मराठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ५ फेब्रुवारी, २०११

आजच्या मराठीची उत्पत्ती...सर्वकाही समष्टीसाठी

उत्तर राजस्थानात अल्वर गुरगाव, भरतपूर हे या क्षेत्रात येतं. मेवो जातीच्या गावात त्यांना मेवाती पण म्हणतात. यांची एक मिश्र बोली अहिरवाटी आहे. ती गुरगांव, दिल्ली, कर्नालच्या क्षेत्रात बोलली जाते. याच्यावर हरियाणीचा प्रभाव आहे. मेवातीमध्ये केवळ लोकसाहित्य आहे. उत्तरी राजस्थानाचा निर्माण शौरसेनी अपभ्रंशाने झालेला आहे.
पूर्वी राजस्थानी : राजस्थानच्या पूर्व भागात जयपूर, अजमेर, किशनगड यात ही बोली बोलली जाते. ही बोली जयपुरी आहे. याचं केंद्र जयपूर आहे. जयपूरला धुंडानी पण म्हणतात, कारण त्या क्षेत्राचे नाव धुंडाणं आहे. शौरसेनी अपभ्रंशांनी विकसित या बोलीमध्ये केवळ लोकसाहित्य आहे.
दक्षिणी राजस्थानी : इंदौर, उज्जैन, देवास, रतलाम, भोपाळ, हुशंगाबाद आणि त्यांच्या आजूबाजूची गावं या क्षेत्रात येतात. याची प्रतिनिधी बोली माळवी आहे. याचे मुख्य क्षेत्र माळवा आहे. शौरसेनी अपभ्रशांनी विकसित या बोलीमध्येसुद्धा पुरेसे लोकसाहित्य आहे.
पश्‍चिम पहाडी : जौनसार, सिरमऊ, शिमला, मंडी, चंबा आणि याच्या आजूबाजूची गावे यामध्ये येतात. यांच्या बोलीत केवळ लोकसाहित्य आहे.
मध्यवर्ती पहाडी : शौरसेनी अपभ्रंशानं विकसित या बोलीचं क्षेत्र गडवाल, कुमाऊ आणि याच्या आजूबाजूची गावं येतात. वस्तुत: गडवाली आणि कुमाऊ या दोन बोलीभाषांचे हे सामूहिक नाव आहे. यात साहित्य आणि लोकसाहित्य दोन्ही आहेत.
भोजपुरी : बिहारच्या शाहाबाद जिल्ह्याच्या भोजपूर गावच्या नावामुळे या बोलीचं नाव भोजपुरी पडलं आहे. मागधी अपभ्रंशांच्या पश्‍चिम रूपाच्या विकसित या बोलीमध्ये बनारस, जौनपूर, मिरजापूर, गाजीपूर, बलिया, गोरखपूर, देवरीया, आजमगड, बस्ती, शाहबाज, चंपारन, सारन आणि याच्या आजूबाजूची गावे आहेत. हिंदी प्रदेशाच्या बोलीभाषेत भोजपुरी बोलणारे सर्वात अधिक आहेत. भोजपुरीमध्ये मुख्यत: लोकसाहित्यच आहे. शिष्ट साहित्य फार कमी आहे. भारतेंदू, प्रेमचंद, प्रसाद या ठिकाणचे असूनही त्यांनी या भाषेचा साहित्यात कधी वापर केला नाही.
मगही : संस्कृत मगधपासून विकसित शब्द मगह हे नाव यावर आधारित आहे. ही बोली पटणा, गया, पलामू, हजारीबाग, मुंगेर, भागलपूर आणि याच्या आजूबाजूच्या गावात ही भाषा बोलली जाते. यांच्यात लोकसाहित्य व ललित साहित्य भरपूर प्रमाणात आहे.
मैथिली : मागधी अपभ्रंशाच्या मध्यवर्ती स्थाने विकसित ही बोली हिंदी आणि बंगालच्या सीमेवर मिथीलमध्ये बोलली जाते. दरभंगा, मुजकफ्फरपूर, पूर्णिया आणि मुंगेर हे यात येतं. लोकसाहित्याच्या दृष्टिकोनातून मैथिली भाषा फार संपन्न आहे आणि यातल्या साहित्य रचना अत्यंत प्राचीन काळापासून लिहिल्या गेल्या आहेत. हिंदी साहित्याला विद्यापतीसारखे प्रभावी कवी देण्याचं श्रेय मैथिलीलाच आहे. याव्यतिरिक्त गोविंददास, रणजीतलाल, हरीमोहन झा हेही चांगले साहित्यकार आहेत. आपण मराठी भाषेविषयीचे विवरणा करण्यापूर्वी अपभ्रंशी हिंदी भाषेचा विचार केला. आता मराठीचा करूया.
