१२ ऑगस्ट १९९० रोजी रुचिकाचा हरयाणातील पंचकुलाच्या टेनिस कोर्टावर राठोडने विनयभंग केला. त्याच्याविरोधात रुचिकाने तक्रार नोंदविली आणि तेव्हापासूनच तिच्या आयुष्याला अर्थ राहिला नव्हता. राठोडच्या प्रभावाखाली असलेल्या हरयाणा पोलिसांनी रुचिकाच्या भावाविरुद्ध वर्षभरात चोरीच्या सात तक्रारी दाखल करून त्याला पोलीस ठाण्यात अनेकदा राठोडच्या उपस्थितीतच अनन्वित यातना दिल्या. राठोडच्या दबावाखाली रुचिकाला शाळेतून काढून टाकण्यात आले. तिच्या वडिलांची नोकरीही गेली. आई नसलेल्या रुचिकावर देखरेख ठेवण्यासाठी राठोडच्या इशाऱ्यावरून वीणा नावाची महिला तिच्या घरी ठेवण्यात आली आणि न्यायालयात वीणाची जबानी तिची आई म्हणून नोंदविण्यात आली. रुचिकाच्या विनयभंगाची साक्षीदार ठरलेली तिची मैत्रिण आराधना, तिचे वडील आनंद प्रकाश आणि आई मधु प्रकाश यांनी राठोडने चालविलेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावरूनच दहा वर्षांंनंतर राठोडविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पण तोपर्यंत रुचिकाची इहयात्रा संपली होती. हरयाणाचा पोलीस महासंचालक म्हणून राठोडची ओमप्रकाश चौटाला सरकारने पदोन्नती केली होती आणि त्याने केलेल्या ‘उल्लेखनीय’ सेवेदाखल राष्ट्रपती पदकासाठी त्याच्या नावाची शिफारसही केली होती. रुचिकाचा भाऊ पोलिसांच्या आणि समाजाच्या नजरेत अट्टल चोर बनला होता. एक कुटुंब पूर्णपणे विस्कटून गेले होते.
१९९० पासून २००२ साली बढत्यांसह निवृत्त होईपर्यंत एस. पी. एस. राठोडला नेमका कोणत्या मुख्यमंत्र्याचा वरद्हस्त लाभला यावर सध्या वाद सुरु आहे. जनता दलाचे हुकूम सिंह, काँग्रेसचे भजनलाल, हरयाणा विकास पार्टी-भाजपचे बन्सीलाल आणि इंडियन नॅशनल लोकदल-भाजपचे ओमप्रकाश चौटाला मुख्यमंत्री असतानाच्या काळात राठोडची ‘भरभराट’ झाली. देशातील अन्य कोणत्याही राज्याप्रमाणे हरयाणातही राजकीय नेते, त्यांच्या आश्रयावर पोसलेले गुंड आणि त्यांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांकडून दिवसरात्र कायदा आणि सुव्यवस्थेचे लचके तोडले जातात. कुख्यात गुंडांना तुरुंगात डांबल्याचे दाखवायचे आणि त्यांना पोलिसांच्या मदतीने मोकळे सोडून राजकीय प्रतिस्पध्र्यांचा ‘एन्काऊंटर’ करण्याचीही क्लृप्तीही या राज्यात बिनबोभाट राबविली जाते. कायद्याचा ‘वापर’ करून आपल्या राजकीय विरोधकांना कायमचे वा तात्पुरते गप्प बसविण्यासाठी पोलिसांचा परिणामकारकपणे वापर करता येतो. राजकीय नेते आणि पोलीस एकमेकांना कसे पूरक ठरू शकतात, हे त्यातून दिसून येते. काही नेते गृह मंत्रालयावर जीवापाड प्रेम का करतात, याचेही उत्तर त्यात दडलेले आहे. राज्यकर्त्यांंना पडद्यामागे हिशेब चुकते करण्यासाठी वर्दीतील ‘डर्टी हॅरी’ हवेच असतात आणि राठोडसारखे पोलीस अधिकारी त्यांना उपकृत करण्यासाठी तत्परच असतात. राठोडला पदोन्नती आणि पदक मिळवून देण्यात आपली कोणतीही भूमिका नाही, असे चौटाला निर्लज्जपणे सांगत असले तरी ते वस्तुस्थिती नाकारू शकत नाहीत. ‘बना बनाया डीजीपी’ मिळाल्यानंतर त्याच्याकडून कोणकोणती कामे करून घ्यायची, हे चौटाला आणि त्यांच्या पुत्रांना सांगण्याची गरजच नव्हती.
रुचिका प्रकरणामुळे या सर्व गोष्टींची आता नव्याने चर्चा होऊ लागली आहे. ज्या राज्यात वर्षांनुवर्षे पुरुषी वर्चस्व आहे आणि जिथे जन्मापासूनच मुलींविषयी तिरस्कार बाळगला जातो, अशा दरहजारी ८६१ एवढे देशात सर्वात कमी मुलींचा जन्मदर असलेल्या हरयाणात रुचिकावर झालेल्या अन्यायाबद्दल कुणाला फारसे वावगे वाटत नाही. क्षुल्लक कारणासाठी राठोडला विनाकारण गुंतविण्यात आले, अशीच सर्वसामान्यांची मानसिकता तिथे आहे. पण या निमित्ताने दिल्लीतील प्रसिद्धी माध्यमांचे लक्ष दिल्लीबाहेरच्या प्रकरणांकडे वळले आणि त्याचा फटका मस्तीत वागणाऱ्या राठोडला बसला. भविष्यात बडय़ांच्या अन्यायाला बळी पडलेल्या मध्यमवर्गापासून गरिबांचीही दखल घेतली जाईल, अशी आशा त्यामुळे निर्माण झाली आहे. १९९९ साली मनु शर्माच्या पिस्तुलाची बळी ठरलेल्या जेसिका लाल प्रकरणी आलेल्या निकालावर क्षुब्ध झालेल्या सर्वसामान्यांचा आवाज प्रसिद्धी माध्यमांनी बुलंद केला होता. इंडिया गेटपाशी स्वयंसेवी संस्थांनी मेणबत्त्या घेऊन केलेल्या मूकआंदोलनाने या आवाजाला धार प्रदान केली होती. त्या प्रवासातील एस. पी. एस. राठोड हा नवा प्रवासी ठरला आहे. त्याची ‘मीडिया ट्रायल’ झाल्याने या प्रकरणात आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे. सर्वसामान्यांच्या मनात दहशत बसविणाऱ्या झगमगत्या लाल बत्तीच्या मस्तवालपणाला मिणमिणत्या मेणबत्तीने पुन्हा एकदा जेरीस आणले आहे. खलनायकी हास्य करणारा राठोड वैयक्तिक जीवनात हिंदूी चित्रपटाच्या पटकथेनुसार वागला, आता हिंदूी चित्रपटांना वास्तवातील खलनायकांची मस्ती उतरविणाऱ्या मेणबत्त्यांची दखल घ्यावी लागणार आहे. जेसिका ते रुचिका प्रकरणांनी हेच दाखवून दिले आहे.
(सौजन्य-लोकसत्ता)