रविवार, ३ एप्रिल, २०११

याच क्षणाची तर वाट पाहत होतो ...

काल श्रीलंकेला हरवून आपण क्रिकेटमधील विश्वविजेतेपद मिळवले. आपला त्याच्यावर हक्क होताच अजून किती दिवस वाट पहायची होती ? सचिन सारखा महान खेळाडू संघात असूनहि आपल्याला हे मागील ६ विश्वकप मालिकांमध्ये साध्य करता आले नव्हते.तसेच सचिनच्याही मनात याची सल होतीच. या मालिकेपूर्वी धोनी बोललाही होताच कि 'सचिनसाठी आम्हाला हा कप जिंकायचाच आहे' आणि मालिकावीराचा पुरस्कार मिळवल्यावर युवी सुद्धा म्हणाला कि 'माझी सर्व कामगिरी हि सचीनसाठीच होती'.
 भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू आणि तमाम क्रिकेटप्रेमीना सचिनच्या  कारकिर्दीत विश्वकप जिंकलेला पहायचा होता.तसे या लंकेमुळेच  हे स्वप्न १९९६ मध्ये भंगले होते आणि आता त्याची परतफेड करण्याची वेळ आली होती व ती जुनी देणी 'सुत'समेत वापस केलीही. अंतिम सामना जिंकल्यावरचा देशाचा आणि सचिनचा जल्लोष पाहता  'याच क्षणाची तर वाट पाहत होतो' हे तर त्यांना सांगायचे नाही न असे वाटून गेले.
  विश्वविजेते होण्याचा आनंद काय असतो ते आपल्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरून दिसून येत होते. युवीला आणि भज्जीला त्यांचे अश्रू रोखता आले नाहीत सचिनचा आनंद गगनात मावत नव्हता जणू 'यासाठीच केला होता सर्व अटहास' असेच त्याला भासवायचे  होते.
 १९८३ चा विश्वकप जिंकलेला मी पाहिलेले नाही परंतु विश्वविजेते होण्याचा आनंद काय असतो ते मी काल अनुभवले आहे त्या क्षणाचा  आनंद घेतला आहे आणि मी त्या इतिहासातील सोनेरी पान  होणारया    क्षणाचा भाग्यवंत साक्षीदार आहे :)
त्यामुळे  मला याचा अभिमान असेल - ' I was alive when India lifted the world cup २०११'.
(काही छायाचित्रे )
 

शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०११

'दे घुमाके ' .... विश्वकप घेऊनच या !

काल ढाका येथील बांगबंधू स्टेडीयमवरील रंगारंग कार्यक्रमाने विश्वकप २०११ ची औपचारिक सुरवात झाली.उद्घाटन सोहळा बांगलादेशने अतिशय चांगल्या प्रतीने सर्व आशिया खंडातील संस्कृतीचे दर्शन घडवत 'दे घुमाके' प्रकारे  हजारो चाहत्यांच्या उपस्थित केला याबद्दल त्यांचे कौतुक  करायला हवे.
 आशिया खंडातील या विश्वकपचा हिंदुस्तान एक प्रबळ दावेदार आहे आणि हिंदुस्तान संघसुद्धा जोरदार जोशात आहे . हिंदुस्तान संघाने १९८३ ची पुनरावृत्ती करावी हि देशभावना आहे आणि आपला संघ देशाच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करेल अशी मला आशा आहे. तसेच हा आपल्या आवडत्या सचिनचा शेवटचा विश्वकप असण्याची शक्यता असल्याने त्याला  विश्वचषक उंचावताना पाहण्याची सर्व सचिन चाहत्यांप्रमाणे माझीही इच्छा आहे.
हिंदुस्तानच्या सांघाला एवढेच सांगणे आहे कि 'दे घुमाके' आणि विश्वकप घेऊनच या... सारा देश तुमचे अभिनंदन करण्यासाठी उस्तुक आहे.
क्रिकेटच्या या कुंभमेळ्यासाठी माझ्यातर्फे आणि तमाम मराठी ब्लॉगर आणि वाचकांतर्फे हार्दिक शुभेच्छा !