 अपभ्रंश हा संस्कृत शब्द आहे. अपभ्रंश म्हणजे उत्क्रांत. संस्कृतपासून भिन्नत्व पावणे म्हणजे अपभ्रंश पावणे. परिस्थिती परिमानाने व कालमानाने सुधारत जाऊन बदल होणे यालाच अपभ्रंश म्हणतात. अशा अपभ्रंशासाठी दोन शतकांचा काळ पुरेसा ठरतो. जो अपभ्रंश झाला. पुढे त्याचाही अपभ्रंश होण्यासाठी आणखी अवधी लोटावा लागतो. शके ८०० मध्ये महाराष्ट्री होती. शके १२०० मध्ये तिचे रूप मराठी होते. याचा अर्थ महाराष्ट्री अपभ्रंशित भाषा शके १००० मध्ये असावी. हिंदी भाषेसाठी शौरसेनी, मागधी, पैशाची अपभ्रंशित होत्या. महाराष्ट्राची अपभ्रंश, मात्र कुठल्याही महाराष्ट्री काळात अथवा तद्नंतरच्या काळात एखाद्या ग्रंथात सापडत नाही. महाराष्ट्र सारस्वतकार म्हणतात त्यानुसार
ज्या प्रांताला हल्ली आपण ‘मथुरा मंडळ’ म्हणतो त्या प्रांताला पूर्वी ‘शूरसेन’ म्हणत असत. या प्रांतातल्या लोकांच्या मूळच्या भाषेला ‘शौरसेनी’ भाषा असे स्वतंत्र व निराळे नाव लोक योजू लागले. त्याचप्रमाणे गयेच्या आसपासचा जो मुलूख त्याला ‘मगध’ देश अशी संज्ञा होती. या प्रांतातल्या भाषेला ‘मागधी’ असे म्हणत. ‘बुखारा’, ‘पंजाब’ वगैरे प्रदेशांतल्या लोकांस ‘बाल्हीक’ असे म्हणत व हे ‘बाल्हीका’ लोक पिशाच्चांची संतती होय, असे महाभारताच्या कर्णपर्वात सांगितले आहे. म्हणजे या प्रदेशाला प्राचीन काळी ‘पैशाच देश’ असे म्हणत, हे उघड होते. या प्रदेशाची राजधानी ‘पैशाचपूर’ ऊर्फ ‘पेशावर’ ही होती. पैशाच देशाच्या राजधानीच्या शहरात व त्याच्याभोवती जी भाषा किंवा संस्कृत भाषेचे जे स्वरूप शिष्टांच्या भाषणात येई त्याला ‘पैशाची’ भाषा असे म्हणू लागले आणि त्याप्रमाणेच ‘महाराष्ट्र’ या नावाने समजल्या जाणार्‍या प्रांतांत जी भाषा लोक वापरू लागले किंवा संस्कृताचे जे रूप शिष्ट लोक आपल्या व्यवहारात योजू लागले ते रूप ही ‘महाराष्ट्री’ भाषा होय.
वर सांगितलेल्या सर्व भाषा एकेकाळी या हिंदुस्थान देशात चालू होत्या, परंतु इतर बाबींप्रमाणे देशकालपरत्वे नित्यव्यवहाराच्या भाषेतही फेरबदल होऊ लागतो.
१. काही ग्रंथकारांच्या मते पेशावर ही प्राचीन राजधानी नसून ते शहर याहून अगदी भिन्न होते.
ती ‘स्थिर’ किंवा ‘कायमची’ अशी केव्हाही जिवंत राहू शकत नाही. या नियमानुसार ‘शौरसेनी’, ‘मागधी’, ‘पैशाची’ व ‘महाराष्ट्री’ या सर्व भाषांत निरनिराळे फरक झाले. यामुळे भाषेच्या रूपाहून भिन्न अशी नवी रूपे या भाषांस प्राप्त झाली. या नवीन व भिन्न रूपास त्या त्या भाषांचा ‘अपभ्रंश’ असे म्हणू लागले म्हणजे ‘शौरसेनी’, ‘मागधी’, ‘पैशाची’ व ‘महाराष्ट्री’ या चारही भाषांपासून ‘शौरसेनी-अपभ्रंश’, ‘मागधी-अपभ्रंश’, ‘पैशाची -अपभ्रंश’ व ‘महाराष्ट्री-अपभ्रंश’ असे चार अपभ्रंश सिद्ध झाले.
हे ‘अपभ्रंश’ किंवा या ‘अपभ्रंश-भाषा’ कालांतराने शिष्टत्व पावून त्या प्रदेशाची मूळ भाषा म्हणून मानल्या जाऊ लागल्या आणि हे झाले तेव्हा मूळ भाषांचा लोप होऊन गेला. त्या जनपदलोकातून अगदी नाहीशा झाल्या. या चार अपभ्रंशांपैकी महाराष्ट्रीच्या अपभ्रंशापासून म्हणजेच महाराष्ट्र अपभ्रंशापासून आपली आजची ‘मराठी’ भाषा उत्पन्न होऊ लागली. हळूहळू ‘महाराष्ट्री-अपभ्रंशा’चा लोप होऊन त्याची जागा ‘मराठी’ने घेतली व जनपदलोक जास्त जास्त वापरू लागल्यामुळे आणि अनेक बुद्धिमान ग्रंथकारांनी तिचा आदर केल्यामुळे ती शिष्टसंमत असे भिन्न धातूच्या रूपापासून ‘मराठी’ या नावाने प्रसिद्ध झाली. याच भाषेला मराठी ग्रंथकार ‘प्राकृत’ आणि ‘देशी’ अशी आणखी दोन नावे देतात.
- नामदेव ढसाळ


