सोमवार, २५ एप्रिल, २०११

कूछ तो बात हें बॉस...

जगभरातील करोडो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सत्यसाईबाबा यांचे काल निधन झाले. त्यावेळी त्यांची संपत्ती,त्यांचे अनुयायी  आणि त्यांनी केलेले चमत्कार यांचीही चर्चा झाली.अशा बाबागिरीवर आम्हा मित्रांमध्ये यापूर्वीही खूपवेळा चर्चा वाद झाले आहेत. परंतु एका गोष्टीचे आश्चर्य राहून राहून वाटते ते म्हणजे बाबांचे अनुयायी सेलेब्रिटीज,खेळाडू,उद्योगपती,राजकारणी,गायक,संगीत क्षेत्रातले दिग्गज कोण कोण म्हणून सांगू सगळी बाप मानस.
 ज्या लोकांना भेटण्यासाठी लोक महिनोन महिने त्यांच्या ऑफिसचे उंबरे झिझवतात असे मंत्री,राजकारणी या बाबांचा आशीर्वाद मिळावा म्हणून रांगेत उभे राहतात त्यांचे पाय धरतात. काय कमी असते या लोकांना पैसा,प्रसिद्धी,अधिकार सर्व काही मनासारखे असते तरीही यांना बाबांची गरज का भासत असावी ?
 बरे आपल्या देशातीलच सोडा बाहेरील देशातील लोकसुद्धा यांचे अनुयायी तेही एक दोन नाही हजारो लाखो तेही कित्येक देशामधले या गोष्टीचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.
 आपण सामान्य लोक अशा बाबांच्या भोदुगिरीबद्दल त्यांचे चमत्कार कसे खोटे आहेत याबद्दल बोलतो युटूबवरील त्याचे विडीओ शेअर करतो या गोष्टी या लोकांना माहिती नसतात का किंवा कळत नाहीत का? अशोक चव्हाण , सचिन तेंडूलकर,रतन टाटा यांना तरी कळायला हव ना, बर गेला बाजार अब्दुल कलाम यानाही हे समजत नसावे का ? कि या चमत्कारा व्यतिरिक्त दुसरी अशी काही गोष्ट असावी जी या लोकांना बाबांपर्यंत घेऊन जात असावी ? कारण हि सर्व लोक एवढी मूर्ख वाटत नाहीत. काय असावी ती गोष्ट... 'मानसिक समाधान' ?
 मी सत्य साई बाबांचा एक कार्यक्रम 'आस्था'वर पाहिला होता त्यात कितीतरी आलिशान आणि लाखो करोडो किंमत असलेल्या नवीन गाड्या घेऊन मोठ मोठे उद्यागपति उभे होते फक्त बाबांनी त्यांच्या गाडीत बसावे म्हणून बाबा यायचे आणि फक्त जास्तीत  जास्त आर्धा फुट गाडी चालली कि थांबवून उतरायचे कि लगेच पुढील गाडीत तिथेही सेम त्यानंतर सर्वजण येऊन त्यांच्या पायावर डोके टेकायचे ... अरे याला काय म्हणावे बाबा त्या माणसाची नाहीतर त्या गाडीची तरी किंमत ठेवा ना राव. त्यानंतर बाबा चालत चालत प्रसाद वाटत होते वाटत कसला फेकत होते आणि सर्व लोक तो मिळवण्यासाठी उड्या  मारत होते जणू सलमानने आपला शर्ट काढून फेकावा आणि मुलीनी तो मिळवण्यासाठी उड्या माराव्यात.
 अशा बाबांकडे आणि त्यांच्या अनुयायांकडे पाहिल्यावर मला त्या बाबांना दाद द्यावीशी वाटते त्यांच्यात असे काहीतरी वेगळे आहे, माणसे आपल्याकडे खेचण्याची ताकत आहे हे नक्की IAS ,IPS अधिकारीही उगीच आपली नोकरी सोडून यांची सेवा करत असतात का ? कूछ तो बात हें बॉस.
तसेही आपणही साई बाबांच्या दर्शनाला शिर्डीला जातोच कि तेही बाबाच  आहेत त्यांनीही त्याकाळी चमत्कारच दाखवले  होते. स्वामी समर्थ हि बाबाच आणि गोंदवलेकरहि बाबाच ! आज आपल्या काळात सत्य साई होऊन गेले म्हणून नाहीतर आपणही शिर्डीला जातो तसे त्यांच्या समाधीच्या दर्शनाला गेलोच असतो कि किंवा काही वर्षानंतर आपली पुढची पिढी त्यांच्या समाधीच्या दर्शनाला जाणार नाही कशावरून ?
 बाबागिरी आणि आपला देश कितीही प्रयत्न केलातरी वेगळा करता येणार नाही हे आपण पाहत आलो आहोत आणि पहार राहणार आहोत असेच दिसून  येत आहे. चला बाबांच्या चमत्काराची नाही तर त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची आठवण ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहुयात.