गुरुवार, १० फेब्रुवारी, २०११

केंजळगड ...राजांचा मनमोहन

केंजळगड हा काही फार नामांकित दुर्ग नव्हे.तो विस्तारानेही विशाल नाही.मात्र,त्याची जागा दोन नद्यांच्या खोरयातील एका पर्वतराजीवर आहे.पलीकडे आहे कृष्णेचे खोरे,तर अलीकडे निरेचे.पलीकडे धोम येथे कृष्णेवर  धरण आहे , तर अलीकडे निरेवर देवघर येथे धरण आहे.केंजळला लागुनच आहे. रायरेश्वराचे पठार.त्या पठारावर जाण्यासाठी असलेल्या वाटांची नवे मोठी मजेशीर आहेत. गायदर,गनेशदरा या सोप्या वाटा; परंतु कागदरा,सुणदरा,लोह्दरा,सांबरदरा,वाघदरा ह्या वाटा मात्र अवघड आहेत.केंजळ किल्ल्याकडून रायरेश्वराकडे जाताना वाटेत सुणदरा आहे.सध्या तेथे शिडी लावली आहे.पूर्वी नव्हती.ती वाट चढून रायरेश्वरावर गेल्यावर आपल्याला ती वाट किती अनोखी आहे ते कळून येते.'रायरेश्वर' महादेवाचे देऊळ तेथे आहे.पाठीमागच्या टेकडीवर गेलो,की आपण समुद्रसपाटीपासून १६९६ मीटर उंचीवर येतो.रायगडापेक्षा १ मीटर जास्त ! येथून गोलाकार नजर फिरवली की एक अफाट दृश्य दिसते.
 वैराटगड,केंजळगड,पांडवगड,कमळगड,पाचगणी,महाबळेश्वर,कोल्हेश्वर,रायगड,लिंगाणा,राजगड,तोरणा,सिंहगड,रोहीडा,पुरंदर,वज्रगड, हे दुर्ग दिसायला लागतात,तर नाकिंदा ह्या रायरेश्वराच्या पश्चिम टोकावरून  प्रतापगड,चंद्रगड,मंगलगडहि दिसायला लागतात.केंजळगड नजीकच आहे.त्याचे दुसरे नाव केलंजा आणि तिसरे मनमोहनगड.हे नाव खास शिवाजी महाराजांनी दिले आहे.भोरहून कोरले,वडतुम्बीला जाऊन तेथून पायी केंजळमाचीपार्यंत चालत यायचं.इथे देवळात मुक्कामाला जागा आहे.गडावर मुक्कामाला जागा नाही.इथून उजव्या हाताने वर चढून गेल्यावर एक सपाटी लागते.इथूनच त्या आश्चर्याला सुरवात होते.इथून दगडात चोपन्न प्रशस्त पायरया खोदून काढल्या आहेत. एक अतिशय उत्तम जिना दगडात कोरला आहे.डाव्या बाजूला आधार असलेली भिंतही छीन्नी लावून व्यवस्थित केली आहे.दुसर्या बाजूला मात्र दरी आहे.या अशा रानात पायरया कश्या खोदल्या असतील याचे फार आश्चर्य वाटते.त्या कारागिरांकडे उत्तम हत्यारे असावीत;पण हा जिना कोरण्याची दृष्टी कोणाला होती आणि कोणी केला तो खर्च ? ह्या प्रश्नांची उत्तरे संदर्भ नसल्याने देता येत नाहीत.पण केंजळगड केवळ ह्या पायर्यासाठी पाहायला जायला हवे.या अशा दुर्गानीच तर औरंगजेबाला २६ वर्ष कडवी झुंज दिली.ह्यांच्याच आश्रयाने मराठे लढले.एका इंग्रजाने केंजळगडाबाबत लिहिले आहे.'जरा हा किल्ला दृढनिश्चयाने लढवला,तर तो जिंकणे फार अवघड आहे.'
( छायाचित्र- गुगल )

