवानगीने दिवसा  दरोडा टाकणे यातला प्रकार झाला आहे सध्यातरी.या टोलनाक्यांवर जनतेची अक्षरशा लुट चालू आहे.
'बांधा वापरा आणि हस्तांतरित करा'  या तत्वावर रस्ते,पूल बांधून त्यावर टोल बसवून त्याचा खर्च तेथून  जाणाऱ्या येणाऱ्या सामान्य माणसांकडून वसूल करायचा असा हा फंडा आहे. याची  सुरवात साधारण २००२ मध्ये पुणे -मुंबई एक्स्प्रेस वे वर टोल बसवून करण्यात आली.सामान्य माणसालाही चकचकीत रस्ता सुखकर प्रवास यामुळे टोल द्यायला काही वाटत नव्हते.सामान्य माणसाची हीच मानसिकता ओळखून सरकारने हाच फंडा सर्वत्र वापरण्यास सुरवात केली.परंतु अवाढव्य टोल आणि निष्कृष्ट दर्ज्याचे रस्ते आणि टोल नाक्यांचा अतिरेक यामुळे सामान्य माणूस आता वैतागला आहे. त्यामुळेच या टोल पद्धती  विरुद्ध आंदोलने होऊ लागली आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून राज्य सरकारने १० टोल नाक्यांवरील टोल वसुली बंद करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु बाकीच्या टोल नाक्यांचे काय ? राज्यात एकून १७५ टोल नाके आहेत असे बोलले जाते मला यापेक्षा जास्त असावेत असे वाटते कारण एकट्या बारामती मध्ये ३ टोलनाके रिंग रोडवर आहेत २-३ किमी च्या प्रवासासाठी २१ रुपये एवढा टोल येथे वसूल केला जातो.बाकी बेंगलोर- मुंबई एक्प्रेस वे यावर किती टोल नाके आहेत हे फक्त मोजत बसावे.पुणे- मुंबई परतीच्या प्रवासासाठी साधारण ५०० रुपये टोल देवा लागतो,अरे हा टोल आहे कि चेष्टा ?
'बांधा वापरा हस्तांतरित करा' या अंतर्गत खाजगीकरणातून  विकास करण्याला विरोध नाही आहे.परंतु हे करताना ते चुकीच्या पद्धतीने किंवा अतिरेक करून करू नये असे मत आहे.एखाद्या कंपनीला त्याचा ठेका दिला तर त्याला ठराविक वर्षासाठी टोल वसुलीचा हक्क दिला जातो . त्यानंतर  तो बंद झाला पाहिजे हि रास्त अपेक्षा असते परंतु त्यांना सरळसोट मुदतवाढ दिली जाते.कारण काय तर राजीकीय वरदहस्त, हो हे लपून नाही राहिले कि टोल नाक्यांचे ठेके घेणारे सगळे राजकीय पुढारी किंवा त्यांचे बागलबच्चे  आहेत.
तसेच टोल वसूल करणार्यांनी  टोल नाक्यांवर काही सुविधा द्यायच्या असतात,रस्त्याची डागडुजी करायची असते या गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
 टोल देऊन खचखळग्यातून प्रवास करायचा याला आता सामान्य माणूस वैतागला आहे तसेच अजून किती वर्ष हा टोल द्यायचा असा प्रश्न आहेच.कितीतरी  रस्त्यावरील टोल त्याचा खर्च निघूनही चालू आहे .परत  काही चौकशी करायला गेले तर दादागिरीची भाषा केली जाते काही ठीकानीतर मारहाणीचे प्रकार घडले आहेत.भरपूर ठिकाणी मुदत संपली तरी टोल वसुली  केली जाते आपल्या हडपसर येथील टोल नाक्याचेच उदाहरण घ्या त्याची मुदत संपून जमाना झाला पण वसुली चालूच आहे.
 खूप टोल नाक्यांवर मोठ मोठे घोटाळे होत आहेत जसे कि नकली पावती दिली जाते,वाहनांची संख्या कमी दाखवली जाते मध्ये एका ठिकाणी कोट्यावधी रुपयांच्या नकली पावत्या  जप्त करण्यात आल्या.हे टोल नाके म्हणजे सामान्य माणसाना लुटण्याचे सरकारी परवानेच आहेत असे मत त्या ठेकेदारांचे झाले आहे.याबाबतच्या तक्रारी सरकार दरबारी जात आहेत परंतु त्याची दखल घेतली जात नाही. आज प्रगत तंत्रज्ञानामुळे किती वसुली झाली किती वाहनांनी ये जा केली हे समजणे अगदी सोपे झाले आहे त्याचा वापर करून ठेकेदाराला योग्य तो मोबदला मिळवून देऊन लोकांना या जोखंडातून मुक्त करता येऊ शकते.परंतु हे करण्याची राजकीय इच्छा सरकारच्यात नाही.
याविरुद्ध जोपर्यंत सरकारला जाग येत नाही असे जनआंदोलन उभे राहत नाही तोपर्यंत हे असेच चालू राहील असे मला वाटते.किंवा  'कधी बंद होणार हे टोलनाके?' असा प्रश्न मनालाच विचारात प्रवास करावा लागेल तोही खड्ड्यातून.
आजकाल ज्याप्रमाणे सरकार चालवले जात आहे, सरकारी अधिकारी वागत आहेत, भ्रष्टाचार गुन्हेगारीकरण वाढले आहे त्यावर उपाय म्हणून सरकारचा हा आवडता फंडाच वापरावा आणि हे सरकार मिलिटरीकडे 'बांधा,वापरा आणि हस्तांतरित करा' या तत्वासारखे १५ वर्षासाठी द्यावे म्हणजे ते सुतासारखे सरळ होतील. नाही समजलात ?
म्हणजे कसे आहे ५ वर्षात मिलिटरी सर्व सरकारी बाबू आणि सरकारी योजना यांना योग्य पद्धतीत बांधतील १० वर्ष त्यांचा वापर योग्य होतोय का ते पाहतील आणि नंतर लोकशाहीकडे हस्तांतरित करतील :) कशी आहे आयडिया ?
आणि यासाठी लोक पाहिजे तेवढा टोल स्वखुशीने द्यायला तयार होतील, बघा प्रयोग करून .

गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०१०

देवगिरी ... एक मिश्रदुर्ग

देवगिरी हा एक अपूर्व दुर्ग आहे.एखादा डोंगर पोखरून एक बेलाग दुर्ग आपल्या मध्ययुगीन   शिल्पज्ञानी निर्मिलेला आहे.यादवांची हि एकेकाळची राजधानी खलजी सुलतानांच्या  ताब्यात गेली.पुढे १४ व्या शतकाच्या पूर्वार्धात दिल्लीच्या मुहमद्द तुघलकाने तर दिल्लीची राजधानी हलवून ती देवगिरीला आणली.तोपर्यंत या देवदुर्गाचे नामकरण दौलताबाद करण्यात आले होते.पुढे निजामशाहीची  राजधानी म्हणून देवगिरी प्रसिद्ध होताच. शिवप्रभूंच्या मातोश्री जिजाबाई यांच्या वडील आणि तीन भावांचे खूनही याच दुर्गात झाले.सभासदाच्या बखरीत शिवप्रभूंच्या मुखी 'पृथ्वीवर दौलताबाद चखोट खरा ..!' असे शब्द  आहेत.
देवगिरीचे सारेच न्यारे आहे.दुर्गाचा खंदक हा डोंगराचा उतरता भाग पोखरून काढून केला आहे.तशीच ती अंधारी ! राष्ट्रकुट सत्ताधीशांनी दुर्गावर जाण्यासाठी कातळ पोखरून गोलाकार अंधारी वाट केली आहे. त्या वाटेशिवाय दुर्गावर जाताच येत नाही. त्या गडद अंधाराच्या वाटेने जात असताना चुकून प्रकाश दिसतो; पण त्या प्रकाशाची वाट आपल्याला खंदकात भिरकावून देते.पूर्वी त्या अजस्त्र खंदकात मगरी सोडलेल्या असत.१७५६-५७ मध्ये या दुर्गाचा ताबा मराठ्यांकडे आला होता.
 देवगिरी हा मिश्रदुर्ग आहे.म्हणजे दुर्ग जमिनीवरही  आहे आणि डोंगरावरही आहे. नुसताच गिरिदुर्ग किंवा फक्त स्थलदुर्ग नव्हे. दुर्गाच्या दोन बाजूला तिहेरी तटबंदी आहे. अंबरकोट,महाकोट आणि कालाकोट अशी त्यांची नावे आहेत.  अंबरकोट हे नाव कदाचित निजामशाहीचा वजीर मलिक सर्कमलिक अंबर याच्या नावावरून पडले असावे. तटबंदीत चीनलेले देवालयांचे दगड जागोजाग दिसतात.खंदक,बुरुज,तट,झरोके यांची रेलचेल आहे.मात्र,देवगिरीचे सर्वात अदभुत म्हणजे खंदक आणि अंधारी.काळ्या फत्तराचा ६०-७० मीटर उंचीचा दगड कोरून काढला आहे.खांदकाची रुंदीही चांगली १५-२० मीटर आहे.खंदकावरचा कडा छीन्नी लावून गुळगुळीत केला आहे. सुरुंग लावला असेल का,हा प्रश्न आहेच;पण अंधारीत तर फक्त छीन्नीच्याच खुणा दिसतात
अंधारीच्या वाटेचे प्रवेशद्वार एखाद्या लेणीच्या द्वारासारखेच आहे.त्यावरील कलाकुसर राष्ट्रकुटाच्या लेणीशी साधर्म्य दर्शवते.आत गडद अंधार आहे.मशाली,पलिते घेतल्याखेरीज आतले काहीच दिसत नाही.कसे केले असेल हे काम ? मार्ग वळणाचा आहे. ठोकळमनाने त्याचे तीन भाग पडतात.पहिले भुयार २५ मीटर लांब आणि १० मीटर रुंद आहे.दुसरे १० मीटर लांब आणि तेवढेच रुंद आहे.तिसर्या भागाला मोठी अंधारी म्हणतात.त्यातून ३० मीटरचा कडेलोटहि  आहे.मोठ्या अंधारीत जागोजाग १०० खोदीव पायरया आहेत.त्यापुढे लोखंडी तवा पेटवण्याची जागा आहे.हे सारे अपूर्व आहे.देवगिरी डोंगरातून सुमारे ८० लाख टन दगड काढून टाकून दुर्ग बळीवंत करण्यात आला आहे.

सोमवार, ४ ऑक्टोबर, २०१०

चाकणचा संग्रामदुर्ग ...रणमंडळाचे चक्रव्यूव्ह

काही वर्षानंतर 'इथे एक किल्ला होता' असे सांगावे लागेल,अशी चाकणच्या संग्रामदुर्गाची स्थिती आहे.आपण किल्ल्यात कधी येतो आणि कधी बाहेर पडतो हे कळेनासे झाले आहे.असे का झाले? आपला इतिहास जतन करावयाच्या जाणीवा बोथट झाल्या आहेत का? आक्रमकांविरुद्ध ज्या दुर्गानीच आपले स्वातंत्र्य आणि अस्मिता जिवंत ठेवली;त्या महाराष्ट्रातील दुर्गांची सद्यस्थिती पाहून यातना होतात.इतिहास जतन करण्याकडे लक्षच नाही.ते असते तर दुर्गांची अशी दारूण अवस्था झालीच नसती.शिवशाहीतील एका पराक्रमाचा साक्षीदार हा चाकणचा दुर्ग आहे.बादशाह औरंगजेबाचा मामा अमीर उल उमरा शायीस्ताखान हा मोठ्ठ्या फौजेनिशी स्वराज्यात आला.या भुईकोट दुर्गाला त्याने वेढा घातला.संग्रामदुर्गात फिरंगोजी नरसाळा नावाचा किल्लेदार होता.त्याने किल्ला लढवण्याची पूर्ण तयारी केली होती.संग्रामदुर्ग म्हणजे काही नामांकित दुर्ग नव्हे.आधीच तो स्थलदुर्ग;पण खांद्काने  वेढलेला.त्यामुळे थोडी बळकटी आलेला.खडकात पाणीही होते,शिवाय दिवस पावसाचे होते.२१ जून १६६० रोजी किल्ल्याला मुघलांचा वेढा पडला.हा वेढा तब्बल ५६ दिवस चालला.तोफा -बंदुकांचा काही उपयोग होत नाही,हे पाहिल्यावर शायीस्ताखानाने भुयार खणून सुरुंग ठासण्याची  आज्ञा केली.ताबडतोब कामाला सुरवात झाली.हे भुयार खंदकाखालून खणण्यात येत होते.आतल्या मराठ्यांना जर या भुयाराची कल्पना आली असती,तर कदाचित खंदकातील पाणी त्यात सोडून सुरुंग नाकाम करता आले असते.३००-३५० लोकांनीशी फिरंगोजी नरसाळ्याने चाकण झुंजवत ठेवला होता.१४ ऑगस्ट १६६० हा दिवस उगवला.मुघलांनी सुरुन्गाला बत्ती दिली.पूर्वेच्या कोपरयाचा बुरुज अस्मानात उडाला.त्यावरचे मराठेही हवेत उडाले.आरोळ्या ठोकत मुघल त्या खिंडाराकडे धावले.फिरांगोजीनीही वाट न पाहता ते खिंडार लढवण्याची तयारी केली.तो पूर्ण दिवस मराठ्यांनी जोमाने लढाई केली.दुसर्या दिवशी राव भावसिन्हामार्फत मराठे किल्ल्याबाहेर आले आणि मुघलांनी चाकणचा संग्रामदुर्ग जिंकला.
 या दुर्गात एक आश्चर्यकारक रचना आहे.झाड-झाडोरा वाढल्यामुळे हि योजना नित पाहता येत नाही.पूर्वेच्या बाजूला आत आल्यानंतर उजव्या बाजूला एक मोठे प्रवेशद्वार लागते.तीच वाट आहे असे समजून कोणी चालू लागला कि,वाट हळू हळू निरुंद होत जाते आणि सरतेशेवटी बंद होते.तटावरच्या लोकांना आत आलेला शत्रू अलगद मारयात सापडतो.अशा रचनेला 'रणमंडळ' म्हणतात.ते चाकणच्या संग्रामदुर्गात आहे.