सोमवार, ११ एप्रिल, २०११

मास्टर माइंड... अरविंद केजरीवाल

जन लोकपाल विधेयकासाठी आण्णा हजारे यांनी जे आंदोलन जंतर मंतर येथे केले त्याला अखेर यश मिळाले त्यामुळे पूर्ण देशात आण्णांचा गाजावाजा सुद्धा झाला परंतु हे सर्व होत असताना एक साध्या वेशातील उत्कृष्ट इंग्लिश आणि हिंदी बोलणारा कार्यकर्ता लक्ष वेधून घेत होता.त्याबद्दल थोडी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांचे नाव अरविंद केजरीवाल आहे असे समजले तेच ते केजरीवाल ज्यांना २००६ साली सामाजिक कार्यासाठी मैग्सेस पुरस्कार मिळाला आहे.
 अरविंद केजरीवाल यांनी माहितीच्या अधिकारामध्ये खूप मोठे काम केले आहे आणि जन लोकपाल विधेयाकासाठीची व्युव्हरचना सुद्धा त्यांचीच होती त्यांनीच आण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांना या आंदोलनात भाग घ्यायला लावला व आंदोलन दिल्लीमध्ये घेऊन गेले.त्याचा व्हायचा तो परिणाम झाला नाहीतर आण्णांनी महाराष्ट्रामध्ये असे आंदोलन करून पाहिजे असा परिणाम साध्य झाला नसता. केजरीवाल यांच्यामुळेच हे आंदोलन फेसबुक,ट्विटर तसेच सर्वत्र नेटवर पोहचले.सरकार बरोबरील वाटाघाटीतहि केजरीवाल सर्वात पुढे होते एवढेच काय पत्रकार परिषदमध्ये  सुद्धा ते आण्णांना मार्गदर्शन करताना दिसून येत होते.
 केजरीवाल यांच्याबद्दल अजून जाणून घ्यायचा प्रयत्न केल्यावर समजले कि त्यांनी १९८९ साली आईआईटी खडगपूर येथून मेकेनिकलची बीटेक डिग्री घेतली आहे आणि ते मुळचे हिसार हरियाना येथील आहेत.त्यानंतर ते १९९२ मध्ये सिव्हील सर्विसेस मध्ये गेले आणि दिल्लीचे सहायक आयकर आयुक्त झाले.त्यावेळी त्यांचा खरा संबंध सरकारी व्यवस्थेशी आला आणि तेथूनच त्यांचा संघर्ष सुरु झाला.आयकर विभागात चालू असलेल्या गैरकारभाराला आळा घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यामुळे त्याची बदली करण्यात आली आणि त्यामुळे त्यांचे मन सरकारी नोकरीवरून उठले व ते सामाजिक कार्यात भाग घेऊ लागले त्यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करून भ्रष्टाचाराची भरपूर प्रकरणे बाहेर काढली आणि त्याच वेळी त्यांनी लोकपाल विधेयक पास करून घेण्यासाठीचे प्रयत्न चालू केले परंतु सरकार घेऊन येत असलेले लोकपाल विधेयकात खूप त्रुटी आहेत हे लक्षात आल्यावर त्यांनी जन लोकपाल बिलाची मागणी लावून धरली आणि त्याचा मसुदा तयार केला आणि आण्णा आणि समविचारी कार्यकर्त्यांना घेऊन जंतर मंतरवर आंदोलन केले. त्या आंदोलनाला यश मिळाले असून  लवकरच जन लोकपाल विधेयक पास होईल अशी आशा करूयात आणि त्यामुळे देशातील भ्रष्टाचार कमी होऊन भ्रष्टाचारी लोकांना शिक्षा मिळावी हीच इच्छा.
 केजरीवाल यांच्या सारख्या लोकांमुळेच हे आंदोलन एवढे भव्य रूप घेऊ शकले आणि त्याला यश मिळू शकले साधी राहणी आणि उच्च विचार असणारया या सामाजिक कार्यकर्त्याला सलाम !