शनिवार, ५ फेब्रुवारी, २०११

आजच्या मराठीची उत्पत्ती...सर्वकाही समष्टीसाठी

उत्तर राजस्थानात अल्वर गुरगाव, भरतपूर हे या क्षेत्रात येतं. मेवो जातीच्या गावात त्यांना मेवाती पण म्हणतात. यांची एक मिश्र बोली अहिरवाटी आहे. ती गुरगांव, दिल्ली, कर्नालच्या क्षेत्रात बोलली जाते. याच्यावर हरियाणीचा प्रभाव आहे. मेवातीमध्ये केवळ लोकसाहित्य आहे. उत्तरी राजस्थानाचा निर्माण शौरसेनी अपभ्रंशाने झालेला आहे.
पूर्वी राजस्थानी : राजस्थानच्या पूर्व भागात जयपूर, अजमेर, किशनगड यात ही बोली बोलली जाते. ही बोली जयपुरी आहे. याचं केंद्र जयपूर आहे. जयपूरला धुंडानी पण म्हणतात, कारण त्या क्षेत्राचे नाव धुंडाणं आहे. शौरसेनी अपभ्रंशांनी विकसित या बोलीमध्ये केवळ लोकसाहित्य आहे.
दक्षिणी राजस्थानी : इंदौर, उज्जैन, देवास, रतलाम, भोपाळ, हुशंगाबाद आणि त्यांच्या आजूबाजूची गावं या क्षेत्रात येतात. याची प्रतिनिधी बोली माळवी आहे. याचे मुख्य क्षेत्र माळवा आहे. शौरसेनी अपभ्रशांनी विकसित या बोलीमध्येसुद्धा पुरेसे लोकसाहित्य आहे.
पश्‍चिम पहाडी : जौनसार, सिरमऊ, शिमला, मंडी, चंबा आणि याच्या आजूबाजूची गावे यामध्ये येतात. यांच्या बोलीत केवळ लोकसाहित्य आहे.
मध्यवर्ती पहाडी : शौरसेनी अपभ्रंशानं विकसित या बोलीचं क्षेत्र गडवाल, कुमाऊ आणि याच्या आजूबाजूची गावं येतात. वस्तुत: गडवाली आणि कुमाऊ या दोन बोलीभाषांचे हे सामूहिक नाव आहे. यात साहित्य आणि लोकसाहित्य दोन्ही आहेत.
भोजपुरी : बिहारच्या शाहाबाद जिल्ह्याच्या भोजपूर गावच्या नावामुळे या बोलीचं नाव भोजपुरी पडलं आहे. मागधी अपभ्रंशांच्या पश्‍चिम रूपाच्या विकसित या बोलीमध्ये बनारस, जौनपूर, मिरजापूर, गाजीपूर, बलिया, गोरखपूर, देवरीया, आजमगड, बस्ती, शाहबाज, चंपारन, सारन आणि याच्या आजूबाजूची गावे आहेत. हिंदी प्रदेशाच्या बोलीभाषेत भोजपुरी बोलणारे सर्वात अधिक आहेत. भोजपुरीमध्ये मुख्यत: लोकसाहित्यच आहे. शिष्ट साहित्य फार कमी आहे. भारतेंदू, प्रेमचंद, प्रसाद या ठिकाणचे असूनही त्यांनी या भाषेचा साहित्यात कधी वापर केला नाही.
मगही : संस्कृत मगधपासून विकसित शब्द मगह हे नाव यावर आधारित आहे. ही बोली पटणा, गया, पलामू, हजारीबाग, मुंगेर, भागलपूर आणि याच्या आजूबाजूच्या गावात ही भाषा बोलली जाते. यांच्यात लोकसाहित्य व ललित साहित्य भरपूर प्रमाणात आहे.
मैथिली : मागधी अपभ्रंशाच्या मध्यवर्ती स्थाने विकसित ही बोली हिंदी आणि बंगालच्या सीमेवर मिथीलमध्ये बोलली जाते. दरभंगा, मुजकफ्फरपूर, पूर्णिया आणि मुंगेर हे यात येतं. लोकसाहित्याच्या दृष्टिकोनातून मैथिली भाषा फार संपन्न आहे आणि यातल्या साहित्य रचना अत्यंत प्राचीन काळापासून लिहिल्या गेल्या आहेत. हिंदी साहित्याला विद्यापतीसारखे प्रभावी कवी देण्याचं श्रेय मैथिलीलाच आहे. याव्यतिरिक्त गोविंददास, रणजीतलाल, हरीमोहन झा हेही चांगले साहित्यकार आहेत. आपण मराठी भाषेविषयीचे विवरणा करण्यापूर्वी अपभ्रंशी हिंदी भाषेचा विचार केला. आता मराठीचा करूया.