बुधवार, २२ सप्टेंबर, २०१०

रामजन्मभूमी खटला आणि निकाल

रामजन्मभूमी आणि बाबरी मस्जिद या ऐतिहासिक खटल्याचा निकाल येत्या 30 तारखेला लखनौ खंडपीठामध्ये ६० वर्षाच्या पदिर्घ कालावधीनंतर लागणार आहे.न्यायमूर्ती एस.यु.खान,डी.व्ही.शर्मा आणि सुधीर आगरवाल हे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायमूर्ती निकाल देणार आहेत.जस जसा निकाल जवळ येत आहे तसे सरकारचे टेन्शन आणि  सामान्य लोकांच्यात उस्तुकता वाढत आहे. बाबरी पतनानंतर जशी परिस्थिती ओढवली होती तशी ओढवू नये म्हणून सरकार खबरदारी घेत असून सर्वाना शांततेचे आवाहन करत आहे.सर्व मिडीयाला आयताच विषय मिळाल्यामुळे तेथेही दिग्गजांच्या मुलाखतींच्या फैरी झडत आहेत.
 तसा हा निकाल अंतिम निकाल आहे असे म्हणता येणार नाही कारण या निकालानंतर निकाल ज्यांच्या विरोधात जाईल त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाता येणार आहे.तेथे निकाल लागण्यासाठी किती काळ लागेल हे रामजाने. परंतु याधी सत्र न्यायालयात हिंदूंच्या बाजुनेने निकाल लागला होता.हि लढाई फक्त जागेची नाहीतर अस्मितेची आहे.रामाची जन्मभूमी आयोध्याच आहे का ? हे न्यायालयात पुरावे देऊन साबित करावे लागणार आहे.
 काही लोकांच्या मते या खटल्याचा निर्णय न्यायालाच्या बाहेर सामंजस्याने ह्वावा. किंवा तेथे एखादे  राष्ट्रीय स्मारक तयार करावे.परंतु  'रामजन्मभूमी' एकच असू शकते ती बदलता किंवा हटवता येणार नाही.विषय फक्त राममंदिराचा असता तर वेगळी गोष्ट होती  पण प्रश्न 'रामजन्मभूमीचा' आहे.
न्यायालय बहुसंख्य लोकांच्या श्रद्धेचा निवाडा करू शकते का ???? कारण आयोध्या हा हिंदूंच्या श्रद्धेचा विषय आहे.हिंदू बाकी कोणत्याहि  गोष्टीत एकत्र येतील न येतील परंतु अयोध्या हा असा एक विषय आहे ज्यात ते सर्व जातपात विसरून एकत्र येतात.
रामजन्मभूमी संदर्भातील पहिली केस महंत रघुबीर दास यांनी जानेवारी १९८५ साली दाखल केली होती.त्यानंतर २२ डिसेंबर १९४९ रोजी त्या जागेत रामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.डिसेंबर १९५० मध्ये रामजन्मभूमी न्यासाच्या महंत रामचंद्र दास परमहंस यांनी मंदिर बांधणीसाठी केस दाखल केली अशा ऐकून ४ केसेस पेंडिंग आहेत त्यातील एक सुन्नी सेन्ट्रल ऑफ वक्फ यांची आहे.



 पुरातत्व  खात्याने जे उत्खनन केले आहे त्यात मंदिराचे अवशेष सापडले आहेत आणि ते न्यायालयात सादर हि करण्यात आले असावेत यावर न्यायलय योग्य ते निर्णय घेईलच.तोपर्यंत आपण वाट पाहूयात .आणि निर्णय रामजन्मभूमीच्या  बाजूने लागावा म्हणून प्रार्थना करूयात.

मंगळवार, १४ सप्टेंबर, २०१०

विशेषाधिकार आणि काश्मीर

काश्मीर खोरे मागील काही दिवसापासून धुमसत आहे.अगदी ईदच्या दिवशीही तेथील हिंसाचार थांबला  नाही.कालसुद्धा कुराण जाळले गेल्याच्या अफवेने हिंसाचार घडला आणि १६ जणांचा मृत्यू  झाला. यामागे कोण आहेत हे सर्वांनाच माहिती आहे अगदी सरकारलाही मग ते मुग गिळून का गप्प बसत आहे ? त्या फुटीरवाद्यांना त्यांच्या बिळाच्या बाहेर काढून ठेचत का नाही ? इथे मताची लाचारी यापेक्षा  सरकारचा स्वताबद्दलचा विश्वास कमी वाटतो आहे.ते कोणताही ठोस निर्णय घेण्यापासून दूर पळत आहे त्यांना भीती वाटत आहे. कोणाची आणि का ? ते भीत आहेत त्या फुटीरवाद्यांना आणि काही पाकप्रेमी जनतेला.त्यांना  मनमानी करून  देऊन त्यांचा लाड करून सरकार त्यांना आपलेसे करू पाहत  आहे आणि ते कदापि शक्य वाटत नाही.
 आताची त्या फुटीरवाद्यांची मागणी आहे ती म्हणजे काश्मीरमधील लष्कराचा विशेषाधिकार  कमी करावा. का तर त्याच्या आडून लष्कर मनमानी आणि अत्याचार करत आहेत. त्यात नाहक 'बेकसूर' काश्मिरी तरुण बळी पडत आहेत. यासाठी फुटीरवादी समर्थक रस्त्यावर उतरले आहेत आणि हिंसाचार करत आहेत. आता यालाच घाबरून आपले केंद्र सरकार लष्कराचा विशेषाधिकार कमी करावेत का याचा विचार करत आहे.
तर लष्कराचे हे विशेषाधिकार काय आहेत ते आपण थोडक्यात पाहूयात. -
 देशाचा एखादा भाग केंद्राने 'अस्थिर' जाहीर केल्यानंतर  त्या ठिकाणी विघातक शक्तीशी मुकाबला करण्यासाठी लष्कराला विशेषाधिकार दिले जातात.या अधिकारानुसार ५ किंवा जास्त व्यक्ती एकत्र येऊन कायद्याचे उल्लंघन करत असतील तर त्यांच्यावर गोळीबार करण्याचे किंवा त्यांच्याविरुद्ध बळाचा वापर लष्कर करू शकते.त्याचप्रमाणे अशा जमावाजवळ शस्त्रे असतीलतर त्यांच्यावर गोळीबार करण्याचे किंवा त्यांना ठार मारता येते.
 एखादी व्यक्ती जर गुन्हा करीत असेल किंवा करण्याचा संशय असेलतर तिला वौरंटशिवाय अटक करता येते.तसेच अशी अटक करण्यासाठी कोणत्याही घरात शिरून शोध घेता येतो किंवा दहशतवाद विरोधी कारवाई करताना अशे घर उद्ध्वस्त करता येते. अशा स्थितीत लष्कराविरुद्ध खटला दाखल करता येत नाही.
   तर हा कायदा फक्त काश्मीर पुरताच नसून देशाच्या सर्वच अस्थिर भागासाठी आहे त्यामुळे हाच कायदा ईशान्यकडील राज्यातही लागू आहे. जर हा कायदा काश्मिरात शिथिल वा रद्द केलातर तशीच मागणी बाकी ठिकाणी सुद्धा होऊ शकते आणि तिथेही तो शिथिल करावा लागेल.कारण एकाठिकाणी  एक न्याय आणि दुसर्या ठिकाणी दुसरा हे कोणी खपवून घेणार नाही. तसेच हा विशेषाधिकार कमी करून काश्मिरातील हिंसाचार कमी होणार आहे का ? त्याची कोणी हमी घेणार आहे का ? नाही..म्हणजे तशी काही ठाम शक्यता नसताना असे पाऊल उचलणे पूर्णपणे चुकीचे आहे. लष्कराचे हे अधिकार कमी झाले तर त्यांना तिथे दहशतवादी कारवायांना आळा घालणे अक्षरशा मुश्कील होऊन जाईल तसेच स्वताचा बचाव करणे हि जिकीरीचे होऊन बसेल. त्यामुळे तिथे लष्कराला 'जगा आणि जगू द्या' अशी भूमिका घ्यावी लागेल.आणि ते देशाला कदापि परवडणारे नाही.
 केंद्र सरकारने तात्पुरत्या फायद्याचा विचार न करता दूरदृष्टी ठेऊन निर्णय घ्याला हवा.नाहीतर याचे दूरगामी परिणाम देशाला भोगावे लागतील आणि ते फक्त काश्मीर पुरते मर्यादित न राहता ईशान्यकडील राज्यातही पाहण्यास मिळतील.
(व्यंगचित्र- सतीश आचार्य )

शनिवार, २८ ऑगस्ट, २०१०

एक वर्ष झाले सुद्धा ...

मी ब्लॉगिंग सुरु केलं अन् बघता बघता एक वर्ष कसं निघून गेलं हे समजलं
सुद्धा नाही. ब्लॉगला सुरुवात करतांना आपण आपल्या वाचनात आलेले चांगले
लेख फक्त इथे टाकायचे, मग ते कोणत्या वृत्तपत्रातील असो किंवा एखाद्या
संकेतस्थळावरील असो... असे माझे नियोजन होते. तसं मला जास्त अलंकारिक,
कथा वगैरे काही लिहिता येत नसल्याने मी स्वतःचे असे काही लिहू शकेल असे
वाटत नव्हते.

ब्लॉगिंगच्या अगोदर मी ऑर्कुटवर पडीक असायचो आणि तेथील सामाजिक
विषयांवरील धाग्यांवर आपले मत नोंदवायचो, भांडायचो... हे रोजचेच होते.
त्यावेळी ब्लॉग हे काय असते, याचे जास्त ज्ञान मला नव्हते. असाच एकदा एक
प्रोफाईल पाहत असतांना मला त्यात एका ब्लॉगची लिंक दिसली. मी उत्सुकतेने
ती पाहिली आणि मला हा प्रकार चांगला वाटला. आपलाही असाच एक ब्लॉग असावा
असे मनात येऊन गेले आणि मी स्वतःचा ब्लॉग तयार केला. नाव काय द्यावे यावर
डोके चालवण्याचा प्रयत्न केला आणि आपण फक्त सामाजिक विषयांवर, ज्यात बाकी
लोकांना जास्त रस नसतो किंवा एकदा वाचून सोडून द्यायचे असते अशा विषयावर
लिहणार असतांनाही 'जीवनमूल्य' असं उगाच उपदेशात्मक नाव दिलं. त्यानंतर तो
ब्लॉग "मराठी ब्लॉग विश्व"वर लावण्यासाठी मला काय म्हणून कष्ट करावे
लागले, काय सांगू... कारण मला संगणक या गोष्टीतले शून्य म्हणून ज्ञान
होते .कधी व्यवस्थितरित्या हाताळल देखील नव्हता. मी संगणक आणि नेट फक्त
माझ्या शेअर ट्रेडिंग साठी घेतले होते आणि त्या वेळात मी नेटवर भटकत
असायचो, तेवढंच काय ते मला येत होतं. कोणत्याही ब्लॉग धारकाला आपला ब्लॉग
कोणीतरी वाचवा असे वाटत असते, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या
असतात. त्यासाठी मी माझ्या नवीन पोस्टची लिंक माझ्या ऑर्कुट मित्रांना
मेसेज करायचो, त्यातील काही वाचायचे, काही प्रतिक्रिया द्यायचे, तेवढाच
थोडासा दिलासा...
ब्लॉग सुरु केल्यानंतर मी बाकीचे मराठी ब्लॉगही वाचायला लागलो. मराठी
ब्लॉग विश्ववरून, काही दिवस असे गेल्यानंतर मला विविध ब्लॉगवरील
टेम्प्लेटने भुरळ घातली. आपलाही ब्लॉग असाच सजवलेला असावा असे वाटू लागले
पण त्यातील अक्कल नसल्याने काही करता येत नव्हते आणि तेवढ्यात
भुंग्याने नवीन टेम्प्लेटबद्दल एक पोस्ट टाकली असावी आणि आम्ही त्याला
प्रतिक्रिया देत त्याबद्दल प्रश्न विचारू लागलो पण HTML मधील काहीही
ज्ञान नसल्याने माझ्या ते डोक्यावरून जात होते, मग 'भुंग्या' दादाला
त्रास सहन होईना, आणि त्याने माझा ब्लॉग स्वतःहून सजवून दिला, तेही
त्याच्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून आणि मला माझा पहिला ब्लॉग मित्र
मिळाला... त्यानंतर माझ्या पोस्टवरील पहिली प्रतिक्रिया असायची ती
भुंग्या दादाची आणि त्यामुळे मला प्रोत्साहन मिळायचे. मग त्यानंतर ओळख
झाली ती विशल्याची, याने आता आपल्या ब्लॉग ची 'सुरुवात' केलीय की शेवट
केलाय हा प्रश्न आहेच म्हणा, पण याचेही मी खूप डोके खाल्ले आहे आणि आताची
टेम्प्लेट ही याचीच देन आहे. त्यानंतर पंक्याच्या 'भटकंतीने' वेड लावले
याची फोटोग्राफी म्हणजे भन्नाट काम... आपण फिदा आहे त्यावर, रोहनचा तसा
थोडासा परिचय होता ऑर्कुटमुळे पण त्याचे ब्लॉग वाचून आणि महाराजांबद्दलचे
ज्ञान पाहून खरच मानलं या मावळ्याला... एकदम जबरदस्त अभ्यास असणारा
माणूस, त्यात आमच्यासारखाच हुंदडण्यात आनंद मानणारा... महेंद्र काकांच्या
ब्लॉगेस्टिकनंतर त्यांच्या ब्लॉगवर जास्त जाने झाले ते 'काय वाट्टेल ते '
लिहित गेले आणि आम्ही वाचत गेलो अगदी मंत्रमुग्ध होऊन... त्यात त्या
सत्यवानाची 'वटवट' मधेच त्रास द्यायची, कधी हसवायची, तर कधी विचार करायला
लावायची... त्यात त्यांना साथ दिली त्यांच्या बाळराजांनी मग काय त्या
ब्लॉगची बातच कुछ और होऊन गेली. कधी कधी 'माझिया मना'ची साद ऐकू यायची
आणि मी तिकडे जायचो.
कधी खूप उदास झालो कि 'माझ्या गजाल्या' असायच्या. कधी सुवासिक 'मोगरा
फुलला
' की तिकडे भटकून यायचो. तुम्ही त्या 'सौरभ'चा ब्लॉग पहिला आहे का
एकदम जबऱ्या माणूस, पाहिजे तसे कशावरही लिहू शकतो तेही माणसाला खेळवून
ठेवत, त्याच्यात खूप काही आहे असे मला सारखे वाटते. याच्या मित्राची
'बक-बक' सुद्धा मस्त असते.

या ब्लॉगिंगमुळेच ट्विटरकडे ओढलो गेलो. आता तिथेच पडीक असतो दिवसभर...
यातून नवनवीन मित्र मिळाले, खूप काही चांगले वाचयला मिळाले. आजकाल मी
आनंदच्या 'मनात काय आहे' ते पाहत असतो तसेच 'बाबाची भिंत' चढून त्यामागे
काय चालले आहे तेही पाहत असतो. कधी निवांत बसायचे असेल तर सागरचा 'सागर
किनारा
' आहेच की...