रविवार, ३ एप्रिल, २०११

याच क्षणाची तर वाट पाहत होतो ...

काल श्रीलंकेला हरवून आपण क्रिकेटमधील विश्वविजेतेपद मिळवले. आपला त्याच्यावर हक्क होताच अजून किती दिवस वाट पहायची होती ? सचिन सारखा महान खेळाडू संघात असूनहि आपल्याला हे मागील ६ विश्वकप मालिकांमध्ये साध्य करता आले नव्हते.तसेच सचिनच्याही मनात याची सल होतीच. या मालिकेपूर्वी धोनी बोललाही होताच कि 'सचिनसाठी आम्हाला हा कप जिंकायचाच आहे' आणि मालिकावीराचा पुरस्कार मिळवल्यावर युवी सुद्धा म्हणाला कि 'माझी सर्व कामगिरी हि सचीनसाठीच होती'.
 भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू आणि तमाम क्रिकेटप्रेमीना सचिनच्या  कारकिर्दीत विश्वकप जिंकलेला पहायचा होता.तसे या लंकेमुळेच  हे स्वप्न १९९६ मध्ये भंगले होते आणि आता त्याची परतफेड करण्याची वेळ आली होती व ती जुनी देणी 'सुत'समेत वापस केलीही. अंतिम सामना जिंकल्यावरचा देशाचा आणि सचिनचा जल्लोष पाहता  'याच क्षणाची तर वाट पाहत होतो' हे तर त्यांना सांगायचे नाही न असे वाटून गेले.
  विश्वविजेते होण्याचा आनंद काय असतो ते आपल्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरून दिसून येत होते. युवीला आणि भज्जीला त्यांचे अश्रू रोखता आले नाहीत सचिनचा आनंद गगनात मावत नव्हता जणू 'यासाठीच केला होता सर्व अटहास' असेच त्याला भासवायचे  होते.
 १९८३ चा विश्वकप जिंकलेला मी पाहिलेले नाही परंतु विश्वविजेते होण्याचा आनंद काय असतो ते मी काल अनुभवले आहे त्या क्षणाचा  आनंद घेतला आहे आणि मी त्या इतिहासातील सोनेरी पान  होणारया    क्षणाचा भाग्यवंत साक्षीदार आहे :)
त्यामुळे  मला याचा अभिमान असेल - ' I was alive when India lifted the world cup २०११'.
(काही छायाचित्रे )
 

शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०११

'दे घुमाके ' .... विश्वकप घेऊनच या !