मंगळवार, १२ जानेवारी, २०१०

'भारतमाता'ला वाचवायलाच हव !

मराठी अस्मितेचे प्रतिक आणि मराठी चित्रपटांचा एकमेव आधारस्तंभ असलेले 'भारतमाता' चित्रपटगृह केंद्र सरकार आता पाडण्यास निघाले आहे.
The ghost cinemaImage by phill.d via Flickr
मराठी चित्रपटांचे हक्काचे घर असलेले आणि गिरणगावाची शान असलेले 'भारतमाता' चित्रपटगृह खरच वाचवायला हव. यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ कलाकारांनी लढाही उभारला आहे.आणि त्याला साथ देत आहेत गिरणगावातील गिरणी कामगार.
खरतर भारतमाता एक पुरातन वस्तू म्हणून आपल्या सरकारने जतन करायला हवी परंतु येथे तर उलट न्याय मिळत आहे तेच मायबाप सरकार हि वस्तू जमीनदोस्त करायला पुढे सरसावले आहे.
'भारतमाता' हे मुंबईमधील सर्वात जुने चित्रपटगृह आहे आणि तेथे फक्त मराठी चित्रपटच दाखवले जातात.त्याचे नावही असे आहे की ते कोठेही अभिमानाने मिरवता येऊ शकते.या अशा गोष्टी आपल्या अस्मितेच्या खुणा आहेत आणि त्या आपण जपायला हव्यात.
आज शेकडोंच्या संखेने उत्कृष्ट मराठी चित्रपट तयार होत आहेत.नटरंग,दे धक्का ,मी शिवाजीराजे भोसले बोलतोय अशी कितीतरी उदाहरणे देता येतील.हिंदी चित्रपटांच्या बाहूगर्दीत आपला चित्रपट प्रेक्षकांसमोर कसा जाईल अशी धास्ती आज मराठी सिनेनिर्मात्याना असते.त्यावेळी त्यांना फक्त 'भारतमाता'चा आधार असतो.मराठी चित्रपटांची परंपरा हि हिंदीपेक्षा कधीही वैभवशाली आहे आणि ती टिकवली पाहिजे.केवळ मराठी चित्रपट दाखवणारे चित्रपटगृह आता खूप कमी शिल्लक आहेत.पुण्यातील 'प्रभात' आणि मुंबईमधील 'भारतमाता' हि दोच चित्रपटगृहे फक्त मराठी चित्रपट प्रदर्शित करत असतात.आणि तीच उद्ध्वस्त होत असतील तर मराठी माणसाने पाहिचे कोणाकडे?
'भारतमाता' मराठी चित्रपटांचा श्वास आहे ती एक आपल्या संस्कृतीची ओळख आहे आणि तो ठेवा जपण्यासाठी सर्वांनी समोर आले पाहिजे.मग तो कोणत्याही पक्षाचा,जातीचा,धर्माचा 'मराठी' असूद्यात.
फक्त 'भारतमाता'ला वाचवायलाच हव !
Enhanced by Zemanta