याच काळात मला मराठी ब्लॉगर्सच्या "पुणे ब्लॉगर्स स्नेह मेळावा" साठी
जाण्याचा योग आला, परंतु जास्त कोणाशी ओळख नसल्याने फक्त भुंग्या दादाशी
गप्पा मारल्या.. पंक्या आपला फोटो काढून घेण्यात व्यस्त होता. दीपक दादा
दिसायला राक्षसासारखा असला तरी खूप प्रेमळ आहे बरं का...!! ;) तर असे
दिवस चालू आहेत कधी काही सुचले तर लिहित असतो... मी साधारण सामाजिक
विषयांवर सडेतोड लिहिण्याचा प्रयत्न करतो... काही लोकांना आवडतं, काहींना
आवडत नसावे, पण आपले मत व्यक्त करत असतो.

तुम्हासारख्या मराठी ब्लॉगर्सचे आणि वाचकांचे प्रेम मिळाले यात खूप
समाधानी आहे. असेच काही-बाही लिहित राहील, वाचत राहा... चुकलो तर चूक
दाखवत जा. तुमचे प्रेम हेच सर्व काही आहे :)

जय महाराष्ट्र!

रविवार, २२ ऑगस्ट, २०१०

एका दादा कोंडकेची नितांत गरज आहे

गेल्या काही दिवसापासून मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपट पुरेश्या प्रमाणात दाखवले जात नाहीत याबद्दल गदारोळ चालू आहे.हा विषय सेनेपासून मनसे आणि मुख्यमंत्र्यापासून मंत्र्यापर्यंत सर्वांच्या दरबारी हजरी लावून आला. मुद्दा भावनिक बनल्याने त्यावर तश्याच प्रतिक्रिया येऊ लागल्या परंतु या विषयावर मराठी निर्मात्यांनी स्वता आत्मचिंतन करायची गरज आहे असे मला वाटते.आपण प्रेक्षकांना योग्य दर्जाचे चित्रपट पुरवतो का ? आपण चित्रपट तयार करण्याबरोबर त्याच्या योग्य मार्केटिंगकडे लक्ष देतो का ? कारण आजचा जमाना मार्केटींगचा आहे. मुळात मराठी चित्रपट लोकांपर्यंत पोहचायला हवा आणि त्यांना आवडायला हवा तरच हा प्रश्न सुटणार आहे.
 नवीन मराठी चित्रपट कधी तयार आणि प्रदर्शित  होतो हे त्या निर्मात्याला आणि त्यात काम करणाऱ्या कलाकारांनाच माहिती असावे असे कधी कधी वाटते काही अपवाद आहेत पण ते बोटावर मोजण्यासारखे. एकतर मराठी चित्रपटांमध्ये   व्यावसायिकतेचा  आणि मार्केटींगचा पूर्णपणे अभाव असतो  हे मागे एकदा महेंद्रकाकांनी आपल्या लेखात नोंदवले होतेच. मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपट पुरेश्या प्रमाणत दाखवले जावेत हि अपेक्षा रास्त असली तरी ते दाखवले गेले तरी चित्रपटासाठी प्रेक्षक कोण पुरवणार हा प्रश्न अनुत्तरीत राहतो कि ती जबाबदारीहि कोणा संघटनेने  किंवा सरकारने घ्यावी अशी अपेक्षा मराठी निर्मात्यांची आहे? ५ - १० प्रेक्षकांच्या जोरावर कोणता मल्टीप्लेक्सवाला किंवा थेटरवाला चित्रपट दाखवणार आहे ? यातून त्या खेळाच्या विजेचे बिल तरी वसूल होते का ? चित्रपट त्या दर्जाचा असेलतर तो राज्याच्या सीमा ओलांडूनही यश संपादन करू शकतो हे दक्षिणात्य चित्रपटांनी दाखवून दिले आहे. आजही इंद्र,शिवाजी द बॉस,मास इत्यादी असे कितीतरी दक्षिणात्य चित्रपट विविध वाहिन्यांवर टीआरपी खेचताना दिसून येतात अशी वेळ मराठी चित्रपटांवर का येत नाही ? कि वाहिन्यांनीही मराठी चित्रपट भाषांतरित करून दाखवावेत यासाठी कोणी आंदोलन करावे अशी मराठी निर्मात्यांची अपेक्षा राहील ?
 सगळेच मराठी चित्रपट निष्कृष्ट दर्जाचे असतात असे माझे मत नाही परंतु सगळेच चित्रपट नटरंग,मी शिवाजीराजे बोलतोय,श्वास अशा चित्रपटासारखे  नसतात त्यामुळे असे उत्कृष्ट चित्रपट तयार होत राहिले तर प्रेक्षक आपोआप पाहतात आणि मल्टीप्लेक्सवाले ते दाखवतातहि. प्रदर्शनानंतर २ दिवसहि तग धरू शकणार नाहीत असे चित्रपट बनवले गेलेतर कोण दाखवणार ?
 काही वर्षापूर्वी अशीच परिस्थिती मराठी चित्रपटांवर आली होती त्यावेळची  दादा कोंडके यांनी कोंडी फोडली होती.रडारडीत अडकलेल्या मराठी चित्रपटात त्यांनी वेगळी जाण आणली होती त्यानाही सुरवातीला संघर्ष करावा लागला परंतु प्रत्येकवेळी नाही त्यांनतर त्यांना आणि त्यांच्या निर्मात्यांना कधीच रडण्याची वेळ आली नाही. दादांचे चित्रपट २०-२५ आठवडे चित्रपटगृहात राहणार असाच नियमच बनून गेला होता आणि त्यांचे चित्रपट दाखवण्यासाठी थेटरमालक स्पर्धा करू लागले होते. त्यामुळे चांगले चित्रपट असतील तर कोणत्याही मल्टीप्लेक्स मालकांना जबरदस्ती करण्याची वेळ येणार नाही.शेवटी मालक धंदा करत असतो त्याला कोणत्याही प्रांतवाद व भाषावाद  यात पडायचे नसते चांगला चित्रपट आणि भरपूर प्रेक्षक द्या मालक चित्रपट निर्मात्यांच्या मागे लागतील.
 प्रेक्षकांचा प्रतिसाद असल्यास कोणत्याही वेळी मराठी चित्रपट दाखवले जातील. त्यामुळे आता मराठी चित्रपटसृष्टीला चांगल्या चित्रपटांची आणि  अशाच एका दादा कोंडकेची नितांत गरज आहे.

जय हिंद
जय महाराष्ट्र

बुधवार, ११ ऑगस्ट, २०१०

क्रांतिकारक खुदिराम बोस

हिंदुस्तानवर जुलमी सत्ता गाजवणाऱ्या ब्रिटीश साम्राज्यावर अलौकिक धैर्याने पहिलावहिला बॉम्ब फेकला.शालेय जीवनातच 'वंदे मातरम' या पवित्र मंत्राने भारावून ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात स्वताला झोकून दिले आणि अवघ्या १८ व्या वर्षात हातात 'भगवदगीता' घेऊन ज्यांनी फाशीच्या खांबाला आलिंगन दिले ,त्या वंगवीर  खुदिराम बोस यांच्या जयंती निम्मित्त त्यांचे पुण्यस्मरण करूयात.
 खुदिराम बोस यांचा जन्म ३ डिसेंबर १८८९ रोजी बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील बहुवैनी या गावी झाला.त्यांच्या वडिलांचे नाव बाबू त्रैलोक्यनाथ बोस व आई लाक्ष्मिप्रीयादेवी.
फेब्रुवारी १९०६ मध्ये मिदनापूर येथे एक औद्योगिक व शेतकरी प्रदर्शन भरले होते.हे प्रदर्शन पाहण्यासाठी आजूबाजूच्या प्रांतातील भरपूर लोक येऊ लागले.बंगालमधील एक क्रांतिकारक सत्येंद्रनाथ यांनी लिहलेल्या 'सोनार बांगला' या जहाल पत्रकाच्या प्रती खुदिराम यांनी या प्रदर्शनात वाटल्या.पोलीस शिपाई त्यांना पकडण्यासाठी धावला.खुदिराम यांनी त्या शिपायाच्या तोंडावर ठोसे मारले आणि  शिल्लक  राहिलेली पत्रके काखेत मारून ते त्य्नाच्या हातून निसटून गेले.याप्रकरणी राजद्रोहाच्या आरोपावरून सरकारने त्यांच्यावर अभियोग भरला;परंतु खुदिराम त्यातून निर्दोष सुटले!
 किंग्जफोर्डला ठार मारण्याच्या कामगिरीसाठी निवड -
मिदनापूर इथे 'युगांतर' या क्रांतिकारकाच्या गुप्त संस्थेच्या माध्यमातून खुदिराम क्रांतिकार्यात ओढले गेले.१९०५ साली लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली.या फाळणीच्या विरोधात असणार्या अनेकांना त्या वेळचा कोलकात्याच्या म्याजीस्ट्रेट किंग्जफोर्ड याने क्रूर शिक्षा ठोठावल्या होत्या.अन्य प्रकरणात हि त्याने हिंदी क्रांतिकारांना खूप छळले होते. याच सुमारास किंग्जफोर्डला बढती मिळून तो मुझ्झफरपूर येथे सत्र न्यायाधीश म्हणून कामावर रुजू झाला.सरतेशेवटी 'युगांतर' समितीच्या एका गुप्त बैठकीत किंग्जफोर्डलाच ठार मारायचे ठरले.यासाठी खुदिराम व प्रफुल्लकुमार चाकी यांची निवड करण्यात आली.


खुदिराम यांना  एक बॉम्ब आणि रिव्हॉल्वर देण्यात आले.प्रफुल्लकुमार यानाही एक रिव्हॉल्वर देण्यात आले.मुझ्झफरपुरला आल्यावर या दोघांनी किंग्जफोर्डच्या बंगल्याची टेहळणी  केली.त्यांनी त्याची चारचाकी व तिच्या घोड्याचा रंग पाहून घेतला.खुदिराम तर त्याच्या कार्यालयात जाऊन त्याला नीट पाहूनही आला!
 ३० एप्रिल १९०८ रोजी हे दोघे नियोजित कामगिरीसाठी बाहेर पडले आणि किंग्जफोर्ड च्या बंगल्याबाहेर घोडागाडीतून त्याच्या येण्याची वाट पाहू लागले.बंगल्यावर टेहळणीसाठी असलेल्या २ गुप्त अनुचारानी त्यांना हटकले,पण त्यांना योग्य ती उत्तरे देऊन ते तेथेच थांबले.
 हिंदुस्तानातील पहिल्या बॉम्बचा स्फोट-
रात्री साडेआठच्या सुमारास क्लबकडून किंग्जफोर्डच्या गाडीशी साम्य असणारी गाडी दिसताच खुदिराम गाडीमागून धावू लागले.रस्त्यावर खूपच अंधार पडला होता.गाडी किंग्जफोर्डच्या बंगल्यासमोर येताच त्यांनी दोन्ही हातानी बॉम्ब वर उचलला व नेम धरून पुढील चारचाकीवर जोराने आदळला. हिंदुस्तानातील या पहिल्या बॉम्बस्फोटाचा आवाज त्या रात्री तीन मैलापर्यंत ऐकू गेला आणि काही दिवसातच त्याचा आवाज इंग्लंड, युरोपलाही ऐकू गेला!
 खुदिराम यांनी किंग्जफोर्ड ची गाडी समजून बॉम्ब टाकला होता.पण त्या दिवशी तो थोड्या उशिराने क्लबबाहेर पडल्यामुळे वाचला.दैवयोगाने गाड्यांच्या साधर्म्यामुळे दोन युरोपियन स्त्रियांना आपले प्राण गमवावे लागले! रातोरात खुदिराम व प्रफुल्लकुमार दोघेही २४ मैलावरील वैनी रेल्वेस्थानकापर्यंत अनवाणी धावत गेले.
 दुसर्या दिवशी संशयावरून प्रफुल्लकुमार चाकींना पोलीस पकडण्यासाठी गेले तेंव्हा त्यनी स्वतावर गोळी झाडून घेतली व प्राणार्पण केले.खुदिराम  यांना पोलिसांनी अटक केली.या ताकेचा शेवट ठरलेलाच होता.
 ११ ऑगस्ट १९०८ रोजी भगवदगीता हातात घेऊन खुदिराम धैर्याने व आनानदी वृतीने फाशी गेले!
 किंग्जफोर्ड ने घाबरून नोकरी सोडली आणि ज्या क्रांतीकारकांना त्याने छळले त्यांच्या भीतीने तो लवकरच मरण पावला! त्याचे नावनिशानही उरले नाही.
 खुदिराम मात्र मरूनही अमर झाले !
(साभार-स्थानिक वर्तमानपत्र )

शनिवार, २४ जुलै, २०१०

क्षमस्व महाराज क्षमस्व....