काल ढाका येथील बांगबंधू स्टेडीयमवरील रंगारंग कार्यक्रमाने विश्वकप २०११ ची औपचारिक सुरवात झाली.उद्घाटन सोहळा बांगलादेशने अतिशय चांगल्या प्रतीने सर्व आशिया खंडातील संस्कृतीचे दर्शन घडवत 'दे घुमाके' प्रकारे  हजारो चाहत्यांच्या उपस्थित केला याबद्दल त्यांचे कौतुक  करायला हवे.
 आशिया खंडातील या विश्वकपचा हिंदुस्तान एक प्रबळ दावेदार आहे आणि हिंदुस्तान संघसुद्धा जोरदार जोशात आहे . हिंदुस्तान संघाने १९८३ ची पुनरावृत्ती करावी हि देशभावना आहे आणि आपला संघ देशाच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करेल अशी मला आशा आहे. तसेच हा आपल्या आवडत्या सचिनचा शेवटचा विश्वकप असण्याची शक्यता असल्याने त्याला  विश्वचषक उंचावताना पाहण्याची सर्व सचिन चाहत्यांप्रमाणे माझीही इच्छा आहे.
हिंदुस्तानच्या सांघाला एवढेच सांगणे आहे कि 'दे घुमाके' आणि विश्वकप घेऊनच या... सारा देश तुमचे अभिनंदन करण्यासाठी उस्तुक आहे.
क्रिकेटच्या या कुंभमेळ्यासाठी माझ्यातर्फे आणि तमाम मराठी ब्लॉगर आणि वाचकांतर्फे हार्दिक शुभेच्छा !

गुरुवार, १० फेब्रुवारी, २०११

केंजळगड ...राजांचा मनमोहन

केंजळगड हा काही फार नामांकित दुर्ग नव्हे.तो विस्तारानेही विशाल नाही.मात्र,त्याची जागा दोन नद्यांच्या खोरयातील एका पर्वतराजीवर आहे.पलीकडे आहे कृष्णेचे खोरे,तर अलीकडे निरेचे.पलीकडे धोम येथे कृष्णेवर  धरण आहे , तर अलीकडे निरेवर देवघर येथे धरण आहे.केंजळला लागुनच आहे. रायरेश्वराचे पठार.त्या पठारावर जाण्यासाठी असलेल्या वाटांची नवे मोठी मजेशीर आहेत. गायदर,गनेशदरा या सोप्या वाटा; परंतु कागदरा,सुणदरा,लोह्दरा,सांबरदरा,वाघदरा ह्या वाटा मात्र अवघड आहेत.केंजळ किल्ल्याकडून रायरेश्वराकडे जाताना वाटेत सुणदरा आहे.सध्या तेथे शिडी लावली आहे.पूर्वी नव्हती.ती वाट चढून रायरेश्वरावर गेल्यावर आपल्याला ती वाट किती अनोखी आहे ते कळून येते.'रायरेश्वर' महादेवाचे देऊळ तेथे आहे.पाठीमागच्या टेकडीवर गेलो,की आपण समुद्रसपाटीपासून १६९६ मीटर उंचीवर येतो.रायगडापेक्षा १ मीटर जास्त ! येथून गोलाकार नजर फिरवली की एक अफाट दृश्य दिसते.
 वैराटगड,केंजळगड,पांडवगड,कमळगड,पाचगणी,महाबळेश्वर,कोल्हेश्वर,रायगड,लिंगाणा,राजगड,तोरणा,सिंहगड,रोहीडा,पुरंदर,वज्रगड, हे दुर्ग दिसायला लागतात,तर नाकिंदा ह्या रायरेश्वराच्या पश्चिम टोकावरून  प्रतापगड,चंद्रगड,मंगलगडहि दिसायला लागतात.केंजळगड नजीकच आहे.त्याचे दुसरे नाव केलंजा आणि तिसरे मनमोहनगड.हे नाव खास शिवाजी महाराजांनी दिले आहे.भोरहून कोरले,वडतुम्बीला जाऊन तेथून पायी केंजळमाचीपार्यंत चालत यायचं.इथे देवळात मुक्कामाला जागा आहे.गडावर मुक्कामाला जागा नाही.इथून उजव्या हाताने वर चढून गेल्यावर एक सपाटी लागते.इथूनच त्या आश्चर्याला सुरवात होते.इथून दगडात चोपन्न प्रशस्त पायरया खोदून काढल्या आहेत. एक अतिशय उत्तम जिना दगडात कोरला आहे.डाव्या बाजूला आधार असलेली भिंतही छीन्नी लावून व्यवस्थित केली आहे.दुसर्या बाजूला मात्र दरी आहे.या अशा रानात पायरया कश्या खोदल्या असतील याचे फार आश्चर्य वाटते.त्या कारागिरांकडे उत्तम हत्यारे असावीत;पण हा जिना कोरण्याची दृष्टी कोणाला होती आणि कोणी केला तो खर्च ? ह्या प्रश्नांची उत्तरे संदर्भ नसल्याने देता येत नाहीत.पण केंजळगड केवळ ह्या पायर्यासाठी पाहायला जायला हवे.या अशा दुर्गानीच तर औरंगजेबाला २६ वर्ष कडवी झुंज दिली.ह्यांच्याच आश्रयाने मराठे लढले.एका इंग्रजाने केंजळगडाबाबत लिहिले आहे.'जरा हा किल्ला दृढनिश्चयाने लढवला,तर तो जिंकणे फार अवघड आहे.'
( छायाचित्र- गुगल )