 अपभ्रंश हा संस्कृत शब्द आहे. अपभ्रंश म्हणजे उत्क्रांत. संस्कृतपासून भिन्नत्व पावणे म्हणजे अपभ्रंश पावणे. परिस्थिती परिमानाने व कालमानाने सुधारत जाऊन बदल होणे यालाच अपभ्रंश म्हणतात. अशा अपभ्रंशासाठी दोन शतकांचा काळ पुरेसा ठरतो. जो अपभ्रंश झाला. पुढे त्याचाही अपभ्रंश होण्यासाठी आणखी अवधी लोटावा लागतो. शके ८०० मध्ये महाराष्ट्री होती. शके १२०० मध्ये तिचे रूप मराठी होते. याचा अर्थ महाराष्ट्री अपभ्रंशित भाषा शके १००० मध्ये असावी. हिंदी भाषेसाठी शौरसेनी, मागधी, पैशाची अपभ्रंशित होत्या. महाराष्ट्राची अपभ्रंश, मात्र कुठल्याही महाराष्ट्री काळात अथवा तद्नंतरच्या काळात एखाद्या ग्रंथात सापडत नाही. महाराष्ट्र सारस्वतकार म्हणतात त्यानुसार
ज्या प्रांताला हल्ली आपण ‘मथुरा मंडळ’ म्हणतो त्या प्रांताला पूर्वी ‘शूरसेन’ म्हणत असत. या प्रांतातल्या लोकांच्या मूळच्या भाषेला ‘शौरसेनी’ भाषा असे स्वतंत्र व निराळे नाव लोक योजू लागले. त्याचप्रमाणे गयेच्या आसपासचा जो मुलूख त्याला ‘मगध’ देश अशी संज्ञा होती. या प्रांतातल्या भाषेला ‘मागधी’ असे म्हणत. ‘बुखारा’, ‘पंजाब’ वगैरे प्रदेशांतल्या लोकांस ‘बाल्हीक’ असे म्हणत व हे ‘बाल्हीका’ लोक पिशाच्चांची संतती होय, असे महाभारताच्या कर्णपर्वात सांगितले आहे. म्हणजे या प्रदेशाला प्राचीन काळी ‘पैशाच देश’ असे म्हणत, हे उघड होते. या प्रदेशाची राजधानी ‘पैशाचपूर’ ऊर्फ ‘पेशावर’ ही होती. पैशाच देशाच्या राजधानीच्या शहरात व त्याच्याभोवती जी भाषा किंवा संस्कृत भाषेचे जे स्वरूप शिष्टांच्या भाषणात येई त्याला ‘पैशाची’ भाषा असे म्हणू लागले आणि त्याप्रमाणेच ‘महाराष्ट्र’ या नावाने समजल्या जाणार्‍या प्रांतांत जी भाषा लोक वापरू लागले किंवा संस्कृताचे जे रूप शिष्ट लोक आपल्या व्यवहारात योजू लागले ते रूप ही ‘महाराष्ट्री’ भाषा होय.
वर सांगितलेल्या सर्व भाषा एकेकाळी या हिंदुस्थान देशात चालू होत्या, परंतु इतर बाबींप्रमाणे देशकालपरत्वे नित्यव्यवहाराच्या भाषेतही फेरबदल होऊ लागतो.
१. काही ग्रंथकारांच्या मते पेशावर ही प्राचीन राजधानी नसून ते शहर याहून अगदी भिन्न होते.
ती ‘स्थिर’ किंवा ‘कायमची’ अशी केव्हाही जिवंत राहू शकत नाही. या नियमानुसार ‘शौरसेनी’, ‘मागधी’, ‘पैशाची’ व ‘महाराष्ट्री’ या सर्व भाषांत निरनिराळे फरक झाले. यामुळे भाषेच्या रूपाहून भिन्न अशी नवी रूपे या भाषांस प्राप्त झाली. या नवीन व भिन्न रूपास त्या त्या भाषांचा ‘अपभ्रंश’ असे म्हणू लागले म्हणजे ‘शौरसेनी’, ‘मागधी’, ‘पैशाची’ व ‘महाराष्ट्री’ या चारही भाषांपासून ‘शौरसेनी-अपभ्रंश’, ‘मागधी-अपभ्रंश’, ‘पैशाची -अपभ्रंश’ व ‘महाराष्ट्री-अपभ्रंश’ असे चार अपभ्रंश सिद्ध झाले.
हे ‘अपभ्रंश’ किंवा या ‘अपभ्रंश-भाषा’ कालांतराने शिष्टत्व पावून त्या प्रदेशाची मूळ भाषा म्हणून मानल्या जाऊ लागल्या आणि हे झाले तेव्हा मूळ भाषांचा लोप होऊन गेला. त्या जनपदलोकातून अगदी नाहीशा झाल्या. या चार अपभ्रंशांपैकी महाराष्ट्रीच्या अपभ्रंशापासून म्हणजेच महाराष्ट्र अपभ्रंशापासून आपली आजची ‘मराठी’ भाषा उत्पन्न होऊ लागली. हळूहळू ‘महाराष्ट्री-अपभ्रंशा’चा लोप होऊन त्याची जागा ‘मराठी’ने घेतली व जनपदलोक जास्त जास्त वापरू लागल्यामुळे आणि अनेक बुद्धिमान ग्रंथकारांनी तिचा आदर केल्यामुळे ती शिष्टसंमत असे भिन्न धातूच्या रूपापासून ‘मराठी’ या नावाने प्रसिद्ध झाली. याच भाषेला मराठी ग्रंथकार ‘प्राकृत’ आणि ‘देशी’ अशी आणखी दोन नावे देतात.
- नामदेव ढसाळ