होय महाराज, आम्हाला उदार  अंतकरणाने  माफ करा; कारण आम्ही कोडगे आणि लाजलज्जा कोळून प्यायलेले बेशरम मराठी लोक आहोत.आम्ही अत्यंत निर्ढावलेले नालायक भारतीय आहोत.आम्हाला तुमचे कर्तुत्व पुढे चालीवता आले नाही;पण तुमच्या त्या महान कर्तबगारीचा सन्मान व प्रतिष्ठा राखणेसुद्धा अशक्य झाले आहे.आम्ही इतके आत्मकेंद्री आणि svarthane गडबडून गेलो आहोत,कि आमचा पूर्वज,आमचे दैवत असलेल्या तुमच्यावर कोणीही गरळ ओकावी इतके आजाराक तुमच्या या हिंदुस्तानात आज माजले आहे.तुम्ही ज्याचा कोथळा बाहेर काढलात त्या अफझलखानाच्या प्रतिष्ठेला या देशात आज धक्का लागू शकत नाही;पण महाराज आपली प्रतिष्ठा पायदळी तुडविण्याचा मुलभूत अधिकार कोणालाही असू शकतो;कारण तुमचे नाव आता स्वाभिमानाशी ,कर्तव्याशी जोडले नसून स्वार्थासाठी ते चलनी नाणे झाले आहे.कुणासाठी तुम्ही मराठा जातीचे तर कुणासाठी तुम्ही कुणबी असता.कुणासाठी मराठी तर कोणासाठी हिंदू असता.या देशाचा उदगाता  म्हणून तुमची कोणाला ओळख राहिलेली नसावी.नाही तर लेनच्या अधिकारासाठी कोर्टात धावणारे इथे कशाला निपजले असते? मराठा म्हणून सत्तेवर हक्क सांगणारे किंवा शिवाजीवर अधिकार सांगणारे आज आम्हाला न्यायालयाचा सन्मान राखण्याचा सल्ला देत आहेत.महाराष्ट्रात शिवाजीबद्दल अभिमान बाळगणे अथवा त्या राजाच्या अवमानाने प्रक्षुब्ध होणे आक्षेपार्ह ठरिवले जात आहे.त्यावर न्यायालयाची मान्यता मिळवली जात आहे.त्या आम्हा मराठ्यांना वा मराठी माणसाना तुमचे नाव घेण्याचा अधिकार तरी उरतो काय ? महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे आणि त्यात मराठीचा अभिमान बाळगणे गुन्हा आहे.महाराष्ट्र शिवरायांचा आहे आणि तिथे त्या राष्ट्रपुरुषाचा अवमान ,अप्रीतीष्ठेला विरोध करणे हा अपराध झालेला आहे.मग महाराज, आम्ही कुठल्या तोंडाने तुमचे नाव घ्यायचे ? तुमचा  जयजयकर तरी करायचा अधिकार आम्हाला उरतो काय ?
 पन्नास साठ वर्षात या देशाची वैचारिक व बौद्धिक घसरगुंडी किती झाली असावी ? जे आदर्श आणि अभिमानाच्या खुणा आहेत त्यांचाच गर्व बाळगणे आता गुन्हा झाला आहे.कोणीही यावे आणि आमच्या अभिमानाला,स्वाभिमानाला लाथ मारावी इतकी स्वातंत्र्याची गटारगंगा दुथडी भरून वाहू लागली आहे.ज्या अभिमानाने या देशाला पारतंत्र्यातून मुक्त केले तीच प्रेरणा आज कवडीमोल झाली आहे.कुठली तरी कंपनी विमानतळाचे पुननिर्माण करते आणि तिथला शिवरायांचा पुतळा अडगळ हलवावी त्याप्रमाणे इतरत्र उचलून नेण्याचे मनसुबे रचते.कुणी अमेरिकन शहाणा इतिहासाचा अभ्यास करायला येतो आणि आमच्या दैवतावर चिखलफेक करून निघून जातो.तुमच्या पराक्रमाचे चित्र फलकावर लावले तर त्याच्यावरही आमचेच राज्यकर्ते bandi घालतात.त्या अफझलखानाच्या प्रतिष्ठेची कायद्याला च्न्ता आहे.शिवरायांची बदनामी करणार्याच्या अविष्कार स्वातंत्र्याला इथे कायद्याचे संरक्षण आहे;पण ते स्वातंत्र्य कोठून आले.कोणामुळे आले,कुठल्या प्रेरणेने मिळू शकले,याचेही स्मरण कुणाला उरलेले नाही.त्याच स्वातंत्र्याने अविष्कार स्वातंत्र्य राज्य घटनेत समाविष्ट होऊ शकले.आज तेच अविष्कार स्वातंत्र्य वापरून कशावर घाला घातला जातो आहे? शिवराय या नावाच्या एका ज्वलंत राष्ट्रीय प्रेरणेवर हल्ला झाला आहे.ती प्रेरणा मारली गेली,निष्प्रभ झाली तर स्वातंत्र्याला ग्लानी यायला वेळ लागणार नाही.तसे झाले तर मग कुणाला अविष्कार स्वातंत्र्यहि उपभोगता येणार नाही;कारण राष्ट्रीय स्वातंत्र्याला बाधा आणणारे स्वातंत्र्य घातक असते. शिवरायांची बदनामी हा केवळ मराठी -मराठ्यांचा विषय नसून भारतीय स्वातंत्र्याची उपजत प्रेरणा आहे.तिच्यावर हल्ला राष्ट्रविघातक ठरल्याशिवाय राहणार नाही.
  जेम्स लेनचे हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर शिवसेना, संभाजी ब्रिगेड यासारख्या संघटनांनी हुल्लड माजवली होती.म्हणून  त्यांच्यापुरता विषय नाही,तो फक्त महाराष्ट्राचा विषय नाही,कारण साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी नावाचा झंझावात उभा राहिला तो महाराष्ट्राला मुक्त करण्यापुरता नव्हता.त्याने अटकेपार झेंडे लावले.तंजावर पासून दिल्लीपर्यंत धडक मारली.त्यामुळेच आज हिंदू किंवा भारतीय म्हणवणारे सन्मानाने जगू शकत आहेत.तेंव्हा शिवाजी या शब्दाशी प्रत्येक भारतीयाचा आत्मसन्मान जोडलेला आहे.तो कायद्याचा किंवा न्यायालयाचा विषय नाही.सरकारने असल्या पुस्तकावर बंदी घालायलाच नको होती.आम्हा भारतीयांच्या भावनाच इतक्या तीव्र हव्यात,कि असे पुस्तक छापण्याची व विकण्याची कोणाला हिम्मत होता कामा नये.ज्यांनी चार वर्षापूर्वी याप्रकरणी रस्त्यावर उतरण्याचे धाडस केले त्यांनी एक अतिशय गंभीर चूक केली होती.सरकारने त्यावर बंदी घालण्याची अपेक्षा चूक होती आणि न्यायालाने ती चूक ठरवली आहे.लोकांच्या भावना व श्रद्धा हा सरकार व कायद्याचा विषय नसतो आणि असता कामा नये.तो सामान्य माणसाने स्वताच निकालात काढायला हवा.आम्हा शिवप्रेमी,शिवभक्तांच्या भावना इतक्या प्रखर हव्यात ,कि कुणा पुस्तकाच्या दुकानदार,विक्रेत्याला असे पुस्तक जवळ बाळगण्याची भीती वाटायला हवी.हे सत्य शिवप्रेमी म्हणून मिरवणारे विसरून गेले.तिथेच सगळी गफलत  झाली आहे.शिवरायांनी दिल्लीश्वराकडे न्याय मागितला नव्हता.त्यांनी न्याय मिळवला होता.आपली ताकद अशी सिद्ध केली ,कि अन्याय करू पाहणार्याची हिम्मत खचली होती.शिवाजी या नावाबद्दल,व्यक्ती व कर्तुवाबद्दल आस्था असलेले ती ताकद दाखवणार आहेत काय ?तरच त्यांना व आम्हा भारतीयांना शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार असेल.तो अधिकार आपण सिद्ध करणार काय ????
 जेम्स लेनच्या पुस्तकावरील बंदी उठवली गेली त्यानंतर  ४-५ दिवस त्यावर चर्चा झाल्या, निषेध व्यक्त करण्याचा कार्यक्रम झाला परत सर्व शांत सर्वजण  आपापल्या कामात दंग झालेआहेत परंतु हा तोरसेकरांचा  लेख माझ्या मनाला  अस्वस्थ करून गेला आहे.मी फक्त एवढेच म्हणू शकेल क्षमस्व महाराज क्षमस्व.

सोमवार, ५ जुलै, २०१०

पाऊले चालती पंढरीची वाट ....

लाखो भक्तांच्या  साक्षीने हजोरो वारकरी पंढरीची वाट चालू लागले आहेत.आषाढ म्हंटले कि अवघ्या वारकरी संप्रदाय आणि मराठी जणांना आषाढ  वारीचे वेध लागतात.देहू आणि आळंदी हून संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघताच त्यांच्याबरोबर वारकरी आणि भक्तांचा   अथांग सागर टाळ-चिपळ्याच्या निनादात,विठूनामाचा जयघोष करीत पंढरीची वाट धरतो.राज्याच्या कानाकोपऱ्यातून  नह्वे  तर परराज्यातून काय तर परदेशातूनही लोक या वारीत सामील होत असतात.
 उण, वारा,पाऊस याची तमा न बाळगता अनेक चढउतार पार करत वारकरी पंढरीची वाट चालत असतो परंतु चालताना चालेला विठूनामाचा जयघोष त्यांना स्वर्गीय सुखाची प्राप्ती करून देत असतो.विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलेल्या वारकर्यांना अशा संकटांची तमा नसते.अशी तळमळ,ओढ,प्रेम,निष्ठा दुसरीकडे क्वचितच पाहण्यास मिळत असावी.
 कोणतेही निमंत्रण नाही आग्रह नाही सर्व लोक स्वइच्छेने स्वखुशीने आणि स्वखर्चाने या वारीत  सामील होत असतात. एका ध्येयाने इतका मोठा लोकसमूह एकत्र येऊन इच्छित स्थळी सुव्यवस्थितपणे एकमेकांना सहकार्य करत शिस्तीत पोहचतो खरच कमालीची गोष्ट आहे. ना  त्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जाऊन व्यवस्थापनाचे धडे घेतलेले असतात न त्यांना कोणी शिकवणारे असते.अबालवृद्ध ,शिक्षित,अडाणी,गरीब,श्रीमंत सर्वच यात सामील होतात.
 अशा या  पंढरीच्या वारीचा एकदातरी अनुभव घ्यायलाच हवाच :)

रविवार, ४ जुलै, २०१०

पाऊसाच्या आठवणी ....

  गेल्या  १०-१५ दिवसापासून  पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.मस्त पाऊस पडत आहे.कोणाला पावसात चिंब भिजायला आवडते तर कोणाला  घरात बसून पावसाचा आनंद घेण्यात मजा येते.पाऊस म्हंटले कि गरम भजी आणि गरम गरम चहा हा आपला आवडता मेनू.प्रत्येकाचा पाऊस साजरा ?? करण्याचा प्रकार वेगवेगळा असतो.काही जुन्या आठवणी असतात काही मित्रांबरोबरच्या किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या सहवासाच्या अशाच काही खास आठवणी आपण आपल्या मराठी ब्लॉग विश्वातील मित्र आणि वाचकांबरोबर शेअर केल्या तर ?. कशी वाटते कल्पना ????
 प्रत्येकाच्या मनाच्या तिजोरीत पावसाळ्याच्या आठवणी ह्या साठ्लेल्याच असतात चला तर हा आठवणींचा कप्पा आपल्या हौसी वाचकांसाठी खाली करूयात :)
(कृपया वाचकांनी आपल्या आठवणी प्रतिक्रियेच्या रुपात शेअर कराव्यात हि विनंती )

शनिवार, ३ जुलै, २०१०

कोबाद... 'गांधी'????


मणि रत्नम यांचा 'रावण' प्रदर्शित होण्यापूर्वी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिला.सर्वानाच वाटत होते कि अभिषेक बच्चन हा रामायणातील रावणाची भूमिका साकारत असावा परंतु नंतर त्याची भूमिका माओवादी नेता कोबाद गांधी याच्या जीवनावर आधारित आहे असे ऐकण्यात आले.त्याबद्दल बऱ्याच वृत्तपत्रातहि वाचण्यात आले.त्यावेळी कोण हा कोबाद गांधी याची उस्तुकता निर्माण झाली कारण आतापर्यंत आपण फक्त महात्मा गांधीबद्दल जाणत होतो जास्तीत जास्त इंदिरा गांधी,राजीव गांधी मग हा नवीन गांधी कोण असा प्रश्न मनात घर करून बसला आणि थोडेसे त्याच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर खूपच धक्कादायक गोष्टी समोर आल्या.  नक्षलवादी, माओवादी म्हंटले कि सहसा दुर्गम भागातील गोरगरीब आणि त्यांची सरकार विरोधी चळवळ असेच चित्र सहसा आपल्या डोळ्यासमोर येते परंतु कोबाद गांधीचे तसे नाही तो एक सुशिक्षित आणि श्रीमंत घरातील होता अशी माहिती उजेडात आली.
 कोबाद गांधी याचा जन्म मुंबईतला त्याचे वडील GLAXO  या कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी होते.जन्मापासूनच सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या या कोबाद गांधीचे वरळी सिफेजला अलिशान घर आहे.त्याचे प्राथमिक शिक्षण DOON स्कूल मध्ये झाले ज्या ठिकाणी संजय गांधी त्याचे वर्गमित्र होते.त्यानंतर त्याने  St. Xavier's कॉलेजमध्ये आपले  उर्वरित शिक्षण पूर्ण केले.तसेच त्याने CA ची पदवी लंडन येथून घेतली.आता या सर्व गोष्टी काही सामान्य लोकांच्या बस कि बात नाही हे लक्षात आले असेलच.
 लंडन येथे शिक्षण घेत असतानाच त्याचा राजकारणाशी संबंध आला आणि तो डाव्या विचारसरणीच्या लोकांच्या संपर्कात आला.मुंबईला परत आल्यानंतर  तो आपल्या पत्नीसह नागपूरला स्थायिक झाला.पत्नी अनुराधा हि उच्चशिक्षित मानसशास्त्राची प्राध्यापक होती.नागपूरला जाऊन त्यांनी गोरगरीब,महिला यांच्या न्यायहक्कांसाठी लढा देण्याचे ठरवले होते आणि त्यातूनच ते नक्षलवादाकडे वळले.
कोबाद गांधी यांच्यावर कोंडापल्ली  सीथारामैः  याचा प्रभाव होता ज्यांना त्यांची चळवळ तामिळनाडू आणि महाराष्ट्र इथे वाढवायची होती.८० च्या दशकानंतर तो  टी. नागी रेड्डी यांच्या बरोबर काम करू लागला .कोबाद गांधीला २००९ मध्ये दिल्ली  येथे उपचार चालू असताना अटक करण्यात आली.
कोबाद गांधी ह्याने माओवादी चळवळ ग्रामीण भागातून शहरी भागात आणली तसेच त्याने या चळवळीला आधुनिक रूपही दिले नवनवीन तंत्रज्ञान नक्षलवादी चळवळीत  आणण्यात कोबाद गांधीचा मोठा वाटा आहे.
हि माहिती नेटवरून गोळा केल्यावर मला खरच खूप धक्का बसला अशी सुशिक्षित माणसेहि अशा कारवायांत कशी काय अडकली जातात नक्की काय परिस्थिती त्यांना यात ओढत असेल असे प्रश्न मनात येऊन गेले.आज दंतेवाडा सारखे प्रकार घडले कि त्यामागे अशाच सुशिक्षित कुरकर्माचे डोके असणार  याची जाण होते आणि तळपायाची आग मस्तकात जाते.
आपल्या देशात एक महात्मा 'गांधी' होऊन गेले जे अहिंसेची शिकवण देत होते आणि हे आजचे 'गांधी' ज्यांना अहिंसा म्हणजे काय हेच माहिती नसावे.