शनिवार, ५ फेब्रुवारी, २०११

आजच्या मराठीची उत्पत्ती...सर्वकाही समष्टीसाठी

उत्तर राजस्थानात अल्वर गुरगाव, भरतपूर हे या क्षेत्रात येतं. मेवो जातीच्या गावात त्यांना मेवाती पण म्हणतात. यांची एक मिश्र बोली अहिरवाटी आहे. ती गुरगांव, दिल्ली, कर्नालच्या क्षेत्रात बोलली जाते. याच्यावर हरियाणीचा प्रभाव आहे. मेवातीमध्ये केवळ लोकसाहित्य आहे. उत्तरी राजस्थानाचा निर्माण शौरसेनी अपभ्रंशाने झालेला आहे.
पूर्वी राजस्थानी : राजस्थानच्या पूर्व भागात जयपूर, अजमेर, किशनगड यात ही बोली बोलली जाते. ही बोली जयपुरी आहे. याचं केंद्र जयपूर आहे. जयपूरला धुंडानी पण म्हणतात, कारण त्या क्षेत्राचे नाव धुंडाणं आहे. शौरसेनी अपभ्रंशांनी विकसित या बोलीमध्ये केवळ लोकसाहित्य आहे.
दक्षिणी राजस्थानी : इंदौर, उज्जैन, देवास, रतलाम, भोपाळ, हुशंगाबाद आणि त्यांच्या आजूबाजूची गावं या क्षेत्रात येतात. याची प्रतिनिधी बोली माळवी आहे. याचे मुख्य क्षेत्र माळवा आहे. शौरसेनी अपभ्रशांनी विकसित या बोलीमध्येसुद्धा पुरेसे लोकसाहित्य आहे.
पश्‍चिम पहाडी : जौनसार, सिरमऊ, शिमला, मंडी, चंबा आणि याच्या आजूबाजूची गावे यामध्ये येतात. यांच्या बोलीत केवळ लोकसाहित्य आहे.
मध्यवर्ती पहाडी : शौरसेनी अपभ्रंशानं विकसित या बोलीचं क्षेत्र गडवाल, कुमाऊ आणि याच्या आजूबाजूची गावं येतात. वस्तुत: गडवाली आणि कुमाऊ या दोन बोलीभाषांचे हे सामूहिक नाव आहे. यात साहित्य आणि लोकसाहित्य दोन्ही आहेत.
भोजपुरी : बिहारच्या शाहाबाद जिल्ह्याच्या भोजपूर गावच्या नावामुळे या बोलीचं नाव भोजपुरी पडलं आहे. मागधी अपभ्रंशांच्या पश्‍चिम रूपाच्या विकसित या बोलीमध्ये बनारस, जौनपूर, मिरजापूर, गाजीपूर, बलिया, गोरखपूर, देवरीया, आजमगड, बस्ती, शाहबाज, चंपारन, सारन आणि याच्या आजूबाजूची गावे आहेत. हिंदी प्रदेशाच्या बोलीभाषेत भोजपुरी बोलणारे सर्वात अधिक आहेत. भोजपुरीमध्ये मुख्यत: लोकसाहित्यच आहे. शिष्ट साहित्य फार कमी आहे. भारतेंदू, प्रेमचंद, प्रसाद या ठिकाणचे असूनही त्यांनी या भाषेचा साहित्यात कधी वापर केला नाही.