मंगळवार, १ फेब्रुवारी, २०११

हा 'उत्सव' चूक कि बरोबर ?

काही दिवसापूर्वी २६ जानेवारीला A WEDNESDAY हा चित्रपट  परत पाहण्याचा  योग आला थोडासा 'डोंबिवली फास्ट' धाटणीचा  हा सुद्धा, सामान्य माणूस सरकारी यंत्रणेला वैतागल्यावर काय करू शकतो किंवा त्याच्या  भावना काय असू  शकतात याची  उत्तम पद्धतीने मांडणी केलेले हे दोन चित्रपट. परंतु असे खरच होऊ शकते का ? किंवा सामान्य माणूस या पातळीवर उतरू शकतो का ? सामान्य माणसाने असे  काही केलेतर योग्य होईल का ? असे प्रश्न मनामध्ये  येत होते.
 आणि अचानक एक ब्रेकिंग न्यूज  आली आरुषीचे वडील राजेश तलवार यांच्यावर न्यायालय परिसरात एका माथेफिरूने धारदार  शस्त्राने डोक्यावर वार केले. सुरवातीला वाटले कोणीतरी माथेफिरूच असावा परंतु त्याचे नाव ऐकल्यावर ते ओळखीचे वाटले 'उत्सव शर्मा ' हाच तो ज्याने  या अगोदर असेच कृत्य केले होते. हरयाणाचा  माजी पोलिस महासंचालक एसपीएस राठोड चंडीगढ न्यायालयातून बाहेर येत असतानाच असाच  त्याच्यावर चाकूने हल्ला केला होता. याचा अर्थ हे त्याने जाणून बुजून केले होते.त्याने असे का केले असावे या दोन्ही केसशी त्याचा दुराय्न्वे हि संबंध नाही मग त्याने असे पाऊल का उचलावे ? कोण हा उत्सव शर्मा ?

अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ डिझाईन या संस्थेत अॅनिमेशन फिल्म डिझाईनचा विद्याथी असलेला उत्सव शर्मा हा एक हुशार विद्यार्थी आहे. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल नाहीत. हा फक्त तो भावनिक  आहे. परंतु आपल्या देशात एवढ भावनिक राहून चालत का हो ? पण त्याला त्याची जाण नसावी अजून शिकत आहे ना त्यामुळेच. रुचिका प्रकरणावर तो एक डॉक्युमेंटरी बनवत होता त्यावेळी तो या केस शी जोडला गेला. रुचिका गिरहोत्रा या १४ वर्षांच्या मुलीचा विनयभंग करून तिच्या आत्महत्येला कारणीभूत झालेल्या आणि तिच्या कुटुंबीयांचा मानसिक व शारीरिक छळ करून त्यांना राहते घर सोडण्यास भाग पाडणाऱ्या राठोडचा १९ वर्षांनीही न्याय झालेला नाही. पोलिस यंत्रणेत उच्चपदावर असलेल्या राठोडला वाचविण्यासाठी अख्खी व्यवस्था कशी कामाला लागली होती. न्यायालय त्याला शिक्षा देण्यास असमर्थ ठरत होते हे पाहूनच उत्सवने त्याच्यावर हल्ला केला होता.
 असाच काही  प्रकार आरुषी-हेमराज खून प्रकरणात झाला आहे. राजेश तलवार यांच्यावर स्वताच्या मुलीच्या खुनाचा आरोप आहे परंतु पुराव्या अभावी हि केस उभी राहू शकत नाही असे कारण देऊन सीबीआय ने क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे.आणि राजेश तलवारची सुटका करण्यात आली आहे.सीबीआयलाही गुन्हा सिद्ध करता येत नाही आणि न्यायालयाला पुरावे हवे आहेत.ज्याच्याकडे पैसा,ताकत,सत्ता आहे तो काहीही करू शकतो आणि सुटू शकतो हे यावरून दिसून येते.
 मग न्याय कुठे आहे आणि सामान्य माणसाला तो कसा मिळणार ? कि पैसेवाले लोकशाहीची चेष्टा करत राहणार आणि सामान्य माणूस फक्त पाहत राहणार ?
 या अशाच घटनांमुळे आपल्या मनात हि चीड निर्माण होते आणि उस्तव सारखे लोक त्या रागाला अशाप्रकारे वाट मोकळी करून देतात त्याची पद्धत चुकीची जरूर असेल परंतु त्या सर्वसामान्य माणसाच्या भावना आहेत असे तुम्हाला वाटत नाही का ? जश्या त्या वरील २ चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत.
 तलवार यांच्या हल्ल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर पश्चाताप नव्हता  पत्रकारांना तो म्हणाला 'मी भावनाप्रधान आहे.त्यामुळे या हल्ल्याबद्दल मला जराही पश्चाताप होत नाही.तुम्ही सर्वजण सध्या आजूबाजूला काय चालले आहे हे पाहतच आहात.आरुषी खुनाबद्दलही सर्वाना चांगलेच माहिती आहे.मात्र पुरावे नाहीत त्यामुळे इथे न्याय मिळणार नाही.सीबीआय  ने क्लोजर रिपोर्ट दिला आहे त्यामुळे पुढे काहीच होणार नाही.न्याय आपल्या मार्गाने जातो आणि आपण सर्वजण केवळ पाहत बसतो !या केसमध्ये तलवार चुकीचा आहे.रुचिका सारखीच हि केस हि अनेक वर्ष चालेल.मात्र हाती काहीच लागणार नाही. '
 उत्सव माथेफिरू आहे मानसिक रुग्ण आहे फक्त असे सांगून या घटनेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही त्याने असे का केले,त्याच्यावर अशी वेळ का आली याचाही विचार होण्याची गरज आहे.आज अनेक गुन्हे करूनही कितीतरी लोक उथळ माथ्याने समाजात फिरत आहेत.त्यामुळे सर्वसामान्य माणसाचा न्यायपालीकेवरील विश्वास कमी होत चालला आहे.सीबीआय सारख्या संस्थाही लाचार होत आहेत.त्यामुळे न्यायालयात अन्याय झालेल्याला न्याय मिळतो कि त्याच्यावर अजून अन्याय होतो असा प्रश्न पडायला लागला आहे.
 रोजच्या अशा घटनांमुळे  सामान्य माणसाचे मन मरून गेले आहे त्यांना याचे आता काहीच वाटत नाही आणि ज्याला काही वाटते तो असा 'उस्तव' बनतो.
मलातरी हा उस्तव चूक वाटत नाही तुम्हीच तुमच्या मनाला विचार आणि ठरवा हा 'उत्सव' चूक कि बरोबर.

मंगळवार, १८ जानेवारी, २०११

माय नेम इज सेन...