शुक्रवार, २ जुलै, २०१०

मनोज तिरोडकर ...नाम तो सुना होगा

मनोज तिरोडकर वय वर्ष ४५ एक अस्सल मराठी माणूस.भारताचा भावी सर्वात श्रीमंत उद्योगपती.एकूण संपत्ती ५७० दशलक्ष डॉलर .तिरोडकर यांचे  नाव ऐकले नाही असा माणूस किमान नेटवर तरी भेटणे आता मुश्कील झाले आहे .तिरोडकर यांच्या GTL इन्फ्रा या कंपनीने अनिल अंबानी यांच्या टेलिकॉम कंपनीला ताब्यात घेतले आहे आणि हा व्यवहार साधारण ५० हजार कोटी रुपयांच्या घरात असेल.  फोर्बच्या भारतीय श्रीमंतांच्या यादीत हा मराठी माणूस सध्या ८४ व्या क्रमांकावर आहे.नाही आपल्या मराठी माणसाला असल्या यादीत नाव यायची सवय नाही आणि वाचायचीही.बाकी दुबईस्थित दातार यांच्याबद्दल ऐकून आणि वाचून होतो ते मराठी असले तरी सध्या आपल्या देशात नाहीत .
 तर असे हे मनोज तिरोडकर हे एक पुणेकर आहेत.(हे वाचून सर्व पुणेकरांची कॉलर ताठ होणार यात वाद नाही ;) ) तिरोडकर  यांच्याबद्दल काही दिवसांपूर्वी सकाळमध्ये वाचण्यात आले होते तेंव्हापासून त्यांच्याबद्दल एक आकर्षण निर्माण झाले होते नंतर AIRCEL बरोबरच्या कराराची बातमी आली  आणि त्यानंतर थेट रिलायंसची बातमी आली आणि सर्व जगाचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले, नेहमीप्रमाणे आपल्या मिडीयाने याला जास्त महत्व दिले नाही परंतु तिरोडकर मराठी असल्याने IBN लोकमत या वाहिनीने त्यांची मुलाखत घेतली ती पाहण्याचा योग आला.तिरोडकर यांच्या बोलण्यातून  अस्सल मराठीपण जाणवत होते.उगाच दिखावा म्हणून इंग्रजी व हिंदी भाषेचा वापर नाही.किंवा केल्याला कामगिरीचा गर्व नाही.सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे देत होते.त्यांच्या कंपनीचे सर्व टोवर पुढील ३ वर्षात  हरित म्हणजे इको फ्रेंडली करण्याचा त्यांनी बोलून दाखवलेला मानस खरच वाखण्याजोगा होता आणि त्यामागील सामाजिक बांधिलकीची जाण हि दिसून येत होती.
 मनोज तिरोडकर यांचे वडील  शिपिंग व्यवसायमध्ये होते.वडिलांच्या कंपनीत काम करता करता तिरोडकर यांनी १९८७ मध्ये स्वताची GLOBEL TELECOM हि कंपनी सुरु केली.आज ती जगातील सर्वात मोठी टेलिकॉम टोवर कंपनी आहे.( कंपनीच्या नावात GLOBEL हा शब्द त्यांनी का वापरला असावा याचा प्रत्यय आला असेलच )  तसेच ते पहिले भारतीय उद्योगपती आहेत ज्यांना  “World Young Business Achiever Award 2000” हा पुरस्कार मिळाला आहे.
 तर अशा या मराठी माणसाबद्दल मिडिया जरी दोन हाथ लांब असला तरी आपल्या मराठी ब्लॉग विश्वाने मागे का राहायचे? म्हणून हा प्रपंच बाकी मराठी असल्याचा अभिमान तर असणारच न राव :)
मनोज तिरोडकर यांची अशीच प्रगती होत राहो आणि हा मराठी माणसाचा झेंडा देशातच नव्हे तर विदेशातही शानसे फडकत राहो हीच शुभेच्छा .
जय हिंद
जय महाराष्ट्र
जय तिरोडकर

गुरुवार, १ जुलै, २०१०

महागाई, बंद आणि असंवेदनशील सामान्य माणूस


केंद्र सरकारने काही दिवसापूर्वी पेट्रोल,डीझेल,रॉकेल इ. वस्तूंची भाववाढ केली.त्यामुळे महागाईचा भडका उडणार अश्या प्रतिक्रिया यायला लागल्या.रिक्षाभाडे  वाढले सुद्धा.वेगवेगळी आंदोलने  आणि मोर्चे निघत असल्याच्या बातम्या येत आहेत, आता तर भाजप आणि विरोधी पक्षांनी या निर्णयाच्या विरोधात भारत बंदची हाक दिली आहे.त्याला कसा प्रतिसाद भेटेल माहिती नाही. परंतु एक गोष्ट यात लक्षात घेतली का ज्या सामान्य माणसाचे या महागाईने कंबरडे मोडले आहे असे बोलले जात आहे त्या सामान्य माणसाला खरच या गोष्टींचा फरक पडला आहे ? त्यांच्यात याबद्दल चीड किंवा उद्रेकाची भावना जाणवते  आहे का ? तर उत्तर नाही असेच आहे कोणालाहि याचा फरक पडला आहे असे वाटत नाही कोठेही सामान्य माणूस या विरोधात चवताळून उठला आहे असे दिसून आले नाही.
 राजकीय पक्ष,वृतपत्रे आणि प्रसारमाध्यमे जेवढ्या बोंबा मारत आहेत तेवढा आवाज सामान्य माणूस नक्कीच मारत नाही.आंदोलने करणारे राजकीय पक्ष आणि हसत हसत घोषणा देत फोटो देणारे आंदोलक,टी.व्ही.समोर  मुलखाती देणारे नेते आणि त्यांचे दिसणारे कार्यकर्ते यांना सोडल्यास बाकी कोणाला या महागाईचा फटका बसलाय असे दिसत नाही.जेवढ्या बातम्या आणि त्यावर पेपरमध्ये अग्रलेख आले आणि त्यातून सामान्य माणसाना चटके बसत आहे असे सांगण्यात आले त्या सामान्य माणसाला चटका बसला आहे का ? नाही कारण चटका बसल्यावर माणूस झटका देतो,चवताळून उठतो,शिव्या घालतो पण असे कोठे दिसून आले नाही.
 मग असा प्रश्न पडतो कि खरच हि महागाई सामान्य माणसाचे कंबरडे मोडणारी आहे का ?आणि असेल तर सामान्य माणसे अशी शांत  ,बधीर का ?
आजकाल सामान्य माणूस  असंवेदनशील झाल्यासारखा  वाटत आहे.त्यांना स्वतावर होणाऱ्या अन्यायाची चीड येत नाही.त्यांच्याकडून कोणतीही उस्फुर्त प्रतिक्रिया येताना दिसत नाही.मग ती महागाई  असो वा महिलांवर झालेले अन्याय असोत,बलत्कार,दंगली असोत  सामान्य माणसाला याचे काही सोईरसुतक राहिले आहे असे वाटत नाही.सरकार तर असंवेदनशील आहेच हे दंतेवाडा आणि काश्मीर यासारख्या घटनांवरून दिसून येतच आहे पण सामान्य माणसे हि अशीच वागू लागलीतर अशा गोष्टीना कोण आळा  घालणार?
पूर्वीच्या काळी अशी परिस्थिती नाह्वती त्यावेळी लोकांकडून सामान्य माणसांकडून अशा गोष्टींच्या विरोधात प्रक्षोभ उठायचा आंदोलने ह्वायची आणि त्याची दखल  सरकारला घ्यावी लागायची आता अशी दखल घेण्याजोगी प्रतिक्रिया सामान्य माणसांकडून येत नाही.याचे कारण काय असावे ?
कि खरच आता सामान्य माणसे असंवेदनशील झाली आहेत????

सोमवार, २८ जून, २०१०

कोणासारखे काय करावं ????

राज्य करावं तर शिवाजी महाराजां सारखं  .
शूर असावं तर राणा प्रतापसारखं.
स्वामिनिष्ठ असावं तर खंडो बल्लाळासारखं.
देशभक्त असावं तर भगतसिंगसारखं.
कारस्थानी असावं तर आनंदीबाईसारखं .
हुशार असावं तर बिरबलासारखं .
धाडसी असावं तर डॉ.आनंदी जोशीसारखं.
करिअर करावी तर लता  मंगेशकरसारखी.
सगळ्यांच्या गळ्यातील ताईत ह्वाव तर सचिन तेंडूलकरसारखं.
सत्तेला चिकटून रहाव तर शरद पवारांसारख.
राजकीय पक्ष बदलावेत तर सुब्रमन्यम स्वामीसारखं.
बेसूर गाव तर अलिशा चिनॉयसारखं.
समस्त लोकांना उल्लू बनवावं तर ललित मोदीसारखं.
अष्टपैलू लेखक असावं तर जयवंत दळवीसारखं.
देशाला ललामभूत ह्वाव तर बिल गेट्ससारखं.
निरलस सेवार्थी ह्वाव तर डॉ.तात्यासाहेब लहानेसारखं.
शब्दांचे बुडबुडे फोडावेत तर कॉंग्रेससारखं.



राष्ट्रभाषेचे धिंडवडे काढावेत तर ममता बनेर्जीसारखे.
लग्न न करता नुसतच बिनधास्त बरोबर रहाव तर बिपाशा बसूसारखं .
लग्नाशिवाय झालेली मुलगी खुल्लम खुल्ला वाढवावी तर नीना गुप्तासारखी.
खमक्या असावं तर लालू प्रसादसारखं.
लफडेबाज असावं तर टायगर वूड्ससारखं.
लग्न करावीत तर एलिझाबेथ टेलरसारखी.
उद्योगपती ह्वाव तर टाटासारखं.
सहकुटुंब यशस्वी ह्वाव तर अमिताभ बच्चनसारखं.
अनाकलनीय लिहाव तर ते ग्रेससारखं.
व्यंगचित्रे काढावीत तर ती आर.के.लक्ष्मणसारखी.
बाराच्या भावात जाव तर राजेश खन्नासारखं .
गझल गावी तर मेहंदी हसनसारखी.
घर असावं तर मुकेश अंबानीसारखं.
बायको असावी तर अभिषेक बच्चनसारखी.
चालीचा चोर असावं तर अन्नू मलिकसारखं.
भ्रष्टाचारी असावं तर इंडियन मेडिकल कौन्सिलचा अध्यक्ष केतन देसाईसारखं.
बोलबच्चन असावं तर अरुण जेटलीसारखं.
प्रेमवीर असावं तर शोऐब मलिकसारखं.
निर्ल्लज कामांध असावं तर किचकासारखं किंवा शायनी आहुजासारखं.
प्रेक्षक नाहीत हे कळून सुद्धा सिनेमे काढावेत तर देव आनंदसारखं.
बाईने रूपवान व 'ग्रेसफुल' असावं तर गायत्री देवीसारखं.
बाईन कस नसाव तर राखी सावंतसारखं .
निर्विष विनोद करावा तर पु.ल.देशपांडेसारखा.
लग्न करून सुखी ह्वाव तर माधुरी दीक्षितसारखं.
लग्न करून दुखी ह्वाव तर अदनान सामीसारखं.
दुसरी बायको करायची तर हेमा मालीनिसारखी.
त्रेचाळीस वय झाल तरी देवाच्या नावावर सोडलेल्या बोकडासारखं बकऱ्यांच्या
मागे उंडरत फिरायचं तर सलमान खानसारखं.
बाबा आदमच्या जमान्यात लिहलेल्या एका कादंबरीच्या जीवावर मिशीला तूप लावून फिरायचं तर भालचंद्र नेमाडेसारखं.
बाबा आदमच्या जमान्यात काढलेल्या एका चित्रपटाच्या जीवावर आजही टेचात फिरायचं तर रामदास फुटाणेसारखं.
आनंदात व उत्साहात जगायचं तर यशवंत देवांसारखं.
रडत आणि कटकट करीत जगायचं तर माझ्यासारखं.

(सौजन्य- शिरीष कणेकर यांचा 'सामना' मधील लेख)
      
         

गुरुवार, १० जून, २०१०

फुटबॉलचा कुंभमेळा

जगाला वेड लावणाऱ्या फुटबॉल विश्वकपाची सुरवात उद्यापासून होत आहे
या उत्सवाची मी गेली चार वर्ष आतुरतेने वाट पाहत होतो..तसे पाहण्यास गेले तर हा विश्वकप पाहण्याची माझी हि तिसरी वेळ या आधीचे दोन विश्वकप आम्ही मित्रांनी रात्री जागून मस्ती करत पहिले आहेत.फुटबॉल विश्वकप पाहण्याच्या जो आनंद आहे तो दुसर्या कशातच नाही अगदी क्रिकेट विश्वकपापेक्षा मला याची जास्त नशा आहे.
यावेळी  फुटबॉल विश्वकप प्रथमच आफ्रिकेत होत आहे.सहा खंडातून ३२ सर्वोत्तम संघ यावेळी सामील होत आहेत आणि ते जगाला वेड लावण्यास सज्ज झाले आहेत.



 विश्वकप कोण घेऊन जाणार याची उस्तुकता असली तरी यातील प्रत्येक सामना डोळ्याचे पारणे फेडणारा असणार आहे.ब्राझील,आर्जेन्टिना,इटली,स्पेन,जर्मनी,इंग्लंड,फ्रांस,पोर्तुगाल इ. संघातील फुटबॉलपटूचा खेळ पाहण्यासाठी जगभरातील फुटबॉलप्रेमी टीव्हीसमोर नजरा लाऊन बसणार आहेत.प्रत्येकाचे डावपेच आणि खेळण्याची शैली भिन्न असलीतरी आकर्षक असणार आहे.आफ्रिकन फुटबॉलपटूची खेळण्याची पद्धत,राहणीमान अगदीच अलग असते तसेच गोल केल्यानंतर त्यांच्या स्टाइलमध्ये केलेला नाच तर पाहण्यासारखाच असतो एकदम हटके...
 फुटबॉल विश्वकप कोण घेऊन जाणार याची जेवढी उस्तुकता असते तेवढीच उस्तुकता 'गोल्डन बूट' चा मानकरी कोण ठरणार याबद्दल फुटबॉलप्रेमीना असते सर्वात जास्त गोल करणाऱ्या फुटबॉलपटू या पुरस्काराचा मानकरी ठरतो.काका,मेस्सी,रुनी,रोनाल्डो यासारखे स्टार खेळाडू या पुरस्काराच्या स्पर्धेत असलेतरी कोणीतरी अनपेक्षित खेळाडूच या पुरस्काराचा मानकरी होतो हा आतापर्यंतचा  अनुभव आहे.त्यामुळेच या पुरस्काराबद्दल लोकांच्यात खूप उस्तुकता असते.१९३० पासून 'गोल्डन बूट' हा पुरस्कार देण्यास सुरवात झाली आहे.यावेळी कोणी स्टार खेळाडू हा पुरस्कार पटकावतोय   कि एखादा अनेपक्षित खेळाडू याचा मान मिळवतोय हे थोड्याच दिवसात कळून येईल.
तर चला तयार होऊयात यंदाच्या ३२ संघातील ७३६ खेळाडू महिनाभर चालणाऱ्या फुटबॉलच्या कुंभमेळ्यासाठी 'याची देही याची डोळा' पाहण्यासाठी ....


शुक्रवार, ३० एप्रिल, २०१०

गर्जा महाराष्ट्र माझा.......

१ मे महाराष्ट्राचा जन्मदिन त्याच महाराष्ट्र राज्याचा सुवर्ण महोत्सव साजरा होत आहे. हुतात्म्यांच्या बलिदानातून, असंख्य वीरांच्या रक्तसिंचनातून मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्माण झाले.सुवर्ण  महोत्सव साजरा करताना १०५ हुतात्म्यांच्या बलिदानाचे हि स्मरण करू  आणि त्यांना अभिवादन करून हा सुवर्ण महोस्तव जल्लोषात साजरा करूयात.