मगही : संस्कृत मगधपासून विकसित शब्द मगह हे नाव यावर आधारित आहे. ही बोली पटणा, गया, पलामू, हजारीबाग, मुंगेर, भागलपूर आणि याच्या आजूबाजूच्या गावात ही भाषा बोलली जाते. यांच्यात लोकसाहित्य व ललित साहित्य भरपूर प्रमाणात आहे.
मैथिली : मागधी अपभ्रंशाच्या मध्यवर्ती स्थाने विकसित ही बोली हिंदी आणि बंगालच्या सीमेवर मिथीलमध्ये बोलली जाते. दरभंगा, मुजकफ्फरपूर, पूर्णिया आणि मुंगेर हे यात येतं. लोकसाहित्याच्या दृष्टिकोनातून मैथिली भाषा फार संपन्न आहे आणि यातल्या साहित्य रचना अत्यंत प्राचीन काळापासून लिहिल्या गेल्या आहेत. हिंदी साहित्याला विद्यापतीसारखे प्रभावी कवी देण्याचं श्रेय मैथिलीलाच आहे. याव्यतिरिक्त गोविंददास, रणजीतलाल, हरीमोहन झा हेही चांगले साहित्यकार आहेत. आपण मराठी भाषेविषयीचे विवरणा करण्यापूर्वी अपभ्रंशी हिंदी भाषेचा विचार केला. आता मराठीचा करूया.
 अपभ्रंश हा संस्कृत शब्द आहे. अपभ्रंश म्हणजे उत्क्रांत. संस्कृतपासून भिन्नत्व पावणे म्हणजे अपभ्रंश पावणे. परिस्थिती परिमानाने व कालमानाने सुधारत जाऊन बदल होणे यालाच अपभ्रंश म्हणतात. अशा अपभ्रंशासाठी दोन शतकांचा काळ पुरेसा ठरतो. जो अपभ्रंश झाला. पुढे त्याचाही अपभ्रंश होण्यासाठी आणखी अवधी लोटावा लागतो. शके ८०० मध्ये महाराष्ट्री होती. शके १२०० मध्ये तिचे रूप मराठी होते. याचा अर्थ महाराष्ट्री अपभ्रंशित भाषा शके १००० मध्ये असावी. हिंदी भाषेसाठी शौरसेनी, मागधी, पैशाची अपभ्रंशित होत्या. महाराष्ट्राची अपभ्रंश, मात्र कुठल्याही महाराष्ट्री काळात अथवा तद्नंतरच्या काळात एखाद्या ग्रंथात सापडत नाही. महाराष्ट्र सारस्वतकार म्हणतात त्यानुसार
ज्या प्रांताला हल्ली आपण ‘मथुरा मंडळ’ म्हणतो त्या प्रांताला पूर्वी ‘शूरसेन’ म्हणत असत. या प्रांतातल्या लोकांच्या मूळच्या भाषेला ‘शौरसेनी’ भाषा असे स्वतंत्र व निराळे नाव लोक योजू लागले. त्याचप्रमाणे गयेच्या आसपासचा जो मुलूख त्याला ‘मगध’ देश अशी संज्ञा होती. या प्रांतातल्या भाषेला ‘मागधी’ असे म्हणत. ‘बुखारा’, ‘पंजाब’ वगैरे प्रदेशांतल्या लोकांस ‘बाल्हीक’ असे म्हणत व हे ‘बाल्हीका’ लोक पिशाच्चांची संतती होय, असे महाभारताच्या कर्णपर्वात सांगितले आहे. म्हणजे या