हक्क या शब्दाचा अर्थ प्रत्येकाला कळतो आणि प्रत्येक जण आपापल्या हक्कांसाठी झगडत असतो. कधी कुटुंबाशी, कधी समाजाशी तर कधी स्वत:शी. काही असेही या जगात जन्माला येतात, जे फक्त स्वत:च्याच नाही तर संपूर्ण समाजाच्या हक्कांसाठी आपले आयुष्य वेचतात. गरीब व वंचित लोकांच्या प्रश्‍नांनी व्याकुळ झालेले डॉ. विनायक सेन नावाचे बालरोगतज्ज्ञ, जाणीवपूर्वक छत्तीसगडमध्ये आले ते तीन दशकांपूर्वी. तिथेच त्यांनी सामाजिक आरोग्यासाठी आपले जीवन झोकून दिले. त्यांनी त्यांच्या पत्नी एलिनासोबत मुक्ती मोर्चाच्या शहीद रुग्णालयाच्या उभारणीत फार मोठे योगदान केले. जनस्वास्थ्य संघटनेचेही ते सल्लागार आहेत. सुवर्ण पदकांसह वैद्यकीय पदव्या मिळवणारे सेन छत्तीसगडमध्ये आले तेच मुळी आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत. ख्रिश्‍चन मेडिकल कॉलेज, वेल्लोरचा हा अत्यंत हुशार डॉक्टर शपथ घेताना ताठ मानेने उभा होता. ‘मानवसेवा हा माझा पहिला धर्म’ असे प्रत्येकाने म्हटले पण सेनने या एका वाक्याला आपले जीवन बनवले. मोठ्या कंपन्या व हॉस्पिटल त्यांना बोलावत असतानाही त्यांचा निश्‍चय दृढ होता. दवाखान्याच्या नावाखाली छापखाना न टाकता खरंच समाजाची सेवा करायची याच हेतूने त्यांचा प्रवास सुरू झाला. 2004 मध्ये कॉलेजतर्फे त्यांना पॉल हॅरिसन पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या समाजकार्यासाठी मिटानीन व आशा हे दोन सरकारी उपक्रम रचताना सेन यांनी जीव ओतला. छत्तीसगड सरकारचे हे उपक्रम फारच उपयोगी ठरले. अजित जोगींच्या वर्तुळात सरकारच्या अनेक विषयांवर त्यांना सल्लागार म्हणून ओळखले गेले. छत्तीसगडमधील दुर्गम परिसरामध्ये राहून जनहिताचे कार्य करण्याचे धाडस या डॉक्टरने केले. कारण तेच त्याच्या आयुष्याचे ध्येय होते. त्यांनी सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात मूलभूत काम सुरू केले. ‘पीपल्स युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टीज’ नावाच्या संस्थेचे कामही ते करायचे. छत्तीसगडमध्ये आरोग्याचे धडे देत ते सर्वांचे ‘हीरो’ झाले. त्यांना मिळणारा पाठिंबा आणि प्रेम हेच त्यांचे भांडवल होते. उपेक्षितांचा त्यांच्यावर वाढत चाललेला विश्‍वास अनेकांना खटकत होता. डॉ. सेन हे सामाजिक समतेचे आणि समाजवादी मूल्यांचे अनुयायी. एवढ्यावर त्यांना नक्षलवादी म्हणणे बरोबर नाही. दुर्दैवाने नक्षलवाद आणि ‘सलवा जुडूम’ या वावटळीत होरपळ डॉ. सेन यांच्या चळवळीची झाली. पीपल्स युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टीजचे रा्रीय सरचिटणीस म्हणून तुरुंगातील कैद्यांना भेटणे हा त्यांच्या कामाचा भाग होता. या भेटी पोलिसांच्या परवानगीनेच व्हायच्या. तरीही 15 मे 2007 रोजी सेन यांना बिलासपूर येथे अटक करण्यात आली. नक्षलवाद्यांचा नेता नारायण सनयाल आणि उद्योगपती पीयूष गुहा यांच्यात जोडणार्‍या कडीचे काम केल्याचा आरोप त्यांच्यावर लावला गेला. 25 मे 2007 पर्यंत रायपूर सेशन कोर्टाने त्यांचा ‘बेल’ नामंजूर केला. 