हे राज्य ह्वावे हि तो श्रींची इच्छा
छत्रपती शिवरायांना ती उमगली होती
प्रत्यक्षात उतरवायला
१ मी १९६० ची पहाट उगवली होती.

महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवानिम्मित्त लक्ष लक्ष भगव्या शुभेच्छा.

सोमवार, १२ एप्रिल, २०१०

'बबन नाव्ही तंगाट'

Lazy Drinker - Borracho huevónशीर्षक वाचून हादरलात का ? एवढे हादरण्याची गरज नाही सांगतो सगळे इस्कटून ;)
काही लोकांना 'तंगाट' या शब्दाचा अर्थ माहिती असावा परंतु कोणाला माहिती नसेल त्यांच्यासाठी तंगाट म्हणजे 'दारूपिऊन टल्ली झालेला' हा जरा गावाकडचा शब्द आहे तो सर्वाना माहितीचा असेल असे नाही असो
तर काय झाले सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत मुलांच्या परीक्षा  हि संपत आल्या आहेत आणि परीक्षा  झाल्या रे झाल्या कि मामाच्या गावाला जायचे हे आमचे एकमेव ध्येय असायचे याची आठवण झाली आणि काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या. लहानपणी मी जेंव्हा मामाच्या गावाला जायचो तेंव्हा (उन्हाळ्याच्या सुट्टीत सहसा) त्यावेळी आमचे प्रताप माहिती असल्याने(तसे प्रत्येकजन लहानपणी प्रतापीच असतो म्हणा ) मामा आम्हाला आजोबांच्या आदेशाने पहिल्यांदा केस कापण्यासाठी बबनच्या केशकर्तनालयात  घेऊन जायचा. केस कमी करू या नावाखाली आमचा 'चमनगोटा ' केलेला असायचा.परंतु असे केल्याने आपल्याला पाण्यात खेळण्यापासून कोणी अडवणार नाही असले विचार आमच्या त्या सुपीक डोक्यात यायचे आणि आम्ही मनोमन खुश ह्वायचो.
 तर हा बबन याला पूर्ण गाव 'बबन नाव्ही' म्हणून ओळखायचा.  तसा हा गावातला एकदम फेमस माणूस बर का.जसे कोणतेही कुशल कारागीर  किंवा कलाकार वल्ही असतात तसाच हा सुद्धा होता हे सांगायची गरज नाही.बबन आमच्या मामाच्या घरचा 'फिक्स' नाव्ही होता.तो  पणजोबापासून नातवंडापर्यंत सार्वांचे डोके हलके करायचा.फक्त आमचे पणजोबा आणि आजोबा यांच्यासाठी त्याला घरी यावे लागायचे.आजकाल मामा त्यांच्याकडे केस कापायचा नाही कारण बबनचा मुलगा जरा 'फ्याशनेबल' केस कापत असल्याने ते आता त्याचे गिर्हाईक झाले होते.तसेही बबनच्या  दुकानात पैसे द्यावे लागत नव्हते वर्षाला धान्याची ठरलेली पोती दिली कि वर्षभर सण सोडून काही द्यावे लागायचे नाही.
 बबनचा आपल्यावर लय जीव  बर का. बीबीचा (आईचे टोपण नाव ) पोरगा आलाय हे समजल्यावर (आम्ही आलोय हे त्यांना पहिल्याच दिवशी त्यांच्या दुकानातील उपस्थितीवरून समजायचे) माझ्यासाठी लेमन गोळ्या त्याही मुठभरून ह्या ठरलेल्या असायच्या. आजोबा आणि पणजोबांची सेवा (केस,दाढी) करण्यासाठी आठवड्यात २ वेळा बबन घरी आला कि आमच्या बरोबर खूप खेळणार यात वाद नाही.
परंतु एकदा संध्याकाळ झाली आणि दुकान बंद केले कि बबनचे रूपच बदलायचे.रात्री ८ वाजले कि यांचे पाय गुत्त्याकडे वळलेच  आणि एकदा बबन तंगाट झाला कि याच्या वाटेला येणाऱ्या प्रत्येकालाच शिव्याच्या लाखोल्या वाहिल्या जायच्या. बबनची वस्ती मामाच्या वस्तीच्या पुढे असल्याने त्याचे रात्रीचे रूप रोज पाहण्याचा योग मला यायचा.रात्री कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज वाढला आणि त्याच्या बरोबर 'बबन नाव्ही तंगाट' अशी आरोळी ऐकू आली कि समजायचे बबन आला. ती बबनची स्टाइल होती. बबन हा त्याचा ज्याच्यावर राग आहे किंवा कोणाशी त्याचे बिनसले असेल त्याची काही वाईट गोष्ट झालेली असेल किंवा काही घडलेले असेल या गोष्टीचा उल्लेख करून त्याची आरोळी पूर्ण करायचा. तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो म्हणजे लक्षात येईल.समजा कोणाची सायकल चोरीला  गेली तर याची आरोळी'संजय पाटलाची सायकल चोरीला गेली,तरीबी बबन नाव्ही तंगाट' (लगेच समजायचे संजय पाटलाचे आणि बबन  याचे काहीतरी बिनसले आहे)अशी अनेक विविध वाक्य आम्हाला ऐकायला मिळायची.'........ म्हैस मेली,तरीबी बबन नाव्ही तंगाट' '....... बायको पळून गेली,तरीबी बबन नाव्ही तंगाट'
तर एकून काय ' बबन नाव्ही तंगाट' हे त्याच वाक्य ठरलेले असायचे.
पण एवढे तंगाट होऊन हि आम्ही आलेलो आहोत हे तो विसरायचा नाही, त्याचा घरी जायचा रस्ता मामाच्या दारातून जात असल्याने मामाचे घर आले कि त्याची पावले घराकडे वळायची.दारात आला कि बाहेर असेल त्याला 'बीबीचा पोरगा कुठय' हा पहिला प्रश्न ठरलेला.बबन दारू पिऊन आलाय त्यामुळे आम्हाला घरातील माणसे घराच्या बाहेर पडू द्यायची नाहीत.(बालमनावर वाईट परिणाम नको म्हणून)
परंतु बबन मला जोरात हाका मारायला लागायचा.आणि आम्ही सगळ्यांचे हाथ सोडवून पळत बबन जवळ जाऊन उभा असायचो.कारण आम्हाला माहिती असायचे आमच्या लेमन गोळ्या आलेल्या आहेत.बबन मला उचलून घेणार आणि खिशातून मुठभरून लेमन गोळ्या आमच्या हातावर ठेवणारच.मला खाली ठेवता ठेवता बबनची आरोळी यायचीच 'बीबीचा पोरगा आलाय,तरीबी बबन नाव्ही तंगाट'
मला खाली ठेऊन बबन परत फिरला कि वळून माझ्याकडे बघायचा आणि फक्त बबन नाव्ही ???? एवढच म्हणायचा आणि मी जोर देऊन 'बबन नाव्ही तंगाट' अस म्हणायचो आणि घरात पळून जायचो .यावर  बबन हसायचा आणि त्याच्या ओरोळ्या ऐकत आम्ही झोपी जायचो.
 दुसर्या दिवशी सकाळी बबन  घरी चहा प्यायला हजर असायचा एकदम नॉर्मल, शांतपणे बोलणारा हा बबन पाहिला कि रात्रीचा तो बबन कोण होता असा प्रश्न पडावा.परत त्याचा दिनक्रम सुरु ह्वायचा रात्र झाली कि परत बबनच्या आरोळ्या ऐकू  यायच्या.
' बबन नाव्ही तंगाट' हे वाक्य माझ्या मनात घर करून बसले हे मात्र खर.आताही कोणी जवळचा मित्र पार्टीमध्ये थोडी जास्त झाली आणि बडबड करू लागला कि माझ्या मनात येते ' बबन नाव्ही तंगाट' किंवा कधी कधी मी बोलूनही जातो असे.काही लोकाच्या ते लक्षात येत नाही परंतु जवळच्या  सर्व मित्रांना हा किस्सा माहित असल्याने त्यांच्या लगेच लक्षात येते आणि तेही त्या टल्ली झालेल्या मित्राकडे बघून जोरात म्हणतात ' बबन नाव्ही तंगाट' आणि जोरात हसतात.

(टीप-ब्लॉग सुरु केल्यापासून स्वताबद्दलचा एकाही अनुभव लिहिला नव्हता  हा पहिलाच प्रयत्न )
Reblog this post [with Zemanta]

मंगळवार, ६ एप्रिल, २०१०

आभासी दुनिया

orkut_newआंतरजाल हे खरच एक अदभूत दुनिया आहे याचा वापर आपण कसा करतो यावर याचे परिणाम अवलंबून असतात.येथील ओर्कुट,फेसबुक अशी संकेतस्थळे हि एक आभासी  दुनिया आहे हे आंतजालावर वावरणारी कोणतीही व्यक्ती मान्य करेल.परंतु काही लोक या आभसी दुनियेच्या आहारी जातात हेही तितकेच खरे आहे.आजच्या जमान्यात आंतरजालाचा वापर हा भरपूर प्रमाणात होत असताना दिसून येते.दैनंदिन व्यवहारातच नाही तर मनोरंजन म्हणून हि याचा वापर खूप वाढला आहे.याचा  जास्त वापर करण्यात आपले तरुण सर्वात पुढे आहेत असे दिसून येते.
तरुण वयातील मुले मुली हि ओर्कुट,फेसबुक अशा  संकेतस्थळावर अक्षरशा पडीक असतात.यामागे नवीन गोष्टीचे आकर्षण,मनोरंजन  अशा बाबी  असल्या  तरी त्याचा त्यांच्या मनावर आणि विचार करण्याच्या पद्धतीवर खोलवर परिणाम होत असतो.आंतरजाल  हे माहितीचे भांडार आहे त्याच्या साह्याने आपण आपल्या ज्ञानात भर घालू शकतो हे हि मुले विसरून गेली आहेत.
हा विषय लिहिण्यामागचे  कारण म्हणजे मी ओर्कुट हे खूप दिवसापासून वापरत आहे तेथील चर्चेत हि हिरहिरीने भाग घ्यायचो माहितीची देवाण घेवाण होत होती,शाब्दिक चकमक हि होत होती.खूप नवीन मित्र-मैत्रिणी भेटल्या काही चांगल्या काही वाईट  . परंतु तेथील होणारया चर्चेतून,भांडणातून  असे दिसून आले कि ते आपल्या जीवनावर,मनावर खूप परिणाम करते आणि आपल्या रोजच्या वागण्यात,बोलण्यात खूप बदल घडून येतो.
कोणी काही म्हंटले तरी आपण जे अशा संकेतस्थळावर  मत मांडत असतो किंवा जेवढ्या त्वेषाने बोलत असतो तसे आपण खरया जीवनात बोलत व वागत नसतो.अशा ठिकाणी आपण फक्त तसा आभास तयार करत असतो कारण आपल्या पुढे दुसरी खरी व्यक्ती नसते किंवा  ज्यांच्या समोर आपण हे बोलत असतो त्यांचा आपल्या खरया जीवनाशी काहीही संबंध नसतो.
परंतु काही लोक (सहसा  तरुण मुले-मुली) अशा गोष्टी खूपच गंभीरपणे घेतात ते 'ओर्कुट म्हणजेच जीवन' या तत्वाने वागू लागतात असे दिसून आले आहे.तेथील होणारया चर्चा,भांडणे,गप्पा हेच त्यांचे जीवन बनून जाते ते अशा संकेतस्थळावर उपस्थित नसले तरी मनाने ते तिथेच असतात त्याचाच विचार त्यांच्या मनात सतत असतो.आपण कोणीतरी मोठे किंवा वेगळे  आहोत,विचारवंत आहोत असा आभास करण्याच्या मागे ते लागतात आणि त्यातच ते हरवून जातात.
या आभासी दुनियेत प्रत्येकजण आपली एक प्रतिमा तयार करायच्या मागे लागलेला असतो तो तसाच खरया जीवनात असेल असे सांगता येत नसले तरी काही कालावधी नंतर आपण त्या प्रतिमेप्रमाणेच  आहोत असे त्याला वाटू लागते परंतु खरी परिस्थिती तशी नसते आणि ती समोर आली कि त्याला धक्का बसतो.
आपण हि अशा गोष्टी अनुभवल्या  असतील  आपली कुवत  किंवा तेवढी बुद्धिमत्ता नसलेली  काही लोक काय काय गोष्टींवर आपले मत मांडत असतात किंवा एखाद्याला सल्ला,उपदेश  देत असतात असे का होते ?
कारण ती माणसे स्वताला तेवढ्या क्षमतेची समजायला लागेलेली असतात इथे बसून ओबामा  ने  काय केले  पाहिजे ,बुश  कुठे  चुकला  किंवा त्यांनी  काय केले  पाहिजे  अशा गोष्टींवर मत नोंदवणारे  स्वता आपण कुठे  आणि किती चुकत  आहोत याकडे  डोळे  झाक  करत असतात आणि हे सर्वांच्या  बाबतीच  खरे आहे अगदी  माझ्याबाबतही  :)
खरया आयुष्यात आपणाला जे काही बोलता येत नाही किंवा जसे वागता येत नाही परंतु तशी खूप इच्छा असते अशा गोष्टींची पूर्तता हि आभासी दुनिया करते.