प्रदेशाला प्राचीन काळी ‘पैशाच देश’ असे म्हणत, हे उघड होते. या प्रदेशाची राजधानी ‘पैशाचपूर’ ऊर्फ ‘पेशावर’ ही होती. पैशाच देशाच्या राजधानीच्या शहरात व त्याच्याभोवती जी भाषा किंवा संस्कृत भाषेचे जे स्वरूप शिष्टांच्या भाषणात येई त्याला ‘पैशाची’ भाषा असे म्हणू लागले आणि त्याप्रमाणेच ‘महाराष्ट्र’ या नावाने समजल्या जाणार्‍या प्रांतांत जी भाषा लोक वापरू लागले किंवा संस्कृताचे जे रूप शिष्ट लोक आपल्या व्यवहारात योजू लागले ते रूप ही ‘महाराष्ट्री’ भाषा होय.
वर सांगितलेल्या सर्व भाषा एकेकाळी या हिंदुस्थान देशात चालू होत्या, परंतु इतर बाबींप्रमाणे देशकालपरत्वे नित्यव्यवहाराच्या भाषेतही फेरबदल होऊ लागतो.
१. काही ग्रंथकारांच्या मते पेशावर ही प्राचीन राजधानी नसून ते शहर याहून अगदी भिन्न होते.
ती ‘स्थिर’ किंवा ‘कायमची’ अशी केव्हाही जिवंत राहू शकत नाही. या नियमानुसार ‘शौरसेनी’, ‘मागधी’, ‘पैशाची’ व ‘महाराष्ट्री’ या सर्व भाषांत निरनिराळे फरक झाले. यामुळे भाषेच्या रूपाहून भिन्न अशी नवी रूपे या भाषांस प्राप्त झाली. या नवीन व भिन्न रूपास त्या त्या भाषांचा ‘अपभ्रंश’ असे म्हणू लागले म्हणजे ‘शौरसेनी’, ‘मागधी’, ‘पैशाची’ व ‘महाराष्ट्री’ या चारही भाषांपासून ‘शौरसेनी-अपभ्रंश’, ‘मागधी-अपभ्रंश’, ‘पैशाची -अपभ्रंश’ व ‘महाराष्ट्री-अपभ्रंश’ असे चार अपभ्रंश सिद्ध झाले.
हे ‘अपभ्रंश’ किंवा या ‘अपभ्रंश-भाषा’ कालांतराने शिष्टत्व पावून त्या प्रदेशाची मूळ भाषा म्हणून मानल्या जाऊ लागल्या आणि हे झाले तेव्हा मूळ भाषांचा लोप होऊन गेला. त्या जनपदलोकातून अगदी नाहीशा झाल्या. या चार अपभ्रंशांपैकी महाराष्ट्रीच्या अपभ्रंशापासून म्हणजेच महाराष्ट्र अपभ्रंशापासून आपली आजची ‘मराठी’ भाषा उत्पन्न होऊ लागली. हळूहळू ‘महाराष्ट्री-अपभ्रंशा’चा लोप होऊन त्याची जागा ‘मराठी’ने घेतली व जनपदलोक जास्त जास्त वापरू लागल्यामुळे आणि अनेक बुद्धिमान ग्रंथकारांनी तिचा आदर केल्यामुळे ती शिष्टसंमत असे भिन्न धातूच्या रूपापासून ‘मराठी’ या नावाने प्रसिद्ध झाली. याच भाषेला मराठी ग्रंथकार ‘प्राकृत’ आणि ‘देशी’ अशी आणखी दोन नावे देतात.
- नामदेव ढसाळ