26 मे ते 4 जून 2007, सेन यांच्या समर्थकांनी जागोजागी मोर्चे काढले. दिल्ली, रायपूर, कोलकाता, मुंबई, लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये लोक त्यांना मुक्त करावे यासाठी रस्त्यावर आले. संपूर्ण जगभरातील लोक या अटकेची दखल घ्यायला लागले. सेन यांच्या पत्नीने सर्व दरवाजे ठोठावले. नॅशनल ह्युमन राईटस् कमिशनलादेखील त्यांनी आपल्या आरोग्य क्षेत्रातील कार्याची माहिती पटवण्याचा प्रयत्न केला पण सारे व्यर्थ. प्रत्येक वेळी कोर्टाची पायरी चढताना सेन हसतच चढले. त्यांचे म्हणणे असे की ‘‘मी खरेपणाने जगलो म्हणून मी हसत आहे. ही परीक्षा माझी नाही, ही परीक्षा या देशातील लोकशाहीची व मानवाधिकारांची आहे.’’ 15 मार्च 2008 पासून ते 11 एप्रिल 2008 त्यांना एकटे एका अंधार कोठडीत ठेवण्यात आले. त्यांना वृत्तपत्रं देण्यात यायची पण महत्त्वाच्या घडामोडींची पाने काढून. जेलमधील लोकांनाही त्यांचे व्यक्तिमत्त्व जरा ‘हटकेच’ वाटायचे. एवढ्या प्रेमाने ते सर्वांशी बोलत की तुरुंगातील अधिकारीदेखील दुविधेत असायचे. 29 मे 2008 मध्ये जॉनेयन मॅन पुरस्कार त्यांच्या पदरी पडला. आरोग्य आणि मानवाधिकार या कार्यात मिळणारा हा सर्वोत्तम पुरस्कार आहे. पण हिंदुस्थान आणि चायनातले साम्य इथे दिसून आले. त्यांना तो घेण्याकरिता जाऊ नाही दिले. नोबल पुरस्कार मिळालेल्या 22 महान व्यक्तींनी आपल्या रा्रपती व पंतप्रधानांना पत्र लिहून सेन यांना पुरस्कार घेऊ द्यावा अशी विनंती केली. सेन म्हणतात, ‘मानवाधिकारांची जाण समाजाला होणे हेच माझे ध्येय आणि हाच माझा पुरस्कार. सेशन कोर्टातून हायकोर्ट, तेथून सुप्रीम कोर्ट हा संपूर्ण प्रवास डॉ. सेन यांनी धैर्याने पार पाडला. 25 मे 2009 मध्ये त्यांना ‘बेल’ मिळाली. तब्येत खराब होत असल्यामुळे सुप्रीम कोर्टातील मार्कंडेय कतजु आणि जसटीस दीपक वर्मा यांनी सेन यांचा ‘बेल’ स्वीकारला. वर्ष उलटले, चित्र काही फार वेगळे नाही. देशाविरुद्ध युद्ध पुकारणे, प्रक्षोभक वक्तव्य करणे तसेच प्रतिबंधित माओवादी संघटनेला मदत केल्याप्रकरणी रायपूर कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. त्यांचे वकील सुरेंद्र सिंग होते. ‘‘माझ्या घरात माओवादी’वरील पुस्तके मिळाली म्हणून जर मी माओवादी असेन तर स्वातंत्र्यावर लिहिलेली पुस्तके घरात असली म्हणजे ते स्वातंत्र्यसैनिक झाले का?’’ अशी थट्टा करत सेन यांनी सिंग यांच्याकडे केली. या सर्व केसमधील अनेक पुरावे ‘जर-तर’वर आधारित असले तरी आता निकाल लागलाय. अफझल गुरू व कसाब यांना दहशतवाद माजवताना आपण टीव्हीवर पाहिले तरी ते अजून आपले पाहुणे बनून राहिले आहेत. आपल्या देशातील प्रत्येक नागरिक कसाबच्या केसमधील एक ‘विटनेस’ आहे. बहुतेक सरकारप्रमाणे हा ‘मानवाधिकार’ असावा कसाबकरिता मानवाधिकार म्हणजे काय हे आता समजून घेण्याची वेळ आली आहे. उत्कृ डॉक्टर, आयुष्य वाहणारा मानवाधिकार कार्यकर्ता व उपेक्षांचा ‘हीरो’ डॉ. विनायक सेन हे आता आयुष्यभर तुरुंगात राहतील. पण या जन्मठेपेची बातमी कळल्यानंतरचे स्मितहास्य मात्र कुणी विसरू शकणार नाही. मानवाधिकार म्हणजे एकाचा अधिकार काढून दुसर्‍यास देणे नाही. प्रत्येकाने हे समजून वागावे. एखाद्याच्या अधिकारांसाठी लढताना सर्वांचा विचार असावा हेही तेवढेच खरे. सर्वांचे अधिकार महत्त्वाचे. देशाचेसुद्धा. डॉ. विनायक सेन यांच्या जन्मठेपेच्या बातमीने अनेकांचे डोळे भिजवले. पण निकाल ऐकल्यावर सेन यांचा शांत व हसरा चेहरा जणू म्हणत होता, ‘‘माय नेम इज सेन ऍण्ड आय एम नॉट अ टेररिस्ट.’’
(Article in Samana by dr.swapnapatker@gmail.com)