ओर्कुटलाच विश्व मानणारे मी पहिले आहेत त्यातून त्यांच्या आयुष्यात खूप चढ उतार होताना पहिले आहेत
कितीही काही बोललो तरी आपण जे इथे मत मांडतो ते आपल्या मनात कुठेतरी घर करून बसलेले असते आणि जगात वावरताना त्या गोष्टींचा प्रभाव आपल्या वागण्यात,बोलण्यात दिसतो
येथील गोष्टी किती वैयक्तिक घ्यायच्या हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु त्याने तुमच्या सामान्य जीवनावर खोलवर परिणाम होत असतो हे अनुभव आल्याशिवाय लोकांना फक्त सांगून पटत नाही
येथे खूप चांगल्या गोष्टी वाचायला भेटत असतात कोणती माहिती योग्य आणि आपल्याला योग्य दिशा देणारी आहे हे स्वताच ठरवावे लागते येथील मित्र फक्त तुम्हाला सल्ला देऊ शकतात तो ऐकायचा कि नाही हा शेवटी आपला वैयक्तिक प्रश्न असतो
आभासी जगात जगताना आपणाल जसे हवे आहे तसे जगता येते परंतु तसेच खऱ्या आयुष्यात जगता येत नाही आणि असे झाले कि मनाला खूप त्रास होतो आणि चीड चीड होते
त्यामुळे आपण जसे आहोत आपला स्वभाव जसा आहे तसा इथे मांडत राहावे त्यामुळे त्याचे काय परिणाम भावी आयुष्यात होऊ शकतात ते येथील चर्चेने आणि मैत्रीने समजू शकते

शेवटी कस जगायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे
फक्त एक आहे आपण इथे आभास निर्माण करून स्वताला फसवत असतो

या आभासी दुनयेचे व्यसन हो व्यसनच कधी लागते हे समजतच नाही आणि माणूस यात वाहून जातो वेळीच यावर उपाय नाही केला गेला तर आपल्या  वैयक्तिक आयुष्याला यामुळे हानी पोहचू शकते.
Reblog this post [with Zemanta]

शनिवार, २७ मार्च, २०१०

साल्हेर ... एक बुलंद किल्ला

साल्हेरचा बुलंद किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वोच्च किल्ला आहे.त्याची उंची समुद्रसपाटीपासून १५९३ मीटर्स आहे.त्याच्या शेजारील सालोटा या डोंगरावरही दुर्ग उभारला आहे.तो साल्हेरचा उपदुर्ग आहे.एका दुर्गाच्या शेजारचा मोकळा डोंगर दुर्गाला घातक ठरतो,म्हणून जवळच्या डोंगरावरही बांधणी करून दुर्ग उभारतात.साल्हेरहून उत्तर ईशानेला तांबोळ्या,रतनगड (नाहवा ) हे दुर्ग तर मांगी-तुंगीची शिखरे दिसावयास लागतात.पश्चिमेला अजंटा-सातमाळा रांग दिसते.सह्याद्रीला रौद्रतेची कल्पना यावयास लागते.साल्हेरच्या चारही बाजूस कडे आहेत.त्यामुळे तटबंदी फार कमी आहे.पश्चिमेकडचा कडा उत्ताल आहे.साल्हेर गावाकडून तशीच माळदर-वाघांबे गावाजवळच्या खिंडीतून साल्हेरवर  यावयास पायवाट आहे.इ.सन १६७१-७२ मध्ये शिवाजीमहाराजांनी साल्हेरचा दुर्ग जिंकला.त्यांच्याकडून तो परत जिंकून घेण्यासाठी मुघल फौजा चाल करून आल्या आणि त्यांनी साल्हेरच्या दुर्गाला वेढा घातला.तो फोडण्यासाठी शिवाजीराजांनी मोरोपंत पिंगळे आणि प्रतापराव गुजर यांना पाठीवले.
 इख्लासखान हा मुघल सेनेचा अधिपती होता.या युद्धाचे मोठे रंजक वर्णन बखरीत आले आहे.
'एक तर्फेने लष्करांनी घोडी घातली.एक तर्फेने मावळे लोक शिरले आणि मारामारी केली.मोठे युद्ध जाहले.मोगल,पठाण,रजपूत,तोफची,हत्ती,उंट,आराबा घालून युद्ध जाहले.युद्ध होताच पृथ्वीचा धुराळा असा उठला कि  तीन कोश औरस-चौरस आपले व परके माणूस दिसत नव्हते.हत्ती रणास आले.दुतर्फा दहा हजार माणूस मुर्द जाहले.घोडी,उंट,हत्ती यांस गणना नाही.रक्ताचे पूर वाहिले.रक्ताचे चिखल जाहले.त्यामध्ये रुतो लागले.असा कर्दम जाहला.मारता मारता घोडे जिवंत उरले नाहीत.जे जिवंत सापडले ते सहा हजार घोडे राजीयाकडे गणतीस लागले.सवाशे हत्ती सापडले.सहा हजार उंट सापडली.मालमत्ता,खजिना,जडजवाहीर,कापड अगणित बिछाइत हातास लागली.बेवीस वजीर नामांकित धरिले.खासा इख्लासखान पाडाव जाहला.ऐसा कुल सुभा बुडवला.हजार-दोन हजार सडे,सडे पळाले,असे युद्ध जाहले.'



 या युद्धात शिवाजीराजांचा एक सहकारी सूर्याजी काकडे हा छोट्या तोफेचा गोळा लागून पडला.'भारती जैसा कर्ण तैसा' असे त्याचे वर्णन आले आहे.साल्हेर दुर्गाच्या सालोट्याच्या बाजूस खोदलेल्या अनेक गुहा आणि पाण्याची टाकी हि अभ्यासण्यासारखी आहेत,पण दुसर्या बाजूकडचे दगडात कोरलेले कठडा असलेले कड्याच्या टोकावरचे जिने आपल्याला थक्क करतात.कोणी केले असेल हे काम ????

शुक्रवार, १९ मार्च, २०१०

हे काय राजसाहेब तुम्ही सुद्धा ????

'कोणत्याही समाजापुढे लांगूलचालन करणार नाही , निवडणुका आल्या म्हणून ' टोप्या ' घालणार नाही '
असे राजसाहेब तुम्हीच शिवाजी पार्कच्या सभेत निक्षून सांगितले होते ना ????


मग हे काय आहे ?



कशासाठी एवढी लाचारी ?
मतांसाठीच  ना ?





 परंतु तेंव्हा आम्ही समजून घेतले होते , परंतु तुम्ही आता आमच्या भावनाशीच
खेळायला लागलात याला माफी कशी आणि का ????


बोले तैसा चाले असा एकच नेता हे आता जनतेपासून लपून राहिले नाही हिंदूदृदयसम्राट बाळासाहेब
ठाकरे 


लोकानो विचार करा आणि सावध व्हा
जो आज मतांसाठी स्वतः 'टोपी' घालू शकतो तो उद्या तुम्हालाहि 'टोपी' घालू शकतो.

(by Mail )



मंगळवार, १६ मार्च, २०१०

नविन वर्षाच्या शुभेच्छा..

हिंदू नविन वर्षदिनाच्या माझ्यातर्फे तूम्हाला आणि तुमच्या कुटूंबीयांना अतिशय मन:पूर्वक शुभेच्छा... हे नविन वर्ष आपणा सर्वांना, सुख, समृद्दी, ज्ञानार्जन, मनोरंजन, आणि यशदायी जावो हीच सर्वशक्तीमान देवाकडे प्रार्थना...

सोमवार, ८ मार्च, २०१०

एक वनवासी- सिंधुताई सपकाळ

सिंधूताई सपकाळ हे नाव आपण कधीना कधी ऐकलेच असेल.समाजाला काहीतरी चांगल देण्याची,त्यांना वळण लावण्याची ताकद असणारे अनेक  प्रतिभावंत मराठी मातीत आहेत.प्रश्न आहे तो फक्त त्यांच्या कार्याची दखल घेण्याचा.आपल्या कार्याचा ठसा जनमाणसावर उमटवणाऱ्या व्यक्तीमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे नाव अग्रक्रमंकाने आणि आदराने घेतले जाते.समाजाने धूडकारलेल्या, स्वकीयांच्या प्रेमाला पारख्या झालेल्या असंख्य निराधारांना आपल्या मायेच्या स्पर्शाने,प्रेमाने आपलास करणाऱ्या सिंधुताई सपकाळ या मातेची कहाणी कोणालाही थक्क करणारी आहे.वैयक्तिक आयुष्यातील दुखाचे डोंगर दूर सारत दुसर्यांसाठी आयुष्य वेचणाऱ्या सिंधूताईचा जीवनपट खरच प्रेरणादाई आहे.
अनाथ मुलाच्या प्रेमात कसर राहू नये म्हणून पोटच्या मुलीला दुसर्या अनाथआश्रमात ठेवणाऱ्या सिंधूताई सपकाळ यांचा जीवनपट आता चित्रपट रुपात येत आहे.सचिन आणि बिंदिया खानविलकर यांनी 'मी सिंधूताई सपकाळ' या चित्रपटाच्या निर्मितीला सुरवात केली आहे. या चित्रपटात ताईच्या जीवनातील  सर्व घटनांचा,चढ- उताराचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. जसे लग्नामुळे मधेच सोडावे लागलेले शिक्षण,थंडीपासून रक्षण करण्यासाठी घेतलेल्या चितेच्या आगीचा शेक आणि पोटाची भूक भागविण्यासाठी अंत्यसंस्काराच्या वेळी आणण्यात येणाऱ्या पिंडाचा भात खाण्यापासून ते अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून आपले विचार मांडणाऱ्या सिंधूताईची रोमांचित करणारी जीवनयात्रा.या चित्रपटाची कथा सिंधूताईच्या 'मी वनवासी' या पुस्तकावर आधारलेली  आहे.
हा चित्रपट एक जागतिक दर्जाचा ह्वावा अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.या चित्रपटाद्वारे सिंधूताई जनमाणसापर्यंत पोहचतील अशी आशा करूयात.

सिंधूताईना प्रत्यक्ष भेटण्याचा योग फार कमी आला.लहान असताना आमच्या गावात सिंधूताईचा कार्यक्रम होता त्यावेळी त्यांना ऐकण्याचा योग आला होता.बोलताना त्या लोकांना आपलेसे कधी करून घेतात हेच लक्षात येत नाही.आपली अनाथ मुलांसाठीची तग मग मांडताना त्या आजही कवितांचा   आधार घेतात.गदिमा,बहीणाबाई,सुरेश भटांच्या कविता त्यांच्या तोंडून ऐकताना ऐकणारा तल्लीन झाला नाहीतर नवलच!

सगळ बोलून झाल कि माई लोकांसमोर आपली झोळी फैलावतात आणि अनाथांसाठी काहीतरी मदत करा अशी साद घालतात.'१७० हून अधिक पुरस्कार मिळाले,पण ते पुरस्कार खाऊन पोट भरत नाही' म्हणून त्यांना लोकांसमोर हात पसरावे लागतात.आश्रमातील सात-आठशे मुलांच्या खर्चाची तजवीज करताना त्यांची दमछाक होते.'गाना नाही तो खाना नही,भाषण नही तो राशन नही' असे म्हणत आपल्या मुलांना २ वेळच जेवण मिळव म्हणून त्या आजही महाराष्ट्रभर हिंडत असतात.त्यांची हि परवड कधी संपणार परमेश्वरालाच माहिती.

आम्ही ओर्कुट वरील एका समूहातील काही सभासदांनी मिळून काहीतरी सामाजिक कार्य करण्याच्या उद्देशाने एक मोहीम राबविली होती. त्यानुसार एका जबाबदार सभासदाने बँकेत खाते काढून त्या खात्यावर  ज्याची इच्छा आहे त्या सभासदाने आपल्या परिस्थितीनुसार काही रक्कम जमा करायची( ऑन लाईन). असे आम्ही एकून १९१५० रुपये जमा करून ते दापोडीतील मालनताई तुळवेंच्या अनाथाश्रमाला  दिले होते.तेवढाच आपला खारीचा वाटा. हि मोहीम आम्ही यशस्वी करून दाखवली तेही कोणी एकमेकाला न भेटता. असेच आपण सर्व मराठी ब्लॉगर  मिळून सिंधुताई साठी काही करू शकतो का ? जास्त नाही एकाने  ५००-१००० जरी जमा केले तरी चालतील तेही नाही  जमले तरी १००-२०० तरी देऊ शकतोच कि. बघा पटतंय का ते प्रतिसाद द्या प्रत्यक्षात  आणू आपण हे, मी वाट पाहत आहे.


कोणाला जरी सरळ आश्रमात जाऊन मदद करायची असेल तरी ते तसे करू शकतात.पुण्यापासून जवळ आहे.

आश्रमाचा पत्ता:
सन्मती बाल निकेतन
बेल्हेकर वस्ती, मंगल एंटरप्रायजेस शेजारी,
वसंतदादा साखर कारखान्याजवळ, मांजरी बु.,
पुने - ४१२ ३०७

सिंधुताईचा  पत्ता -
सन्मती बाल निकेतन संस्था,
मिनाक्षी बिल्डींग, दुसरा मजला, विहार चौक,
तुपे आळी, हडपसर,
पुणे - २८
फोन नं - ०२० - २६८७०४०३

शुक्रवार, ५ मार्च, २०१०

यांचा आक्रोश कोणी ऐकला का ?

काही दिवसापूर्वी पाकिस्तानमध्ये २ शीख बांधवांची हत्या तालिबान्यांनी  केली.त्यांचा शिरच्छेद करून ती मुंडकी गुरुद्वाराला भेट म्हणून पाठवण्यात आली.काही काळापुरती हि बातमी न्यूज वर झळकली आपल्यातील काहींनी वाचली काहींनी नाही वाचली.कोणी २ शब्दात अरे वाईट झाले असे बोललो कोणी तेही नाही बोलले. मरणारे  कुत्र्याच्या मौतीने मेले कोणाला काही दुख नाही.
हिंदुस्तान सरकारने नेहमीप्रमाणे तीव्र  शब्दात या गोष्टीचा निषेध नोंदवला झाले. हा सगळा मला षंढपणा वाटतो.
काय आहे कोणत्याही हिंदूला  हिंदूंच्या हत्तेचे दुख आता होतच नाही असे वाटते.त्यांना आता त्याची सवय झालीय.शीख - हिंदू यांनी इतिहासकाळापासून मुस्लीम धर्मांतेविरुद्ध कायमच  तलवारी उपसल्या आहेत.धर्मासाठी बलिदान दिले आहे.त्याच धर्माचा शिरच्छेद होताना लोकांचे  रक्त उसळत कसे नाही ?
फाळणीनंतर काय झाले मुस्लिमांसाठी 'पाकिस्तान' निर्माण झाले पण 'हिंदून'साठी हिंदुस्तान तयार झाले का ? नाही ...
देश निधर्मी ( सेक्युलर ? ) आहे असे सांगून हिंदुना कायम फसवण्यात  आले आहे. या निधर्मीपणाच्या आडूनच आपले पंतप्रधान या देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे असे बिनदिक्त्तपणे म्हणू शकतात. मग हिंदुनी जायचे कुठे ? आज हिंदू -शीख यांचा पाकिस्तानात शिरच्छेद होत आहे आणि हिंदुस्तानात ते पाकिस्तानी अतिरेक्यांच्या बॉम्बस्फोटात मारत आहेत.म्हणजे दोन्हीकडे मरण हिंदूंचेच .उठसुठ मानवाधिकाराची बांग देणारे पाकिस्तानात दोन हिंदू शिखांची हत्त्या झाल्यावर काय करत होते ? हिंदूंच्या अशा हत्त्या पाकिस्तानात नेहमीच होत असतात आणि त्याचे कोणालाच काही देणेघेणे राहिले नाही.
पण चूक कुणाची ? आपण 'हिंदू' आहोत याचा गर्व किंवा अभिमान हिंदूमध्ये राहिला आहे का ? आजकाल काहीनातर आपण हिंदू आहोत याचीही लाज वाटायला लागली आहे . मग याच्यापेक्षा वेगळे काय घडणार ? हिंदुना हिंदू म्हणून घेण्यात काय कमीपणा आहे हेच समजण्यापलीकडचे  आहे.


 'मुझे अपने को हिंदू कहलाना एक गाली सा लागता है' असे वक्तव्य काही दिवसापूर्वी हिंदीतील प्रसिद्ध लेखक ओमप्रकाश वाल्मिकी यांनी जयपुरात आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात केले होते. वर्तमानपत्रांनी  याला चांगली प्रसिद्धी दिली होती.हिंदू जेंव्हा हिंदूला काही बोलतो तेंव्हा या सो कौल्ड सेक्युलर मिडीयाला खूप मजा वाटते आणि ती त्यांच्यासाठी सर्वात मोठी बातमी बनते.
'मी हिंदू असल्याची मला लाज वाटते' अशाप्रकारचे वक्तव्य काही वर्षापूर्वी केंद्रीय मंत्री टी. आर.बालू यांनी ख्रिश्चनांच्या  एका कार्यक्रमात  केले होते. त्यावेळीही या हिंदूद्वेष्ट्या वर्तमानपत्रांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला होता. विशेस म्हणजे या सर्व वर्तमानपत्रांचे संपादक हे हिंदूच होते.

पाकिस्तान आपला चांगला शेजारी आहे आणि त्याच्याशी आपण चांगलेच वागले पाहिजे असे सांगणारे आणि त्याला पाठींबा देणारे हिंदू  या शीख हत्त्यांचा साधा निषेध करायला तरी  पुढे येतील का ?
नाही कोणी येणार नाही हो
हे असाच चालू राहणार हिंदू मरत राहणार इथे नाहीतर तिथे ......कोणाला काही फरक पडत नाही
(टीप-यातील काही मुद्दे राउत यांच्या लेखातून  घेण्यात आले आहेत )
जय हिंद !
जय महाराष्ट्र !

बुधवार, ३ मार्च, २०१०

सध्याचे तरुण शिवजयंतीनिम्मित्त महाराजांचा आदर्श घेतील का ?

महाराष्ट्राचे आराध्यदैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार आज ३८० वी जयंती . तसे पाहण्यास गेलेतर १९ फेब्रुवारीला तारखेनुसार किंवा शासकीय शिवजयंती नुकतीच झाली परंतु त्याचा शासनालाच विसर पडला होता ते जाऊ द्यात. आम्ही दरवर्षी तिथीनुसारच शिवजयंती साजरी करतो ती म्हणजे फाल्गुन कृष्ण तृतीयेला, जसे आम्ही आमचे हिंदू  सण,उत्सव  साजरे करतो तसे. शिवाजी महाराज आमच्यासाठी दैवतच आहेत आणि राहतील असो ...
हिंदू धर्म व हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आले असताना लहानवयात 'स्वराज्य व स्वधर्म' याची पुनर्स्थापना करण्याची प्रतिज्ञा शिवरायांनी घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.शिवरायांचे कार्य समस्त देशाला प्रेरणा देणारे आहे.परंतु खरच हिंदुस्तानातील लोकांनी विशेषता तरुणानी महाराजांकडून प्रेरणा घेतली का ?
ज्या शिवाजी महाराजांनी मुठभर तरुणांना हाताशी घेऊन इस्लामी राजवट नेस्तनाबूत केली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ती कोणत्या बळावर याचा विचार केला पाहिजे.हाताशी अपुरे संख्याबळ,अपुरी शस्त्रसामुग्री ,अपुरा पैसा असताना बलाढ्य असणार्या मुघलांचा मुकाबला केला.आपला गनिमी कावा,कल्पक डावपेच,निर्भयता याच बरोबर हिंदू धर्माचे बळ आणि तेज मोघालाना दाखवले.
हे बळ त्यांना कुलदैवत आई जगदंब तुळजाभवानी यांच्या कृपेने आणि माता जिजाऊ यांच्या आशीर्वादाने आले होते.कुलदेवतेची उपासना आणि आईचे मार्गदर्शन हि एक मोठी शक्ती आहे हे महाराजांनी जाणले होते परंतु आपण हे आता विसरलो आहोत.
 आजच्या तरुणांसमोर योग्य मार्गदर्शन नसल्याने तरुण पिढी वैयक्तिक स्वार्थात गुंतलेली दिसत आहे.करियर च्या नावाखाली झटपट पैसा मिळवणे आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमात सध्याची तरुण पिढी रममाण आहे. आपल्या राष्ट्रात घडत असलेल्या गैरकृत्याविरुद्ध विचार व कृती करण्याची तसदी घेणारे तरुण सध्या दुर्मिळ झाले आहेत.
तसेच सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात आत्मबळाचा अभाव प्रखरतेने जाणवत आहे त्यामुळे तरुण आत्महत्यासारख्या दृष्टचक्रात ओढले जात आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील तरुणासारखा राष्ट्राभिमान आणि धर्मभिमान सध्याच्या तरुणात दिसत नाही.कारण आजची निधर्मी बोलली जाणारी शिक्षणपद्धती आणि पाश्च्यात्य संस्कृतीचा वाढता प्रभाव यामुळे नवीन पिढी बुद्धीने हुशार;परंतु मानाने दुबळी व स्वार्थी बनली आहे.
देशातील तरुणानी आपली मानसिकता आणि कृतीत अमुलाग्र बदल घडवून आणायची गरज आहे.शिवाजी महाराज,स्वातंत्र्यवीर सावरकर,स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या राष्ट्रपुरशांचे आदर्श तरुणांसमोर हवेत.परंतु आजच्या तरुण पिधेचे आदर्श हे अभिनेते,खेळाडू यांच्यापर्यंत सीमित झाले आहेत. हे आदर्श योग्य आहेत का ?
हे चुकीचे आदर्श आपल्याला शेजारील शत्रूराष्ट्राशी,अतिरेक्यांशी लढण्याचे बळ देणार आहेत का ? अशा चुकीच्या आदर्शामुळे जम्मू काश्मीर चा भाग गिळंकृत करणारा देशात स्पोट घडवणारा पाकिस्तान,पूर्व भारताकडे वक्रदृष्टीने पाहणारा चीन आणि घुसखोरी करणारा बांगलादेश यांच्यापासून सध्याचे तरुण अनभिज्ञ राहत आहेत.
त्यामुळे तरुणांना योग्य आदर्श दाखवण्याची जबाबदारी पालकांचीही आहे.
तरुणांनी आपल्यातील सुप्त सामर्थ्य जाणण्याची गरज आहे तसे केल्यानेच शिवाजी महाराज बालवयात बलाढ्य शत्रूचे आव्हान पेलू शकले. माता जिजाऊ यांनी त्यांच्यासमोर भगवान श्रीकृष्ण,प्रभू श्रीराम यांच्यासारखे आदर्श ठेवले होते आणि धर्मनिष्ठेचे बाळकडू पाजले होते.आजच्या तरुणांनीही आपले शिवतेज जागृत केले पाहिजे आपले आध्यात्मिक बळ वाढीवले पाहिजे. आपल्या सण-उत्सवाचे पावित्र्य थाळू न देता सह्स्त्रानुसार साजरे करायला हवेत.आपल्यातील मानसिक दुर्बलता कमी करून राष्ट्राचे नेतृत्व तरुणांनी करण्याची गरज आहे.
आजच्या तरुणांमध्ये राष्ट्र घडवण्याचे व चालवण्याची क्षमता आहे.पण इच्छाशक्तीचा  अभाव आणि सातत्याने चुकीचे आदर्श यामुळे तरुण आपले सुप्त सामर्थ्य हरवून बसले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार,त्यातून मिळणारी प्रेरणा व तेज फक्त तरुणानंच नाह्वेतर समस्त देशाला जगण्याचा अधिकार मिळवून देऊ शकते.जो आमचा जगण्याचा अधिकार हे राष्ट्रद्रोही व पाकडे अतिरेकी हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
आजच्या शिवजयंतीनिम्मित्त महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्याप्रमाणे कृती करण्याचा निश्चय करूयात आणि एक सामर्थ्यशाली हिंदुस्तान बनवण्याचा निश्चय करूयात.


निश्चयाचा महामेरू
बहुत जनांसी आधारू
अखंड स्थितीचा निर्धारु
श्रीमंत योगी...
यशवंत,कीर्तिवंत,
सामर्थ्यवंत,वरदवंत
पुण्यवंत,नीतिवंत
'जाणता राजा '
महाराष्ट्राचे आराध्यदैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८० व्या जयंतीनिमित्त लक्ष लक्ष भगव्या शुभेच्छा !


शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०१०

हिंदुत्वाचा तेजस्वी अविष्कार ... स्वातंत्र्यवीर सावरकर

हिंदुस्तानी स्वातंत्र्य युद्धाचे अग्रदूत,देशभक्तांचे अखंड स्फूर्तीस्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज पुण्यतिथी

मृत्यूशी अनेकवेळा झुंज  देऊन,त्याचा प्रभाव करून स्वातंत्र्यवीर आयुष्यात अनेकवार मृत्युंजय ठरले.संत ज्ञानेश्वर,तुकोबाराया आदी थोर योग्यांच्या परंपरेनुसार जीवित कार्यप्राप्तीनंतर वीस दिवसाच्या प्रयोपासानेनंतर केवळ पाण्यावर राहून आत्मसमर्पण करून सावरकर अनंतात विलीन झाले.२६ फेब्रुवारी १९६९ रोजी हा महापुरुष काळाच्या पडद्याआड गेला.





जातिभेदाच्या निर्मुलनाकरिता सावरकरांनी जे उपक्रम राबविले,त्यात शाळातून स्पृश्य व अस्पृश्य मुलांना एकत्रित बसविणे,सार्वजनिक पाणवठे,मंदिरे,उपहारगृहे येथे अस्पृश्यांना मुक्त प्रवेश मिळवून देणे,स्पृश्य-अस्पृश्य सहभोजन,तिळगुळ समारंभ इत्यादींचा  समावेश होता. रत्नागिरीमधील 'आखिल हिंदू पतित पावन मंदिर' हे हिंदुस्तानातील त्या काळातील एकमेव मंदिर होते जेथे स्पृश्य-अस्पृश्य यांना मुक्त प्रवेश होता.हिंदू समाजाला पुरोगामी विचारसारणीची व आधुनिक विज्ञाननिष्ठेची बैठक मिळवून देणाऱ्या सावरकरांच्या पुण्यतिथीनिम्मित्त त्यांच्या कार्याचे पुण्यस्मरण करूया.

बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१०

सचिन ...स्वप्न पूर केलस रे गड्या

लय दिस मनात हुत कि सचिन नि एकदिवसीय सामन्यात २०० कराव्यात कमीत कमी त्या सईद अन्वरच १९४  रेकॉर्ड तरी मोडाव.
२-३ येळा त्यो त्याच्या जवळ बी आला हुता पण काही जमल नव्हत, पण आज त्यो जणू आपल्या शिरपेचात मानाचा अजून एक तुरा घालायसाठी आलाय अस वाटत हुत.
आन बघता बघता गड्याने रेकॉर्ड मोडल कि हो १९४ च आन २०० बी पुऱ्या केल्या तेबी नाबाद .
नादखुळा गणपतीपुळा
च्यामारी सामना बघताना सचिनच्या १५० झाल्यावर मी एका जाग्यावर बसून हुतु अजाबात हाललु   नाय ती आपली मनाची चलबिचल आता याला कुणी अंधश्रद्धा म्हणू द्या नायतर काय बी म्हणू द्या आमासणी कायबी फरक पडत नाय.म्या अस नाय म्हणणार कि म्या एका जाग्यावर बसलू म्हनून त्याच्या २०० रणा  झाल्या ;)
पण लय दिसाच स्वप्न गड्यान पूर केल
सच्याला नाव ठेवणार्यांनी हि खेळी बगावी आन आपल तोंड काळ कराव
जाऊ द्यात चांगल्या टायमाला वंगाळ नाय बोलत

 

या मराठमोळ्या सचिनला २००*(१४७) खेळीबद्दल मानाचा त्रिवार मुजरा !

सोमवार, २२ फेब्रुवारी, २०१०

वसई... चिमाजीअप्पांच्या स्मृती

उल्हास नदी जिथे समुद्राला मिळते,तिथे नदीच्या मुखावर वसईचा दुर्ग बांधलेला आहे.शिवाजीमहाराजांनी कल्याण आणि भिवंडी येथे आपले आरमार बांधावयास काढले.रुय लेन्ताव ह्विअगस आणि फेर्नाव व्हीअगस हे पोर्तुगीज बापलेक जवळ जवळ ४०० लोकांसह शिवाजीमहाराजांचे आरमार बांधत होते.शिवाजीराजांनी वसईच्या कॅप्टन आंतुनियु द मेलू द काश्त्रू याला पाठविलेले एक पत्र मिळाले आहे.त्यात राजांनी म्हंटले आहे,'आमची जहाजे बाहेरून लाकडे घेऊन येतील आणि नंतर उल्हास नदीतूनच आमच्या गुराबा,जहाजे सागरात शिरतील,तरी त्यांच्यावर तोफा दगू नयेत...'
Bassein Fort
वसईच्या कॅप्टन ने हे पत्र गोव्यात पाठवले.तेथे सभा भरून सौम्य शब्दात प्रतिबंध करण्याचे ठरले.ह्विअगस बापलेकांना मुंबईला बोलावून कानपिचक्या दिल्यावर,तेही आपल्या लोकांसह रातोरात पळाले.शेवटी आपल्याच लोकांनी हि जहाजे बांधली आणि अंधाराचा फायदा घेऊन वसईजवळूनच सागरात लोटली.
मूळ भेंगळ्याचा दुर्ग पुढे पोर्तुगीजांनी परत बांधून काढला.उत्तर फिरंगणात वसईच्या दुर्गाचा दबदबा मोठा होता.काही मंदिरे आहेत.आतील 'सिटाडेल' म्हणजे अर्क हेदेखील अभ्यासण्यासारखे आहे.खाडी,सागर आणि दलदल यांनी वेढल्याने वसईचा दुर्ग हा फार बळकट बनला होता.अणजूर गावचे गंगाजी नाईक यांनी पेशव्यांना पोर्तुगीजांच्या अत्याचाराची कल्पना दिल्याने पेशव्यांनी उत्तर फिरंगणात स्वारी केली.वसईलाही वेढा बसला,पण पोर्तुगीजांनी अत्यंत नेटाने किल्ला लढवला.शेवटी चिमाजी अप्पा पेशव्यांच्या आवाहनाने मराठी सेनेने मोठाच एल्गार केला आणि सुरुंग लावून तट उडवला.तुफान मारामारी होऊन ५ मे १७३९ रोजी पोर्तुगीज शरण आले.१२ मे रोजी त्यांनी रूरमार्च काढून बैंड वाजवत ते किल्ल्याला पडलेल्या खिंडारातून बायका मुलांसमवेत बाहेर आले आणि किल्ल्याला वळसा घालून जहाजात बसून गोव्यात गेले.
या वसईच्या दुर्गाच्या सां सेबांशिया बुरजाच्या खाली,एक अत्यर्क गोष्ट आहे.वसईच्या कॅप्टन च्या घराजवळच बुरजाच्या तटाखालून ५५० फुट (१७७ मी.)लांबीचे एक मोठे भुयार काढले आहे.
Enhanced by Zemanta